Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Monday, November 30, 2015

"स्वानंदीच्या लेखणीतून..."

"स्वानंदीच्या लेखणीतून..."


"बरे झाले रिकामी भेटलीस."
देशपांडे काकू वैद्या स्वानंदीच्या केबिनमधे शिरत म्हणाल्या.
"ओह, sorry हं काकू; मी तुमच्या 'पुजेला' नाही येऊ शकले."
कोकिला व्रताच्या 'उद्यापनाला' जाऊ न शकल्याने संकोचून स्वानंदी म्हणाली.
"ठीक आहे, एका अर्थाने 'बरेच' झाले, व्रत करून माझ्यासारखी तूच आजारी पडली असतीस; तर मला औषध कोणी दिले असते."
काकू मोकळेपणाने बोलल्या.

काकुंचा हाच स्वभाव तिला आवडतो, चार दिवसापूर्वी त्या  'ह्याच' व्रतासाठी तिला बोलवायला आल्या होत्या; तेव्हा तिने pt. चे कारण दिले, तर म्हणाल्या होत्या,"तुम्हा आजकालच्या मुलींना व्रत- वैकल्याचा भारी 'कंटाळा'. वगरे वगरे...!"
आणि आज हे!
असे 'निरागस' त्याच वागू शकतात.

"कशी झाली पूजा?"- स्वानंदी मनगटावर हात ठेवत 'नाड़ी परिक्षण' करत म्हणाली.
बस.....

पुढची 15-20 मिनिटे त्या पूजा,कहाणी,आरती,प्रसाद.. मग होम, उद्यापन,पुरणाचे मांडे व खीरीचा साग्र संगीत 'नैवेद्य' ह्याबद्दलचे 'रसभरीत' वर्णन ऐकवत बसल्या.
"पुजेचे तीन दिवस उपवास असून,एवढी धावपळ करूनही कसे 'प्रसन्न' वाटायचे.
आणि काल उपवास सोडला आणि आज सकाळपासून डोके चढले.
अपचन,acidity,चक्कर, थकवा काही विचारू नकोस."
काकुंनी एका दमात आजार आणि आजाराचे कारण दोन्ही सांगून टाकले.

"काकू ,काल तुम्ही 'यज्ञ ' करताना तूप,कापूर, समिधा हळू हळू टाकून ,शेवटच्या आहुतिपर्यन्त 'अग्नि' तेवत ठेवला की, अग्नि प्रज्ज्वलित झाल्यावर एकदम सर्व आहुति टाकल्यात?"
स्वानंदीच्या प्रश्नाने काकू गोन्धळल्या.
"अगं एकदम टाकला तर अग्नि विझुन नाही का जाणार?"

"मग काकू, हीच गोष्ट तुमच्या पोटातल्या 'जाठराग्निला' देखील लागू होते.
तीन दिवस 'उपवास' म्हणजेच 'लंघन' करून तुम्ही पोटातील 'जाठराग्निचा यज्ञ' छान पेटवलात;
पण नैवेद्य रूपी समिधा 'एकदम' टाकून तो 'विझायला' मदतच केलीत.
तुमच्या कोकिला गौरीने सांगितले होते का, की मला पुरणाचे मांडे आणि खीर हवी?"

आता ही माझी कहाणी ऐका.....
1. जेवणापूर्वी आले ,लिम्बु ,सैंधव चावून खावे.
2. भूक 'लागल्यावरच' दोन घास भूक 'राहील' असे जेवावे.
3. दुपारचे जेवण 12 ला आणि रात्रीचे सुर्यास्तापूर्वी करावे.
4. दुपारी झोप 'वर्ज्य'.
5. रात्री शतपावली 'नेमाने'.
6. हलका व्यायाम, योगासने, प्राणायाम आणि क़पाल भाति रिकाम्या पोटी 'रोज'.
7.आहारात सुंठ,मीरे,पींपळी, हींग जीरे,सैंधव, लसुण ह्याचा पुरेसा वापर.
8.पुढील 5 दिवस आहाराचे प्रमाण क्रमाने वाढवणे.
9. जुना तांदूळ किंवा भाजलेल्या तांदुळाची पेज, मुगाचे कढण, साळीच्या लाह्यांची पेज, मऊ भात, मुगाची खिचड़ी आदि गोष्टी क्रमाने फ़ोडणी शिवाय व नंतर फोड़णी देवून खावे.
10. स्वतःच्या मना 'पूर्वी' वैद्यांचे म्हणणे ऐकावे.

ही साठा उत्तराची कहाणी दहा उत्तरी सुफ़ल संपूर्ण!!!"
तिने लिस्ट लिहून कागद काकुंच्या हातात सोपवला.

"बाई ग, त्यापेक्षा तू मला saline लावून 2-3 तास झोपवले असतेस, इतर डॉक्टरां सारखे!"
काकू कागद वाचून म्हणाल्या.

"त्याने तुमच्या पोटातील 'gas' वाढला असता आणि 'पायावरची सुजही'; शिवाय 'किडनी' मैडमचे काम वाढले असते."
हसत हसत स्वानंदी म्हणाली.

"हो ,पण तू ही कामच वाढवलेस, शिवाय पुढे श्रावणात उपवास आहेतच की अजून,आत्ताच जरा चांगले चुंगले खावून घेणार होते."
काकू हिरमुसुन म्हणाल्या.

"काकू मी तुमच्या 'पचन संस्थेचे 'काम 'कमी' केलेय,
आणि असेच नियम तुम्ही कोकिला गौरीसाठी करतच होता ना; तेच आता 'आत्म देवतेसाठी'करायचे!
'दाक्षायणीला सुद्धा दहा हजार वर्षे कोकिला रुपात राहिल्यावर पार्वतीचा जन्म निळाला' , मी तुम्हाला 5-6 दिवस सांगितले आहे फ़क्त."
स्वानंदी हसत म्हणाली.

"म्हणजे ,तू कहाणी वाचलीस तर,व्रत करणारेस वाटते." काकुंची कळी खुलली.
"हो काकू,पण व्रत स्वताच्या शरीरासाठी आयुर्वेदोक्त पद्धतीने!

"आणि हो श्रावण सुरु होण्यापूर्वी जसे 'देवघर' स्वच्छ कराल ,तसेच पंचकर्म विशेषतः 'बस्तीने'शरीर 'शुद्ध' करायला विसरु नका."

"हो ग बाई, आणि तुझ्याकडून आयुर्वेदोक्त उपवासाच्या पदार्थांची लिस्ट पण घेऊन जाईन!"
जाताना काकुंच्या चेहऱ्यावरचे 'हास्य' हीच खरी स्वानंदीची fees होती!
-
वैद्या सोनाली तन्मय गायकवाड़
आदित्य आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय
आडगाव, नाशिक 422003

Email- drsonali2014@gmail.com
ब्लॉग--
beliveindetox.wordpress.com

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून




पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून
गर्भधारणेसाठी ऋतु – क्षेत्र – अम्बु – बीज हे चार घटक सुयोग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. ऋतु म्हणजे योग्य काळ, क्षेत्र म्हणजे ठिकाण, अंबु म्हणजे आवश्यक असे सर्व हॉर्मोन्स व बीज म्हणजे सामर्थ्यवान पुरुष व स्त्रीबीज.
हे चार घटक सर्वदृष्टीने समृद्ध आणि सामर्थ्यवान होण्यासाठी गर्भधारणेपूर्वी पुरुष व स्त्री दोघांनी पंचकर्माने शरीरशुद्धी करावी असा शास्त्रादेश आहे. दैनंदिन चयापचयातून तसेच निरनिराळ्या विद्युतचुंबकीय लहरींपासून काही विषारी घटक सतत निर्माण होत असतात. त्यांना पेशी विघातक परमाणु (फ्री रॅडिकल्स) म्हणतात. पुरुष व स्त्रीबीजांवर तसेच अम्बु म्हणजे हॉर्मोन्सचे असंतुलन फ्री रॅडिकल्समुळे होऊन त्यांचे अनिष्ट परिणाम संपूर्ण प्रजनन यंत्रणेवर होतात. परिणामी त्यांचे प्राकृत कार्य आणि सामर्थ्य खालावते. मानसिक क्लेश, ताणतणाव, वाढते प्रदूषण, फास्ट फूड मधून सेवन केले जाणारे रासायनिक प्रिझर्व्हेटिव्हज किंवा रंग, वाढते वय अशा गोष्टींचा दुष्परिणाम देखील तितकाच महत्वाचा आहे. ह्या सर्व अनिष्ट गोष्टींचा प्रतिकार करून पुरुषबीज सामर्थ्य उत्तम ठेवणे हाच ह्या लेखाचा प्रमुख उद्देश आहे.
ऋतु – ऋतु म्हणजे काळ.
पूर्णषोडशवर्षा स्त्री पूर्णविंशेन सङ्गता शुद्धे गर्भाशये मार्गे रक्ते शुक्रेऽनिले हृदि ।। अ. हृदय, सूत्रस्थान १/८
सोळा वर्ष पूर्ण झालेली शुद्ध गर्भाशय असलेली स्त्री, जिचा अपत्यमार्ग, रक्त, शुक्रवायु, हृदयातील वायु अदूषित असेल व ती वीस वर्ष पूर्ण झालेल्या निरोगी पुरुषाबरोबर मैथुन करेल तिला उत्तम वीर्यवान संतती प्राप्त होते. ह्या श्लोकात पुरुषाच्या वयाचे वर्णन स्पष्ट आहे. अर्थात पुरूषबीज ह्या वयात उत्तम व स्वास्थ्यसंपन्न असते. ह्यालाच योग्य ऋतु समजावे. ह्यापेक्षा लहान वयात शुक्रबीज अविकसित असतात व वय जसजसे वाढत जाते तसतसे त्याची क्षमता कमी होऊ लागते.
क्षेत्र – शुक्रनिर्मिती आणि वहन करणारी संपूर्ण यंत्रणा म्हणजे क्षेत्र. शुद्ध शुक्र निर्मिती होण्यासाठी ही सर्व यंत्रणा सुस्थितीत आणि कार्यक्षम असणे जरुरीचे आहे. ही क्षेत्ररचना सकस राहण्यासाठी आहार, पंचकर्म चिकित्सा आणि औषधी चिकित्सा फलदायी ठरते. पुढे हा विषय विस्ताराने मांडला आहे.
अम्बु – ह्याठिकाणी शुक्राणुंसाठी खतपाणी म्हणजे अम्बु. बीजातून रोपटे व पुढे वृक्ष स्वरूप प्राप्त होण्यासाठी खतपाणी आवश्यक आहे. समृद्ध शुक्रधातुसाठी सुयोग्य हॉर्मोन्स (संप्रेरके) असा अर्थ येथे अभिप्रेत आहे. एफ. एस. एच.; एल, एच, टेस्टोस्टेरॉन ह्या संप्रेरकांचा असमतोल असल्यास औषधांच्या सहाय्याने सुधारता येतो.
बीज – बीज म्हणजे शुक्राणु. गर्भधारणा यशस्वी होण्यासाठी शुक्राणूंची संख्या किमान २० दशलक्ष असणे आवश्यक आहे. ह्यापैकी फक्त एकच शुक्राणु गर्भधारणा होण्यास पात्र ठरतो तरीदेखील ही संख्या कमी असून चालत नाही. ह्या शुक्राणूंना विशिष्ट गती असावी लागते. ह्या गतीला मोटिलिटी म्हणतात. हा शुक्राणु गर्भाशयात प्रवेश करून पुढे बीजवाहिनीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो. एकूण शुक्राणूंपैकी कमीतकमी ३० % शुक्राणुंनी आपली विशिष्ट गती किमान एक तास टिकवून ठेवण्याची गरज असते.
       शुक्राणूंच्या रचनात्मक दोषांमुळे वंध्यत्व आणि बीजदोषजन्य विकृती उत्पन्न होऊ शकतात. ह्याला मॉर्फलॉजिकल दोष म्हणतात. ह्यात पेशीतील डी. एन. ए. ची स्थिती बिघडलेली असते. त्यामुळे बीजदोषजन्य अनुवांशिक व्याधी उत्पन्न होतात. ह्यांना म्युटेजेनिक डिसऑर्डर्स म्हणतात. पंचकर्म व विशिष्ट औषधोपचारांनी ह्यावर मात करता येऊ शकते. परंतु हा विषय मोठ्या संशोधनाचा आहे. सध्या फक्त शास्त्राधारित सूत्रांच्या आधारे गृहीतकांच्या (Hypothetical) स्वरुपात हा विषय मांडता येतो.
      प्राकृत शुक्रधातूचे मापन किमान २ मिली असावे. त्यात फ्रुक्टोजची मात्रा ३ मिलीग्राम प्रति मिली असावी. वीर्य द्रावित होण्याचा काळ २० मिनिटांपेक्षा कमी असू नये. ह्या सर्व गोष्टी वीर्य तपासणी करून समजू शकतात. काही चिह्ने व रुग्ण सांगतो त्या लक्षणांद्वारे इलाज करणे वंध्यत्वाच्या दृष्टीने आवश्यक ठरते. स्वप्नावस्था, शीघ्रपतन, मैथुनेच्छा न होणे, लिंगाला आवश्यक असलेला ताठरपणा प्राप्त न होणे अशा ह्या समस्या आहेत.
वरील सर्व लक्षणांची सविस्तर माहिती घेऊन आवश्यक त्या दोषावर सुयोग्य उपचार करून पुरुष वंध्यत्वाचा इलाज करता येतो.
      वृषणकोषात (Scrotum) दोन वृषणग्रंथी (Testicles) असतात. ह्या ग्रंथींमध्ये शुक्राणूंची उत्पत्ती होते. पुढे सेमिनल व्हेसिकल्स नावाच्या कोषिका असतात, त्यातून वीर्याची उत्पत्ती होते. पौरुष ग्रंथींमधून (Prostate gland) चिकटसर द्रव ह्यात मिसळला जाऊन शुक्र धातु समृद्ध होतो. मेंदूतील विशिष्ट यंत्रणा उत्तेजित झाल्याने शुक्रवाहिन्यांच्या मार्गाने शुक्राणु व वीर्याचे हे मिश्रण शिस्नातून बाहेर टाकले जाते.
      पुरुष वंध्यत्व चिकित्सा करतांना सर्वप्रथम वीर्य तपासणी केली जाते. ह्या तपासणीत शुक्राणूंची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आल्यावर त्याची चिकित्सा करावी लागते. ह्यासाठी अश्वगंधा, शतावरी, कवचबीज, गोक्षुर, तालिमखाना, विदारीकंद सारख्या वनस्पतींचा उपयोग होतो. ह्या वनस्पतीच्या सेवनाने शुक्राणूंची संख्या वाढते खरी परंतु हे शुक्राणु वीर्य स्खलनाच्या वेळी पुरेशा प्रमाणात बाहेर पडत नाहीत असे अनेक वेळा लक्षात येते. त्याची कारणे समजून उपचार करणे आवश्यक आहे.
      शुक्राणूंची उत्पत्ती झाल्यावर शुक्रवाहिन्यांच्या मार्गाने वीर्य शिस्नापर्यंत येते. ह्या मार्गात काही अडथळा आला तर शुक्राणूंची कमतरता दिसून येते. आतड्यातील अपान वायु, मळाचे खडे हे त्या भागातील रक्तवाहिन्यांवर व शुक्रवाहिन्यांवर दाब निर्माण करू शकतात. हा दाब नाहीसा करण्यासाठी बस्ति चिकित्सा महत्वाची ठरते. बस्ति चिकित्सेने अपानाचे कार्यही सुरळीत होते.
अपानोऽपानगः श्रोणिवस्तिमेढ्रोरुगोचरः । शुक्रार्तवशकृन्मूत्रगर्भनिष्क्रमणक्रियः ।। अष्टांगहृदय, सूत्रस्थान १२/९)
अपानवायु गुदस्थानी रहात असून कटि, शिस्न व मांड्या ह्या ठिकाणी संचार करतो. तो शुक्र, आर्तव, मल, मूत्र व गर्भ ह्यांना योग्य काळी शरीराबाहेर काढण्याचे कार्य करतो. त्यामुळे शुक्र धातूची चिकित्सा करतांना अपानवायूचा विचार महत्वाचा आहे.
अपानवायु कशाने बिघडतो ?
अपानो रूक्षगुर्वन्नवेगाघातातिवाहनैः । यानयानासनस्थानचङ्क्रमैश्चातिसेवितैः ।।
कुपितः कुरुते रोगान्कृच्छ्रान्पक्वाशयाश्रयान् । मूत्रशुक्रप्रदोषार्शोगुदभ्रंशादिकान्बहून् ।। अ. हृदय, निदानस्थान १६/२७-२८
   रूक्ष व गुरु अन्न सेवन, वेगांचा अवरोध, अतिशय कुंथणे, गाडीघोड्यावरून प्रवास करणे, फक्त बैठे काम करणे, सतत उभे राहणे, बेसुमार चालणे अशा कारणांमुळे अपानवायु कुपित होतो. ह्याने पक्वाशयाच्या आश्रयाने होणारे मूत्राघात, प्रमेह, शुक्रदोष, मूळव्याध, गुदभ्रंश सारखे कष्टसाध्य व्याधी उत्पन्न होतात.
     ग्रंथात वर्णन केलेल्या ह्या कारणांव्यतिरिक्त काळानुसार इतर कारणांचाही विचार करणे आवश्यक आहे. जसे – अति प्रमाणात मैद्याचे पदार्थ सेवन करणे, कार्बोनेटेड शीतपेयांचे बेसुमार सेवन, कंबरेचा पट्टा (बेल्ट) फार घट्ट बांधणे, अतिप्रमाणात मांसाहार करणे, घाई घाईने (न चावता) जेवण करणे, मोड आलेल्या कडधान्यांचे अधिक सेवन करणे, अकाली झोप घेणे व रात्र-रात्र न झोपणे (शिफ्ट ड्युटीज, रात्रीचे ड्रायव्हिंग मुळे) अशी अनेक कारणे अपानवायु बिघडवतात. मैद्यामुळे पाचक स्रावांना पचनयंत्रणेत येण्यास अडथळा होतो, शीतपेयांमुळे पाचकस्रावांची शक्ती कमी होते, कंबरेचा पट्टा कसून बांधण्यामुळे आतड्यांची चलनवलन गती मंदावते, मांसाहार पचण्यास जड असल्याने पाचकस्रावांना पचनास पुरेसा वाव मिळत नाही, घाईने जेवतांना अन्नाबरोबर भरपूर प्रमाणात हवा अन्नमार्गात घेतली जाते, कडधान्य पचनयंत्रणेत जाऊन आंबतात व फसफसतात, जागरणाने शरीराचे बायोलोजिकल क्लॉक बिघडते. म्हणून अपानाचे संतुलन राखण्यासाठी ह्या सर्व गोष्टींचा विचारपूर्वक वापर करावा, कोणत्याही प्रकारचा अतिरेक होत नाही ह्याची खात्री करावी.
शुक्रावृतेऽति-वेगो वा न वा निष्फलता ऽपि वा ॥ अ. हृदय, निदानस्थान १६/३८
   अपानवायुचे शुक्रधातुला आवरण झाल्यास शुक्राचा अतिशय वेग येतो किंवा अजिबात येत नाही, त्याने गर्भोत्पत्ती होत नाही.
कुपित वायूची लक्षणे . . .
स्रंसव्यासव्यधस्वाप-साद-रुक्-तोद-भेदनम् ॥ सङ्गाङ्ग-भङ्ग-संकोच-वर्त-हर्षण-तर्षणम् ।
कम्प-पारुष्य-सौषिर्य-शोष-स्पन्दन-वेष्टनम् ॥ स्तम्भः कषायरसता वर्णःश्यावोsरुणोsपि वा ।
. . . . अष्टांगहृदय, सूत्रस्थान १२/४९
   स्रंस म्हणजे अवयव आपल्या नैसर्गिक स्थानापासून खाली सरकणे, व्यास म्हणजे आकारमान वाढणे, व्यध – इजा होणे, स्वाप – निश्चल होणे, रुक् – रुजा किंवा वेदना होणे, तोद – टोचल्याप्रमाणे दुखणे, भेदन – आरपार छिद्र होणे, संग होणे म्हणजे दोष साठणे, अंगभंग – विकलांगत्व येणे, संकोच – आकुंचन पावणे, वर्त – उलटणे किंवा चुकीच्या दिशेला वळणे, हर्षण – रोमांच, तर्षण – तहान लागणे, कम्प – थरथरणे, पारुष्य – कर्कशपणा, सौषिर्य – भेगा पडणे, शोष – कोरडेपणा, स्पंदन – केंद्रित स्वरूपाच्या हालचाली होणे, वेष्टन – लेप केल्याप्रमाणे संवेदना होणे, स्तम्भ – निश्चल होणे, कषायरसता – तोंडास तुरट चव येणे, वर्णःश्यावोsरुणोsपि – काळपट किंवा सूर्याप्रमाणे तांबडा वर्ण येणे.
    पुरुष वन्ध्यतेबद्दल विचार करतांना ह्या प्रत्येक संज्ञेचा सखोल विचार अपानवायुच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. त्याकरिता पुरुष लैंगिक अवयव व पुरुषबीज ह्यातील दोषांसाठी बस्ति चिकित्सेचा नितांत उपयोग होतो हे ध्यानात ठेवावे.
    अपानवायुचा संबंध मानसिक स्वास्थ्याशी निगडीत आहे. “भीतीने गर्भगळीत होणे” ही जुनी म्हण आहे. मानसिक संतुलन बरोबर असेल तर गर्भ स्थिर राहतो व बिघडल्यास तो गर्भपात घडवतो. स्वास्थ्यपूर्ण गर्भाधान होण्यासाठी पुरुषांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम असणे महत्वाचे आहे. भीती, चिंता, क्रोध, मानसिक दडपण असतांना पुरुषांचे लैंगिक अवयव कार्यक्षम राहू शकत नाहीत. अशा अवस्थेत निरोगी व सत्ववान गर्भाधान होणे शक्य नसते. औषधी चिकित्सा करतेवेळी हा मुद्दाही लक्षात घेणे गरजेचे आहे.
    थोडक्यात पंचकर्मांपैकी किमान विरेचन, नस्य आणि बस्ति चिकित्सेचा प्रयोग करावा. बीजदोष नाहीसे करण्यासाठी, बीज सामर्थ्यवान होण्यासाठी व उत्तम गर्भधारणा होण्यासाठी ह्या क्रिया आवश्यक आहेत.
आता आहाराबद्दल बघूया
सौम्यं स्निग्धं गुरु शुक्लं मधुगन्धि मधुरं पिच्छिलं बहु बहलं घृततैलक्षौद्रान्यतमवर्णं च शुक्रं गर्भाधानयोग्यं भवति॥ . . . . अष्टाङ्गसङ्ग्रहः, शारीरं स्थानम् १ / ४
शुक्र धातूचे वर्णन – सौम्य, स्निग्ध, शुक्ल वर्ण, मधाप्रमाणे गंध असणारे, मधुर, पिच्छिल, बहु, बहल, घृत, तैल, क्षौद्र (मधाप्रमाणे) दिसणारे असे शुक्र गर्भाधानास योग्य असते. आयुर्वेदाच्या “सामान्य – विशेष” सिद्धांतानुसार शुक्रधातुच्या समान असणारे गुण त्याच्या पोषणास उपयुक्त ठरतात. विरुद्ध गुणांच्या पदार्थ सेवनाने शुक्रक्षय होतो. आहारातील घटकांचा विचार केल्यास दूध, तूप, मधुर रसाचे पदार्थ हे शुक्र धातुच्या पोषणासाठी लाभदायक होतात.
सौम्य – सोम म्हणजे चंद्र ही ह्या शब्दची व्युत्पत्ती. चंद्राप्रमाणे शीतल (ज्यामध्ये आग्नेय गुणाचा अभाव आहे). शीतल गुणांमुळे शुक्रधातूची वाढ होणे अभिप्रेत आहे. वृषणकोशाची निर्मिती करतांना निसर्गाने ह्याला शरीराबाहेर टांगलेल्या अशा स्थितीत रचले ज्यामुळे त्याला हवेशीर वातावरण मिळेल व उष्णता किंवा ऊब तुलनेने कमी मिळेल. मानवी शरीराचे सर्वसाधारण तापमान ३७० सेंटीग्रेड किंवा ९८.६०० फॅरनहाईट्स इतके असते. एवढ्या तापमानात शुक्रबीज जास्त काळ टिकत नाहीत. ४० सेंटीग्रेड इतक्या थंड तापमानात ठेवल्यास शुक्रबीज टिकतात परंतु त्यांचे चलनवलन स्तब्ध होते. २०० सेंटिग्रेड तापमानात शुक्रबीज सर्वात जास्त काळ टिकतात व चलनवलनही अबाधित राहते. म्हणून शुक्रधातुच्या रक्षणासाठी व वाढीसाठी तापमान कमी असणे आवश्यक आहे.
स्निग्ध: शुक्रधातु व वीर्य ह्या दोन गोष्टी निराळ्या आहेत. शुक्रधातु म्हणजे प्रत्यक्ष शुक्रबीज तर वीर्य म्हणजे ज्या द्रवामध्ये ह्या बीजांचे पोषण होते तो द्रव. स्निग्धता असल्याने शुक्रबीजांचे सुयोग्य पोषण होते. रुक्षतेमुळे बीजांचे कुपोषण होण्याची शक्यता असते. शुक्रधातूचे वहन, चलनवलन उत्तम राहण्यासाठी ह्या ‘स्निग्ध’ गुणाचा उपयोग होतो.
गुरु : गुरु म्हणजे जड. पंचमहाभूतांतील पृथ्वी आणि जल महाभुते फक्त गुरु आहेत व ह्यांच्या संयोगाने मधुर रस तयार होतो. शुक्रधातु मधुर असल्याने त्यात स्वाभाविकपणे पृथ्वी आणि जल महाभूतांचे प्राधान्य असते. मधुर रसाने त्याची वृद्धी होते असा अर्थ ध्यानात येतो. पण प्रत्यक्षात मात्र मधुमेही रुग्णांमध्ये शुक्रक्षीणता आढळते हे कसे? हे कोडे उलगडण्यासाठी शारीरक्रियेचा पाया लक्षात घेणे आवश्यक आहे. मधुमेहात रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. त्याचे परिणमन धातु पोषणासाठी होत नाही. इन्सुलिनला धात्वग्नि समजावे. म्हणजे ह्याठिकाणी धात्वग्नि दुर्बल झाल्याने रस-रक्तातील पोषक घटक पुढील धातूंपर्यंत पोचत नाहीत अर्थात त्यामुळे शुक्र दौर्बल्य निर्माण होते.
शुक्लवर्ण : शुक्रधातु उत्तम असेल तर त्याचा वर्ण शुक्ल म्हणजे स्वच्छ पांढरा असतो. इतर कोणत्याही धातूच्या मलीनतेमुळे काही दोष निर्माण झाला तर वर्ण बदलतो. कफाचा वर्ण शुक्ल आहे व शुक्रधातुशी त्याचे साधर्म्य आहे. सामान्यतः कफ वर्धक आहार विहाराने शुक्रवृद्धी होते.
सर्वसामान्य लैंगिक समस्यांबद्दल काही खुलासा
स्वप्नावस्था – झोपेत नकळतपणे वीर्यस्खलन होणे म्हणजे स्वप्नावस्था. “मनी वसे ते स्वप्नी दिसे” ही म्हण ह्या समस्येशी निगडीत आहे. मनात सतत लैंगिक विचार असले तर त्याची परिणीती स्वप्नातही होते. मेंदूतील हायपोथॅलॅमसद्वारा संप्रेरकांमध्ये तसे बदल होतात आणि स्वप्नावस्था निर्माण होते.
हस्तमैथुन – हस्तमैथुन म्हणजे मैथुनावस्थेचे काल्पनिक चित्र रचून हाताने शिस्नपीडन करून वीर्यपात घडविणे. सातत्याने लैंगिक विचार केल्याने मनावर कामवेग आरूढ होतो व त्यातून ही क्रिया करण्याची इच्छा निर्माण होते. हस्तमैथुन केल्याने लिंग लहान होते, वीर्य पातळ होते, वंध्यत्व येते असे अनेक गैरसमज समाजात चर्चिले जातात. हे निव्वळ गैरसमज असल्याने मनात कोणतीही अशी भीती बाळगू नये. परंतु “अति सर्वत्र वर्जयेत्” हा नियम लक्षात ठेवावा.
    स्वप्नावस्था किंवा हस्तमैथुन ह्या दोन्ही अवस्था मानसिक दोषांमुळे व चुकीच्या आहारामुळे उत्पन्न होऊ शकतात. रज व तम ह्या दोन प्रकारच्या मानसिक दोषांच्या प्रभावाने, त्याचबरोबर मद्यपान, अमलीपदार्थ सेवन, अति मांसाहार, तामसी अन्न अशा कारणांमुळे ह्या अवस्था निर्माण होतात. सात्विक चिंतन, मनन, अभ्यास, वाचन, सुविचार अशा साध्या सोप्या गोष्टींचा अंगिकार व सुयोग्य संतुलित आहार केल्याने ह्या समस्यांपासून चार हात लांब राहणे शक्य आहे.
वीर्य पातळ होणे – हस्तमैथुन किंवा स्वप्नावस्था दीर्घकाळ राहिल्याने “वीर्य पातळ झाले” असी तक्रार अनेक रुग्ण करतात. हे म्हणणे चुकीचे आहे. अशा कारणांमुळे वीर्य पातळ होत नाही किंवा वंध्यत्व येत नाही. हा गैरसमज डोक्यातून काढून टाकावा. ह्यामुळे मानसिक असंतुलन मात्र वाढते आणि “आपण काहीतरी चुकीच्या कृत्यामुळे मोठ्या रोगाला बळी पडलो” अशी भीती वंध्यत्वाला कारणीभूत होते. वीर्य पातळ असो की घट्ट, त्यातील शुक्रबीजांची संख्या, चलनवळण गती, फ्रुक्टोजची पातळी हीच प्रजननक्षमतेला जबाबदार असते.
लिंग उत्थान समस्या – कुपित अपानवायु, मानसिक क्लेश आणि अपुरा रक्तसंचार ही तीन प्रमुख कारणे लिंग उत्थान समस्येशी निगडीत आहेत. नळाला रबरी पाईप जोडून पाणी जोरात सुरु केल्यावर पाईप ताठ होतो. लिंग उत्थान क्रिया नेमकी अशीच होते. पाईप वर बाहेरून दाब पडला किंवा त्यातील रक्त संचारात काही अडथळा आला तर रक्तसंचार खंडित होतो व उत्थान क्रिया बंद पडते किंवा कमी होते. आतड्यांमध्ये माळाचे खडे किंवा गॅस भरल्यामुळे शिस्नाच्या खालच्या बाजूला असलेल्या रक्तवाहिन्यांवर दाब पडतो व रक्तसंचार मंदावतो. ३० एम.एम.एच.जी. एवढा रक्तदाब लिंग सुप्तावस्थेत असतांना राहतो. लिंग पीडनाने हा दाब ९० ते १०० एम.एम.एच.जी. एवढा वाढतो. उत्तेजक शब्द, स्पर्श, रुप, रस व गंध अशा कारणांमुळे केंद्रीय मज्जा यंत्रणा उत्तेजित होऊन हा रक्तसंचार वाढविते.
     मानसिक क्लेशनिवारक औषधे, बस्ति चिकित्सा, रक्तसंचार संतुलित करणारी औषधे योग्य सल्ल्याने घेतल्यावर उत्थान क्रिया सुरळीत होऊन उत्थान प्राकृत होते. ह्यात वयाची मर्यादाही महत्वाची आहे. तरुण वयात ज्याप्रकारे उत्थान होते तेढ्या प्रमाणात उत्थान होण्याची अपेक्षा वय वाढल्यानंतर करणे नक्कीच चुकीचे आहे. मधुमेही, स्थौल्य व उच्च रक्तदाबाचे रुग्ण ह्यांच्या समस्या निराळ्या असतात. प्रकृती, आहार, वय, रोगावस्था अशा गोष्टींचा विचार करून चिकित्सा करावी लागते.
प्रजांकुर व अश्वमाह – शुक्रबीज निर्मिती, स्वास्थ्य व गर्भस्थापनेसाठी दोन परिपूर्ण पाठ
गेल्या २५ वर्षांपासून अक्षय उद्योग समूह आयुर्वेद व आरोग्य क्षेत्रात विक्रमी वाटचाल करीत आहे. वनौषधींची लागवड, आयुर्वेदीय औषधांची निर्मिती, विपणन, आरोग्यविषयक पुस्तकांचे प्रकाशन, संशोधन व विकास अशा अनेक लोकोत्तर कार्यात मनाचे स्थान मिळविले आहे. वैद्यकीय, औषधनिर्मिती शास्त्र, कायदा, अर्थकारण अशा विविध क्षेत्रातील व्यासंगी तज्ञ ह्या उपक्रमात सहभागी आहेत.
     पुरुष वंध्यत्व निवारणार्थ विविध शारीरिक व मानसिक भावांचा विचार करीत, औषधी घटकांचा सखोल अभ्यास करून पुरुषबीज समृद्धीसाठी अक्षय उद्योग समूहाने ‘प्रजांकुर नस्य’ व ‘अश्वमाह’ नावाची दोन अभिनव उत्पादने सादर केली आहेत. ह्यातील प्रत्येक औषधी द्रव्याच्या कार्मुकतेबद्दल आधुनिक वैद्यक शास्त्रात उपलब्ध झालेल्या संशोधनाचे सारांश स्वरुपात संदर्भ देऊन विषयाला परिपूर्णता दिली आहे.
प्रजांकुर नस्य चिकित्सा - विश्लेषण:
      मानवी शरीरात टेस्टोस्टेरॉन नामक संप्रेरक (हॉर्मोन) उत्पन्न होते. हे मुख्यतः वृषणकोषातून व अल्प प्रमाणात स्त्रियांच्या बीजकोशातून स्रावित होते. थोड्या प्रमाणात अॅड्रिनल ग्रंथीमधूनही ह्याची निर्मिती होते. हे एक धातुपोषक असे संप्रेरक आहे.
पुरुषांमध्ये प्रजनन यंत्रणा, वृषणग्रंथी, पौरुष ग्रंथी, मांसपोषण, अस्थिपोषण, जांघेतील ब खाकेतील केस, दाढी-मिशा ह्या सर्व बदलांमध्ये टेस्टोस्टेरॉन महत्वाची भूमिका बजावते. ह्याशिवाय अस्थिधातूचा ठिसूळपणा (ऑस्टिओपोरोसिस) काबूत ठेवण्यास हे हॉर्मोन समर्थ आहे.
     पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण स्त्रियांपेक्षा ७ ते ८ पट अधिक असते. पुरुषांमध्ये चयापचयात त्याचा अधिक वापर होत असल्याने निर्मितीची क्षमता सुमारे २० पट अधिक अशी निसर्गाने प्रदान केली आहे. ह्याची निर्मिती पियुशिका (पिट्युटरी) ग्रंथीच्या अधिपत्याखाली होते. ह्यातून फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन (FSH) व ल्युटिनायझिंग हॉर्मोन (LH) अशी दोन संप्रेरके उत्पन्न होतात. ल्युटिनायझिंग हॉर्मोनमुळे टेस्टोस्टेरॉन निर्मितीस प्रेरणा मिळते तर दोहोंच्या एकत्रित प्रभावाने शुक्रबीज निर्मिती होते.
      पुरुष वंध्यत्वाची चिकित्सा करतांना पियुशिका ग्रंथी आणि वृषणग्रंथी अशा दोन्ही स्तरांवर विचार करणे आवश्यक आहे. वृषणग्रंथी दोषांमध्ये गालगुंड (Mumps), व्हेरिकोसील, अनडिसेंडेड टेस्टीज, वृषणग्रंथी शोथ, हायड्रोसील, इपिडायडेमिस (शुक्रवहन नलिका) शोथ अशा विकारांचा समावेश होतो. त्यानुसार त्या त्या विकाराची चिकित्सा करावी लागते. पियुशिका ग्रंथीमध्ये दोष असेल तर त्याची चिकित्सा ‘नस्य’ रूपाने करता येते. रुग्णाच्या रक्ततपासणीतून टेस्टोस्टेरॉन मापन करता येते. ह्याची किमान पातळी ३०० ते १००० नॅनोग्राम प्रति डेसिलिटर एवढी असणे आवश्यक आहे. ही पातळी कमी असल्याचे आढळले तर पियुशिका ग्रंथीच्या चाचण्या करणे आवश्यक ठरते. ह्यातून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे पियुशिका ग्रंथीच्या प्रभावाखाली सर्व प्रजनन यंत्रणा केंद्रित असते. म्हणूनच आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून नस्याचा उपयोग प्रजनन यंत्रणेवर हमखास लाभदायक ठरेल असा निष्कर्ष काढता येतो.
      आधुनिक वैद्यक शास्त्रात टेस्टोस्टेरॉनची जेल स्वरुपात नासामार्गे चिकित्सालयीन चाचणी (Clinical Trial) घेण्यात आली. ह्या चाचणीत ३०६ रुग्णांवर ह्याचा प्रयोग केला. ३०० नॅनोग्राम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी असलेल्या रुग्णांवर ३ महिने रोज २ वेळा हे द्रव्य नस्य स्वरुपात प्रविष्ट करून त्यांच्या टेस्टोस्टेरॉन पातळीचे मापन केले असता ९०% रुग्णांची टेस्टोस्टेरॉन पातळी विहित प्रमाणात वाढली. ह्यावरून गर्भस्थापनेत नस्याचे महत्व सिद्ध होते.
       वंध्यत्व व गर्भस्थापनेत नस्याची अशी उपयुक्तता आयुर्वेदाने हजारो वर्षांपूर्वी जाणली व उपयुक्त वनस्पतींचे पाठ ग्रंथात विषद केले आहेत. त्यांना नव्याने अभ्यासून व शास्त्राच्या चौकटीत बसवून “प्रजांकुर नस्य” म्हणून अक्षय उद्योग समूहाने सादर केले आहे.
     चरक संहिता ह्या आद्य ग्रंथात महर्षी चरकाचार्यांनी काही विशिष्ट वनस्पतींचे वर्गीकरण गर्भस्थापक औषधी म्हणून केले आहे. ह्याचे समर्थन कश्यप संहिता, सुश्रुत संहिता अशा ग्रंथातही नमूद आहे. औषधी गर्भसंस्कारांचा आधार ग्रंथ “अष्टांगहृदय” ह्यामध्ये महर्षी वाग्भट ह्यांनी देखील त्याचे समर्थन करून औषध सेवनाचे विविध मार्ग व स्वरूप सांगितले आहे.
ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याsमोघाsव्यथाशिवाsरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दाशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति l . . . . . . . चरक, सूत्रस्थान ४/१८ (४९)
लक्ष्मणादिनस्यदानं गर्भस्थापनार्थं, स्थितगर्भायाश्चमासत्रयाल्पान्तरे पुत्रापत्यजननार्थं नस्यदानमिति ll . . . . . . . सुश्रुत, शारीर २-३२
चरक संहिता वर्णित वनस्पतींचा सुयोग्य वापर करून अक्षय फार्मा रेमेडीजने सिद्ध घृत स्वरुपात “प्रजांकुर” नावाने सादर केले आहे. ह्याचा वापर नस्य स्वरुपात गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भधारणा निश्चिती पर्यंत करावयाचा आहे.
नस्याचे लाभ
ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याऽमोघाऽव्यथाशिवाऽरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति ।। . . . . सूत्रस्थान चरक ४/१८ (४९)
ततः प्रजास्थापनाख्या दशौषधीः शिरसा दक्षिणेन च पाणिना धारयेत्। एताभिश्च सिद्धं पयो घृतं वा पिबेत्। . . . . . अष्टांगसंग्रह शारीर १ – ६२
    “पिण्यासाठी व शिरोभागी धारण करण्यासाठी” सदर पाठाचा वापर करावा असा शास्त्रादेश आहे. शिरोभागी धारण करणे म्हणजेच ‘नस्य स्वरुपात वापर करणे’ असा अर्थ येथे शास्त्रकारांना अभिप्रेत आहे. “नासाहि शिरसो द्वारं” ह्या प्रस्थापित संकल्पनेनुसार व आधुनिक वैद्यकानुसारही नस्य हे प्रजनन संस्थेवर उत्तम कार्य करते. म्हणून ‘प्रजांकुर घृत’ नस्य रूपानेही प्रभावी ठरते. शास्त्राधार व आप्तवचन ह्या दोन्ही दृष्टिकोनातून ह्याचा वापर नस्य स्वरुपात करणे योग्यच आहे. काही द्रव्यांचे शोषण नाकाच्या मार्गाने त्वरित होते. हीच द्रव्ये पोटात घेतल्याने त्यावर अनेक पाचक स्रावांची क्रिया घडते व ‘ब्लड ब्रेन बॅरियर’ यंत्रणेमुळे कार्यकारी घटकांचे शोषण शिरोभागात होण्यास अडथळे निर्माण होतात. नाकाच्या श्लेष्मल स्तरातून ही द्रव्ये मेंदूच्या संपर्कात येतात व रसरक्तातही त्यांचे शोषण त्वरित होते. सुमारे १५ ते ३० मिनिटांत नाकातून प्रविष्ट केलेले द्रव्य रक्तसंवहनात पसरते असे सिद्ध झाले आहे. इंजेक्शन द्वारा दिल्या गेलेल्या औषधाइतक्याच कमी वेळात ह्याचा परिणाम होतो असे संदर्भही मिळतात.
घृत हेच माध्यम का ?
      नस्य द्रव्यांमध्ये चूर्ण वापरल्यास नाकाच्या श्लेष्मल त्वचेत व्यवस्थितपणे पसरले जात नाही म्हणून नस्य द्रव्य द्रव स्वरुपात असावे. द्रव पदार्थांमध्ये जल आणि स्नेह असे दोन मुख्य प्रकार आहेत. त्यापैकी स्नेह (स्निग्ध द्रव्य) हे स्वभावतः मध्यवर्ती मज्जासंस्थेला सात्म्य आहे. आयुर्वेदानुसार घृत, तैल, वसा, मज्जा हे ४ स्निग्ध पदार्थ आहेत. ह्यापैकी ‘सामान्य-विशेष’ सिद्धांतानुसार ‘मज्जा’ हा स्निग्ध पदार्थ मध्यवर्ती मज्जासंस्थेला (CNS) नक्कीच अधिक पोषक ठरेल ह्यात शंका नाही. परंतु उपलब्धी, प्राणिज स्रोत व मनुष्याच्या मानसिकतेचा विचार करून “घृत” हेच माध्यम वापरणे योग्य ठरते.
प्रत्येक १० ग्रॅम प्रजांकुर घृतामधील घटकद्रव्ये व प्रमाण: 
ऐन्द्री (Citrullus colocynthis), दुर्वा (Cynodon dactylon), अमोघा (Sterospermum suaveolens), विश्वक्सेना (Callicarpa macrophylla), अव्यथा (Hibiscus mutabilis), शिवा (Terminalia chubula), ब्राह्मी (Bacopa monnieri), वाट्यपुष्पी (Sida cordifolia), शतवीर्या (Asparagus racemosus), बहुपाद (Ficus benghalensis) प्रत्येकी २५० मिलिग्रॅम; गो घृत १० ग्रॅम; गो दुग्ध ४० ग्रॅम
      वापरण्याची पद्धत (पुरुष व स्त्रियांसाठी) : प्रथम बाटली गरम पाण्यात ठेऊन प्रजांकुर (घृत) पातळ करावे. आडवे झोपून ६ - ६ थेंब दोन्ही नाकपुड्यांत पहाटे सूर्योदयापूर्वी किंवा सूर्योदयाच्या वेळी टाकावे. २ - ३ मिनिटे तसेच पडून राहावे. गर्भधारणेच्या संकल्पापासून गर्भनिश्चिती पर्यंत हे नस्य करावे.
अश्वमाह वटी – चिकित्सा विश्लेषण :
       "अश्वमाह" हे सात औषधांचे सुरेख मिश्रण आहे. बऱ्याच शुक्रवर्धक व शुक्रस्तंभक औषधी पाठांचे वर्णन करतांना 'अश्व' हा शब्द 'शक्तीच्या संदर्भात' वापरला असतो किंवा त्या औषधाच्या माहिती पत्रकात चक्क घोड्याचे चित्र असते. "अश्वमाह" मध्ये "अश्वगंधा" ही प्रधान व अत्यंत गुणकारी वनस्पती अग्रक्रमांकाने वापरली असल्यामुळे ह्या पाठाला 'अश्वमाह' नाव दिले आहे. हा पाठ रसायन, वाजीकरण, शुक्रप्रवर्तक, शुक्रवर्धक, शुक्रस्तंभक, शुक्रदोष नाशक तसेच, शुक्रबीज संख्या, वीर्याचे प्रमाण व मैथुनशक्ती वाढवणारा अशा गुणांनी परिपूर्ण आहे.
    अश्वगंधा (Withania somnifera) : मानसिक ताण-तणावामुळे कॉर्टिसॉल नामक हॉर्मोन वाढून मेंदूवर विपरीत परिणाम होतो व शुक्रधातु निर्मिती रोडावू लागते. मेंदूतील पिट्युटरी किंवा सुप्रारीनल ग्रन्थिच्या विकारामुळे हा रोग होतो. अश्वगंधामुळे रक्तातील कॉर्टिसॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. कॉर्टिसॉल वाढल्यामुळे होणारे इतर दुष्परिणामही ह्याने कमी होतात. शिवाय रोडावलेली शुक्राणूंची संख्या वाढते. हिच्या सेवनाने विद्युत-चुंबकीय लहरींमुळे होणारे दुष्परिणाम देखील लक्षणीय मात्रेत कमी होतात व अपेक्षित परिणामात वाढ होते.
    आत्मगुप्ता (Mucuna pruriens) : आत्मगुप्ता आपल्या पेशीरक्षक गुणांमुळे शुक्राणूंची संख्या व चलन-वलन गती वाढवते त्याचबरोबर रक्तातली शर्करा पातळी शरीराला आवश्यक तेवढ्या नैसर्गिक पातळीत आणते.
    श्वदंष्ट्रा (Tribulus terrestris) : श्वदंष्ट्रा सेवनाने ६० दिवसांमध्ये क्षीणशुक्र म्हणजेच ऑलिगोस्पर्मिया नाहीसा होऊन शुक्रबीज संख्येत ७८.११ % वाढ होते.
    नारायणी (Asparagus racemosus) : वाजीकर गुणांच्या दृष्टीने Sildenafil citrate हे औषध जगप्रसिध्द आहे. परंतु त्याचे दुष्परिणामही तेवढेच लक्षणीय आहेत. नारायणी ही उत्तम वाजीकर असून पूर्णपणे निर्दोष अशी वनस्पती आहे. Sildenafil citrate व नारायणी ह्यांच्या तुलनात्मक संशोधनातून हा निष्कर्ष प्राप्त झाला. थोडक्यात नारायणी वाजीकर गुणांनी परिपूर्ण वनस्पती आहे. हिच्या सेवनाने विद्युत-चुंबकीय लहरींमुळे यकृतावर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. पेश्यांतर्गत मायटोकॉन्ड्रिया वर कार्य होऊन हे संरक्षण प्राप्त होते.
    कोकिलाक्ष (Hygrophila spinosa) : वाजीकरण आणि शुक्राणुवर्धन ह्या दोन्ही मध्ये श्रेष्ठ अशी ही वनस्पती आहे. अनापत्यता, लैंगिक दुर्बलता, शुक्रमेह अशा विकारांमध्ये ही अत्यंत उपयुक्त आहे. कोकिलाक्ष सेवनाने "हॉर्मोनल व न्युरो-हॉर्मोनल" यंत्रणेत बदल घडून हे परिणाम दृष्ट स्वरुपात साकार होतात. रक्तातील टेस्टोस्टेरॉन, कोलेस्टेरॉल व प्रथिनांमध्ये समतोल राखून ही वृष्य, वाजीकर व धातुपोषक कार्य करते.
     अक्कलकारा (Anacyclus pyrethrum) : वीर्यवर्धन, शुक्राणु संख्यावर्धन, बलवर्धन व प्रजनन शक्ती सुधार अशा अनेक बीजस्वास्थ्योपयोगी गुणांनी समृद्ध अशी ही वनस्पती आहे. हिच्या सेवनाने वृषण ग्रंथींचा आकार व वजन वाढते, पौरुषग्रंथीचा आकार वाढतो, शुक्रवाहिनीचा व्यास वाढतो, वृषणाला रक्त पुरवठा सुधारतो, शिस्नाचा ताठरपणा तीन पटीने वाढतो. अर्थातच प्रजननाच्या दृष्टीने सर्व अनुकूल गुण ह्या वनस्पतीत ठासून भरले आहेत.
      नागवल्ली पत्र (Piper betle) : नागवल्ली पत्र म्हणजे सर्वांना सुपरिचित असलेले विड्याचे पान. मानसिक ताण-तणाव हे वंध्यत्वाचे एक प्रमुख कारण आहे आणि यावर इमिप्रामाईन नामक औषध आधुनिक वैद्यकात दिले जाते. नागवल्ली व इमिप्रामाईन यांच्या तौलनिक अभ्यासातुन नागवल्लीचा मानसिक ताण-तणाव निर्मूलनाचा गुण इमिप्रामाईन पेक्षा अधिक श्रेष्ठ आहे हे सिद्ध झाले. ह्यातील सुगंधी द्रव्याचा परिणाम मज्जा यंत्रणेवर होऊन एपिनेफ़्रिन व नॉरएपिनेफ़्रिन चे स्राव उत्तेजित होतात ज्यामुळे मज्जा यंत्रणेला प्रोत्साहन मिळते. शिवाय "चेविकॉल" हे तिखट द्रव्य उत्तम पाचक व उत्तेजकाचेही कार्य करते. नागवेलीपत्रातील रसायन विद्युत-चुंबकीय लहरींमुळे होणाऱ्या शुक्रदोष निवारणात समर्थ आहे.
पाठातील प्रत्येक घटकाची माहिती घेतल्यावर असे स्पष्ट हो�
लेखक –
वैद्य संतोष जळूकर
संचालक,
अक्षय फार्मा रेमेडीज,
 मुंबई
+917208777773
drjalukar@akshaypharma.com

Thursday, November 26, 2015

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 10

नमस्कार मंडळी!
काय मग?
तांदुळाच्या पिठाच्या गरम उकडीचे, मऊसूत, चाफेकळी नाकाच्या, सुबक पाकळ्यांच्या, भरपूर गूळ-खोबरे-वेलचीयुक्त सारणाच्या मोदकांचा - साजूक तुपाच्या धारेबरोबर - शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध असा सर्वांगांनी आस्वाद घेतलात की नाही? बाप्पांनी येताना पाऊसही आणला म्हणून आनंदात अम्मळ एखादा मोदक जास्तच खाल्ला असेल तरी हरकत नाही हं।
या लेखात पाहूया तळणीचे मोदक -
गव्हाची कणिक / रवा-मैदा / कणिक-रवा-मैदा इ. च्या कमी-जास्त संयोगातून मोदकाचे आवरण तयार केले जाते.
हे पीठ भिजवताना काही ठिकाणी ते दुधात भिजवतात तर काही ठिकाणी दूध-पाणी वा फक्त पाणी. तेल वा तुपाचे मोहन घातले तर पदार्थ खुसखुशीत होतो.
सारण म्हणून काही ठिकाणी ओले-खोबर-गूळ वा डाळीचे पुरण वा सुक्या खोबऱ्याचे पिठीसाखरेचे वा पंचखाद्सायाचे सारण असते.
तळणीच्या मोदकांचे घटक व त्यांचे गुणधर्म पुढीलप्रमाणे -
गहू - गहू हे स्निग्ध, शीतल, वात-पित्तदोष कमी करणारे, दाह कमी करणारे, हाडे सांधण्यासाठी उपयुक्त, शरीरास स्थिरता - बळकटी आणणारे, बल वाढवणारे, जीवनशक्ति वाढवणारे आणि म्हणूनच रोजच्या आहारात पोळी/रोटी/फुलका या स्वरूपात समाविष्ट झाले आहेत.
कणिक - कोंड्यासकट दळलेले गहू म्हणजे कणिक.
रवा - हेच गहू जाडसर दळून गव्हाचा रवा तयार करतात.
मैदा - पूर्वी मैदा हा गहू स्वच्छ धुवून, सुकवून, जात्यावर दळून घेऊन, मलमल वा धोतराचे पान वा साडी यावरून गाळून घेऊन वापरत. तांदुळाची पिठी करतात तीच कृती. सध्या बाजारात मिळणारा मैदा मात्र अनेक कृत्रिम रसायनांनी युक्त असल्याने तब्येतीला घातकच.
तेलात तळलेले गव्हाचे पदार्थ हे दृष्टिसाठी वाईट - डोळ्यांवर वाईट परिणाम करणारे असे आयुर्वेद शास्त्र सांगते. तेव्हा, पुरी, सामोसे, शंकरपाळे, करंजी, मोदक इ. गव्हाचे वा रवा/मैद्याचे पदार्थ साजूक तुपातच तळावेत. तरच ते चवीला ही आणि तब्येतीलाही अत्युत्तम. सण साजरा करायचाय, सणाचा आनंद घ्यायचाय पण ते करताना परवडत असतानाही तुपाऐवजी तेल त्यातून रिफाईंड वा गव्हाऐवजी मैदा वा साखर-गूळाऐवजी कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ वापरून स्वतःचीच फसवणूक कशाला करावी बरं? पूर्वजाच्या तब्येतीचे दाखले द्यायचे तर त्यांच्याच चांगल्या खाण्याच्या सवयी व चांगली जीवनशैली आपणही आत्मसात करावी हे खरे ना?
तेव्हा तळणीचे गव्हाचे मोदक गव्हाच्या कणकेचेच, आकाराने लहान करा व रिफाईंड तेलाऐवजी शक्यतो साजूक तुपात तळा आणि आस्वाद घ्या - बघा काय फर्मास लागतात.
कणकेचे मोदक अंमळ जास्त खाऊन सुस्ती आली असेल वा अजीर्ण झाले असेल तर काकडी खायला विसरू नका.
गहू वा गव्हाच्या पदार्थांचे अजीर्ण काकडीने कमी होते. म्हणूनच पुरणपोळी ही पोटाला जड झाली तर कणकेच्या अजीर्णावर काकडी आणि हरभऱ्याचा डाळीवर वा पुरणावर कोवळा मुळा हे अजीर्ण कमी करणारे उतारे आहेत.
खोबरे - गेल्यावेळी आपण ओल्या खोबऱ्याचे गुण पाहिले. यावेळी -
सुके खोबरे - हे स्निग्ध, पचायला जरा जड, दाह व मलावष्टम्भ करणारे, रुचकर, बल व वीर्य वाढविणारे आहे.
साखर - ही थंड असून दाह, तहान, उलटी, मूर्च्छा, रक्तदोष व पित्तदोष कमी करते. ही साखर जितके कृत्रिम पदार्थ न वापरता तयार केली असेल तेवढी अर्थातच तब्येतीला चांगली म्हणून ब्लीच न केेलेली साखर शक्यतो वापरावी.
विशेष माहिती -
आपल्याला माहीतच असेल की आपले अनेक भारतीय पण प्रांतीय पदार्थ दुसऱ्या प्रांतातही प्रसिद्ध आहेत. मोदक हे भारताच्या पश्चिम, पूर्व व दक्षिण किनारपट्टीवर स्थानिक पक्वान्न म्हणून प्रसिद्ध आहेतच. संस्कृत व मराठी प्रमाणेच ओरिया, गुजराती व कोंकणी भाषेतही त्यांना 'मोदक'च म्हणतात. तमिळ 'मोदक' वा 'कोळकटै', मल्याळी भाषेत 'कोळकटै', कानडी भाषेत 'मोदक' किंवा 'क़डबू', तेलगू भाषेत 'कुडुमु' म्हणतात.
उकडीचे मोदकाप्रमाणेच पण टोक व मुखऱ्या नसणारे, सारण भरून गोल वळलेले कौळकटै हे केरळ व दक्षिण तामिळनाडूत प्रसिद्ध आहेत. तामिळनाडूत हे कोळकटै गणपतीचाच नेवैद्य मानले जातात.
तसेच ओरिसा, आसाम, बंगाल येथे तांदुळपिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचे सारण भरून घडी घालून केळीच्या पानांवर पातोळ्याप्रमाणे वाफवतात त्याला 'पीठा' म्हणतात.
म्हणजेच आपली खाद्यसंस्कृती, परंपरा भारतभर कश्या पसरल्या आहेत त्यावरूनच किती जुन्या आहेत व अजूनही टिकून आहेत हे जाणवते, आपणही त्या टिकवून पुढे पोचवायला हव्यात. नव्याचे तारतम्याने स्वागत हवेच पण जुने सोडून नव्हे. जुन्याचा आदर व नित्य वापरही हवाच यासाठीच हा लेखनप्रपंच.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 9

#‎गणपती‬ ‪#‎मोदक‬ ‪#‎तांदूळ‬ ‪#‎नारळ‬ ‪#‎गूळ‬ ‪#‎साजूकतूप‬
नमस्कार मंडळी!
आधी आपण पाहिले की जेवणात सहाही रसांचा समावेश असावा. त्यातही सुरुवात गोडाने करावी. त्यानंतर आंबट, खारट पदार्थ, त्यानंतर तिखट, कडू व तुरट पदार्थ क्रमाने घ्यावेत.
आपल्या पारंपारिक जेवणात विशेषतः महाराष्ट्रीयन वा भारतीय जेवणात सुरवात गोडाने वा नैवैद्याने, खीर, पुरण इ. ने करायची पद्धत आहे. तसेच सर्व जेवण झाल्यावर शेवटही तुरट पदार्थाने म्हणजे विडा वा सुपारीने करायची पद्धत आहे आणि ती योग्य आहारक्रमाला व योग्य पचनाला धरूनच आहे.
सध्या मात्र विविध कोर्सेसच्या पाश्चात्य पद्धतींमुळे - सुरुवात भूक वाढविणाऱ्या(?!) तिखट, आंबट पदार्थांनी - सूप्स, व स्टार्टर्सनी केली जाते.
जेव्हा भूक चांगली लागली असेल तेव्हाच जेवावे असा नियम असल्यामुळे - चांगल्या भुकेच्यावेळी जाठराग्नि बलवान् असताना पचायला जड असणारे पदार्थ आधी खाणे योग्य, म्हणून गोड खाणे योग्य. गोड पदार्थांनी वात-पित्ताचे शमनही होते.
तिखट-आंबट पदार्थांनी भूक नसताना ती निर्माण करणे (appetizers) हे कार्य घडते. म्हणजे जेव्हा शरीर/पोट व मन खाण्यासाठी तयार नाही अशावेळी ते मुद्दाम तयार करणे. सूप्स ने भूक लागण्याऐवजी पोट भरतेच असा अनेकांचा अनुभव असेलच. अशा चमचमीत आरंभक वा स्टार्टर्सनी अन्न नीट न पचता वात-पित्ताच्या अनेक तक्रारी निर्माण होतात. तसेच जेवणांती गोड खाल्यानेही कफाचे विकार होतात. पदार्थ तेच पण जेवणाचा क्रम चुकल्यानेही विकार होतात. तेव्हा सुरुवात गोडाने करणे कधीही उत्तम. गोड फळे ही जेवणात सुरुवातीलाच खावीत; जेवल्यावर नव्हे.
आज आपण अशा गोड पदार्थानेच सुरुवात करूया.
आजचा पदार्थ - मोदक. गणपती येऊ घातलेत आणि घरोघरी मोदक तर होणारच. तेव्हा आबालवृद्धांना आवडणाऱ्या या मोदकांविषयीच जाणून घेऊ या.
मोदक या संस्कृत शब्दाचा अर्थच मोद देणारा - आनंद देणारा आणि म्हणूनच गणपतीला प्रिय असा आहे.
कोणत्याही पूजेत नैवेद्याचा मान असतो तसा गणपतीच्या पूजेत मोदकांचाच मान. मोदकांचा आकार हा नारळाप्रमाणे असतो. नारळ हा अर्थातच परिपूर्णतेचे, सुफळतेचे प्रतिक आहे. मोदक उकडीचे असोत वा तळणीचे. वरची पारी ही जितकी पातळ व नितळ, जितक्या पाकळ्या जास्त तितका करणारीचा हात सुग्रण. सुबक, पातळ पारीचे, भरपूर व एकसारख्या मुखऱ्या वा पाकळ्या असलेले, भरपूर सारण भरलेले, फार गोड नाही व अगोडही नाहीत असे मोदक म्हणजे गृहिणीच्या सुग्रणपणाचा व कलेचा कसच. चव, पारी, आकार, सारण हे सर्व जेव्हा उत्तम जमतं तेव्हाच मोदक होतो, तेव्हाच करणारीला व खाणाऱ्यांना दोघांनाही मनापासून मोद - आनंद मिळतो.
सारण भरून केलेले व न भरता केलेले मोदक असेही प्रकार आहेत. न भरता केलेले म्हणजे खव्याचे, आंब्याचे, चॉकलेटचे, तिळाचे, पनीरचे, काजूचे, फुटाण्याचे, तसेच स्ट्रॉबेरी, पिस्ता, इ. चवींचे खव्याचे मोदक म्हणजे फक्त मोदकांचा आकार असलेले बर्फीचे प्रकार.
सारण भरून केलेले मोदकच खरे पारंपारिक मोदक होय.
महाराष्ट्रात विशेषतः दोन प्रकारे मोदक करायची पद्धत आहे. उकडून व तळून. कोकणात तसंच पश्चिम महाराष्ट्रात बहुतांशी उकडीचे मोदक केले जातात. विदर्भ, खानदेश, मराठवाडा, या देशावरच्या भागांमधे बहुतांशी तळलेले मोदक केले जातात. म्हणजेच नारळ मुबलक असलेल्या ठिकाणी ओल्या नारळाचे उकडीचे मोदक करायची पद्धत आहे तर जिथे नारळ होत नाहीत त्या भागात सुके किसलेले खोबरे वापरून मोदक करण्याची पध्दत आहे. हल्ली हेल्थ कॉन्शस लोक बेक्ड मोदकही करतात.
उकडीचे मोदक - उकडीच्या मोदकाला ओले खोबरे व गूळ यांचे शिजवलेले सारण असते. उकडून करायच्या मोदकांमध्ये तांदूळ पिठीचे, कणकेचे, क्वचित् ज्वारीच्या पिठाचे मोदक करून ते उकडतात. तांदळाची उकड काढून, ओलं खोबरं व गूळ यांचं सारण भरून उकडतात. उपवासाला वरईचे मोदकही उकडून करतात. तसेच पोह्याचे पीठ भिजवून तेही उकडून वा तळून मोदक करता येतात. मैद्याची पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचे सारण भरून गोड मोमोज् प्रमाणेही मोदक होतात.
तळणीचे मोदक - तळणीचे मोदक हे कणीक किंवा मैदा किंवा रवा-मैदा यांच्यापासून बनवितात. यात ओले खोबरे-गूळ / ओले खोबरे-साखर / सुके खोबरे-पिठीसाखर असे सारण असते. खव्याचे, सुका मेव्याचे, पुरणाचे सुद्धा मोदक करतात.
पारंपारिक तळणीचे मोदक म्हणजे सुकं खोबरं किसून ते थोडंसं भाजून घेऊन त्यात पिठी साखर, भाजलेली खसखस, चारोळी, सुका मेवा, वेलदोडा पूड वा पंचखाद्य घालून सारण तयार करायचं आणि कणिक वा रवा-मैदा भिजवून त्याची लाटी करून त्यात हे सारण भरून मोदक करायचे आणि तेलात वा तुपात तळायचे. मराठवाड्यात तिळ-गूळाचे सारण भरूनही तळणीचे मोदक करतात व संक्रांतीनंतर येणाऱ्या तिलकुंद चतुर्थीला त्याचा नेवैद्य दाखवतात.
लुसलुशीत उकडीच्या मोदकांवर साजूक तूप घातल्याने त्याची चव ही वाढते तसेच तो पचायलाही मदत होते. मोदक जरा वेळाने निवल्यावर खाण्यातच मजा आहे नाहीतर सारणाने तोंड भाजते. गार झाल्यानंतर तितकासा तो चांगला लागत नाही.
मोदकातील तांदूळ, खोबरे, गूळ हे सर्व पदार्थ पुष्टी करणारे आहेत. कोणताही गोड पदार्थ जसा पचायला जडच तसाच मोदकही. पण तांदूळ-नारळ-गूळ हे एकमेकांना पचवायला मदत करतात.
तांदूळ - तांदूळ हे मधुर, बलदायक, रुचिकर, थंड, वातपित्त कमी करणारे, पचायला हलके असे नित्य सेवन करण्याच्या धान्यांमध्ये श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच रोजच्या जेवणात त्यांचा समावेश योग्यच आहे.
तांदूळ पचायला हलके पण तांदुळाच्या पिठाची उकड पचायला जड असते. त्यामुळे पातळ पारी व बेताचे गोड सारण असलेले, व्यवस्थित उकडलेले मोदक तूप घालून खाणे हेच योग्य.
वजन वाढेल म्हणून तांदूळ वर्ज्य.. म्हणून मोदक वर्ज्य असा विचार नकोच.
हल्ली खोबरे ही कोलेस्टेरॉलच्या भीतीने हद्दपार होत आहे. नारळाने वाईट कोलेस्टेरॉल वाढत नाहीच उलट चांगले कोलेस्टैरॉल वाढते असे आताचे संशोधन सांगते.
नारळ - ओले खोबरे हे पचायला जड, स्निग्ध, थंड, पित्तशामक आहे. शरीरातील दाह, तहान कमी करणारे, बल देणारे, केसांसाठी हितकर, कान्ति वाढवणारे आहे.
गूळ - गूळ हा पचायला जड, उष्ण, कफ-वात कमी करणारा, श्रम-थकवा कमी करणारा आहे. गूळ जेवढा जुना तेवढा वापरायला चांगला.
सध्या तुपाबद्दल बरेच नाराजीचे सूर ऐकू येतात. सर्वच स्नेहांना सरसकट त्याज्य वा वाईट ठरवणे म्हणजे सोने, चांदी, तांबे, लोखंड इ. सर्व धातू एकाच भावाने मोजण्यासारखे आहे.
मुळातच तूप विशेषतः गाईच्या दुधाचे लोण्यापासून कढवलेले तूप हे बुद्धि, कांति, स्मृति वाढवणारे, बल्य, वात-पित्त कमी करणारे, थकवा घालवणारे आहे. जठराग्नि वाढवून, वीर्यवर्धक, दृष्टिला हितकर, शरीराला स्थैर्य, बळकटी देणारे तूप हे रोजच्या जेवणात असायलाच हवे.
तात्पर्य काय - परवाचे संशोधन काल खोटे ठरते, कालचे आज.. तेव्हा पारंपारिक पद्धतींवर जास्त विश्वास ठेवा आणि कॅलरी, फॅट्स् इ. च्या मोजमापात न अडकता आनंदाने बाप्पांचे स्वागत करा, स्वतःही मोदक नक्की कराच, इतरांनाही खाऊ घाला, सणाचा आनंद द्विगुणित करा. मधुमेह असेल वा इतर काही विकार असतील तरच हात आखडता घ्या वा आपल्या वैद्यांच्या सल्लाने वागा. वर्षातून एकदा वा क्वचितच होणारे मोदक यावेळी मात्र निश्चिंत मनाने खा. अजीर्ण होऊ नये म्हणून जरा दोन घास कमीच जेवा इतकंच.
पुढील रविवारीही गणपती असणार आहेत - तेव्हा मोदकांविषयी थोडी अधिक माहिती पुढील रविवारी.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग


लेख क्रमांक 8

नमस्कार!
आधीच्या लेखांमध्ये आपण आहाराचे व आहारसेवनाचे नियम यांविषयी माहिती घेतली. ते लक्षात ठेवणे सोपे जावे म्हणून चरकाचार्यांनी सांगितल्याप्रमाणे थोडक्यात त्यांची उजळणी खालीलप्रमाणे:-
1. अन्न हे नेहमी गरम, ताजेच खावे. ताजे अन्नच सर्वाधिक चविष्ट लागते व गरम, ताजा पदार्थ पचविणे हे शरीरालाही सोपे असते.
2. अन्न हे नेहमी स्निग्ध असावे – म्हणजे योग्य त्या फिल्टर्ड तेलांचा (उदा. शेंगदाणा, तीळ, मोहोरी, खोबरेल इ. देशानुसार) (रिफाईण्ड तेल अजिबात नको) व साजूक तूप, साय, घरचे लोणी यांचा समावेश जेवणात आवर्जून करा. चांगल्या स्नेहाने पोटातील अग्नि अन्न योग्य प्रकारे पचवू शकतो.
3. आहार योग्य मात्रेतच घ्या. योग्य मात्रेतील आहार पचल्यावर अन्नाचे सर्व फायदे मिळतात, कमी अन्नाने कुपोषण होते व अतिखाल्ल्याने पचनशक्तिवर ताण येतो.
4. आधीचे अन्न वा आहार पचल्यावरच पुढील अन्न वा आहार घ्यावा. अशाने अपचन व त्यातून होणारे बहुतांशी सर्व विकार टाळता येतात.
5. एकमेकांना पूरक असेच पदार्थ जेवणात असावेत. एकमेकांना मारक पदार्थ खाऊ नयेत.
6. आपण राहतो त्या भौगोलिक हवामानातील पदार्थच रोजच्या जेवणात असावेत. तसेच खाण्याची वा जेवण्याची जागा व वातावरण ही शांत, आनंदी असावे.स्वतःच्या प्रकृतीला व काही व्याधी असतील तर त्या व्याधीत पथ्यकर असेच अन्न असावे.
7. जेवणाची व अन्न शिजविण्याची साधनसामग्री योग्य असावी. कोणत्याही भांड्यात, विशेषतः प्लॅस्टिक, मेलामाईन, थर्माकोल यांचा वापर टाळावा. तसेच नॉनस्टिक भांड्याचाही वापर टाळावा.
8. घाईघाईत किंवा रेंगाळत जेवू नये.
9. न हसता, न बोलता जेवावे.
10. प्रसन्नतेने व मन लावून जेवावे.
पटल्यास स्वतःच्या स्वयंपाकघरात प्रिंट काढून चिकटवा, आपल्या नातेवाईक, मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा. सोशल नेटवर्किंगवर ही माहिती शेअर करताना या पेजचा जरूर उल्लेख करा.
आतापर्यंत आपण अन्न कसे व का सेवन करायचे याविषयी माहिती घेतली. पुढील लेखापासून प्रत्यक्ष अन्नातील घटक, त्यांचे गुणधर्म यांची माहिती करून घेऊया.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग


लेख क्रमांक 7 (क्रमशः)

नमस्कार!
5. देश – म्हणजे सभोवताल वा परिसर व तेथील हवामान, तिथे पिकणारी धान्ये, फळे, भाज्या यांचा योग्य वापर. सध्या जग म्हणजे ग्लोबल व्हिलेज झाले आहे. इटलीतला पास्ता सिंगापूर मध्येही मिळतो आणि उत्तम चायनीज जेवण अमेरिकेतही मिळते. भारतापुरते बोलायचे तर वाळंवटासारखे रूक्ष प्रदेश ते आसाम-मेघालय वा केरळ सारखे सदाहरित, आर्द्र, दमट हवामानाचे प्रदेश वा पुणे-नाशिक सारखे साधारण प्रदेश. या प्रत्येक ठिकाणी हवामानाप्रमाणे धान्य व भाज्या, फळे पिकतात व तेच तिथल्या हवामानाला खाणे हे योग्य आहे. बघा बरं – दक्षिणेकडची इडली – दिल्लीत त्याच चवीची बनत नाही आणि पचतही नाही. तसेच गव्हाचे पदार्थ दक्षिणेकडे खाण्याचे प्रमाणही कमीच. पण हा भेद लक्षात न घेता सरसकट दाक्षिणात्यांचा आहार असलेले इडली-डोसे नाश्त्याचे पदार्थ झाले आणि उत्तरेकडचे गव्हाचे पदार्थ रोटी, फुलका हे दुपारच्या जेवणात सामावले गेले – ते केवळ सोयीमुळे – शरीर व आहारच्या योग्यायोग्यतेचा विचार करून नव्हे. पूर्वीपासून व्यापारामुळे वा आक्रमणांमुळे, स्थलांतरामुळे जागतिक अनेक पदार्थांची देवण-घेवाण झाली पण त्या-त्या परदेशी पदार्थांचा समावेश हळूहळू झाला. त्या त्या पदार्थांचा वापर हळूहळू वाढला, शरीराला त्या पदार्थांची ओळख करून दिली गेली, ते पचवायला – सवयीचे व्हायलाही वेळ दिला गेला. काल जाहिरात दिसली आणि आज लगेच तो पदार्थ पोटात असे नाही झाले. तो पदार्थ कसा आहे, त्यावर काय संस्कार केले तर तो आपल्याला पचेल, तो कधी खावा याविषयीचे आडाखे बांधले गेले असावेत व त्यानुसार तो आपल्या पद्धतीत कसा बसेल त्याप्रमाणे त्यांचा वापर केला गेला. उदा. – बटाटे. मूळचे भारतीय नसलेले बटाटे – आज कोणत्याही पदार्थ – उपवासाचा वा मेजवानीचा – बटाट्याशिवाय करणे म्हणजे जरा डोके खाजवावेच लागते . आज नैवेद्याच्या पानातही बटाटा नसेल तर समाधान होत नाही ना? नवनवीन पदार्थ खाण्याची हौस सगळ्यांनाच असते पण ते जरा तारतम्याने. ह्ल्ली घर हेही हॉटेलचे मेन्यू कार्डप्रमाणे आज पंजाबी, उद्या दाक्षिणात्य, परवा राजस्थानी, गेला बाजार विकेंडला चायनीज, मेक्सिकन, थायी, इटालियन... अबब.. पुरे.. कोणत्याही एका पदार्थाची शरीराला सवय व्हायला वेळ द्यावा लागतो, त्यात सर्व जगच पोटात लोटू पाहायचे असते आपल्याला. पंचतारांकित हौटेलातील बुफे प्रकरण म्हणजे साक्षात अन्नाचे विश्वरूपदर्शनच. पण त्यासाठी पोटालाही कृष्णाप्रमाणे गोवर्धन पेलण्याची ताकद असायला हवी, औषधरूपी गोपाळांनी काठ्या लावून तो उदरातला डोंगर व्यवस्थित पचणार नाही.
6. काल – अन्न सेवन करण्याचा योग्य काळ महत्त्वाचा. आधीचे अन्न पचल्यावरच पुढचा आहार घ्यायला हवा. आधीचे जेवण जर पचले नसेल तर जसे दह्यात कितीही दूध घाला ते नासतच जाते, त्याचप्रमाणे आधीचे अन्न न पचता त्यावर पुढील अन्न घातले गेले तर ते पचनशक्तिवर ताण निर्माण करते व त्यातून अनेक रोगांची निर्मिती होते. दिवसा 10 ते 12 या वेळात मुख्य दुपारचे जेवण घेणे अगदी योग्य. त्यातूनही ज्यांना जमत नाही त्यांनी निदान 2 पूर्वी तरी हा आहार घ्यायलाच हवा. तसेच रात्रिचे जेवण ही सूर्यास्तापूर्वी किंवा नंतर परंतु 9 च्या आत घ्यायला हवा. काळानुसारही अन्नात बदल करायला हवेतच. स्निग्ध, पचायला जड पदार्थ हिवाळ्यात नियमित खाणे योग्य होय तर पावसाळ्यात अग्नि वा पचनशक्ति मंद झालेली असताना स्निग्ध पण हलके, गरम अन्न-पान हे योग्य. दिवसातील वेगवेगळ्या वेळा, ऋतु या बरोबरच वयाच्या अवस्थांनुसारही खाण्यापिण्यात बदल करायला हवेत. वाढीच्या वयात पौष्टिक पदार्थ जसे योग्य तसेच वृद्धापकाळात पौष्टिक पण पचायला हलके, पथ्यकर पदार्थ खायला हवेत. स्त्रियांच्याही बाला-कुमारी-स्त्री-गर्भवती-माता-रजोनिवृत्ता या अवस्थांनुसारही खाण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जसे हे काल खाणारा व निसर्गातील काळ व शारीरिक अवस्थांतील काळ यांचा जसा विचार करायला हवा तसाच विचार अन्न-धान्य-फळे-भाच्या यांच्या नैसर्गिक उपलब्धिंच्या काळाचाही विचार करायला हवा. काही फळे, भाज्या,धान्ये ही विशिष्ट ऋतुनुसार मिळतात तर काही बारमाही मिळतात. आंब्याचे महत्त्व उन्हाळ्यात जितके तितके बारमाही मिळायला लागल्यावर राहिल काय? आता वर्षभर लोक आम्रखंड, आमरस, पन्हे या गोष्टी खाउ-पिऊ शकतात पण नैसर्गिकपणे मिळणारा रसरसलेला आंबा कुठे आणि कृत्रिम द्रव्ये घालून टिकवलेले बर्फात टिकवलेले वा बाटलीबंद वा कॅन्ड पदार्थ – हे फक्त चवीचेच चोचले. एरवी वापरताना त्यांचे प्रमाण नगण्यच व क्वचितच खावे. रोगाच्या अवस्थांनुसारही अन्नपानाचे नियम बदलतात तेव्हा त्याविषयी वैद्यांकडूनच सल्ला घ्यावा.
7. उपयोग संस्था – उपयोगसंस्था म्हणजे अन्नसेवनाचे नियम. जसे आधीचे अन्न पचल्यावरच पुढचा आहार घ्यावा तसेच तो कसा कुठे कोणत्या स्वरूपात सेवन करावा इ. ही लक्षात घ्यायला हवे. अन्न हे सुखाने खाता येईल इतपत गरम, स्निग्ध (तेलकट वा तळलेले नव्हे), योग्य प्रमाणात, विरुद्ध नसलेले हवे. तसेच मनस्थितीही शांत, प्रसन्न हवी. अन्न हे न हसता, न बोलता, अति घाईने वा रेंगाळत सेवन करू नये. अन्न ज्याठिकाणी सेवन करायचे आहे ते ठिकाणही योग्य हवे. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत, उभ्याने, हसत, गप्पा मारत, डास-माशा हाकलत, वाहनांच्या वा वाद्यांच्या गोंगाटात अन्न खाणे हा सध्याच्या तरुणाईच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग झाला आहे. घरीही शांतपणे कुटुंबियांबरोबर शांतपणे, मोजके पण प्रेमळ संवाद साधत जेवायची पद्धतही लोप पावत आहे. कानात बूचे घालून वा टीव्ही वरील नवरसांनी भरलेल्या मालिका वा कार्यक्रम बघत जेवणे म्हणजे नुसतेच पोट भरणे. नावडते पदार्थ मुलांच्या पोटात घालायची आईची आवडती जागा म्हणजे टीव्ही. त्याचा बघता बघता कधी अतिरेक होतो कळतच नाही.
8. उपभोक्ता – अन्न-पान घेणारी व्यक्ती म्हणजे उपभोक्ता – म्हणजे आपण स्वतः. वरील सर्व नियम पाळताना आपण स्वतः अन्न-पान कसे घ्यावे – स्वतःच्या तब्येतीनुसार, तक्रारींनुसार, शारीरीक-मानसिक अवस्थेनुसार, पचनशक्तिनुसार, आधीचे अन्न पचल्यावरच व भूक-तहान लागल्यावरच अन्न-पान सेवन करावे. स्वतःचे शरीर व मनःस्थिती योग्य असताना खाल्ले अन्न हेच सर्व फायदे मिळवून देते. हल्ली उठल्या-उठल्या काहीतरी तोंडात घातल्याशिवाय लोकांचा दिवस सुरू होत नाही. भूक असो वा नसो, आंघोळ झालेली असो वा नसो, पोट साफ झालेले असो वा नसो – तोंड धुतले की खाणे सुरू. कालांतराने सकाळी खाण्याऐवजी औषधांनीच दिवसाची सुरूवात करावी लागते तरी चुकीच्या सवयी सोडाव्यात, त्यात बदल करावेत हे लक्षातच येत नाही.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे।।
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म। उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।
खरोखर जसे यज्ञकर्म करताना योग्य वेळ, शांतता, पावित्र्य, योग्य सामग्री लागते तसेच अन्नसेवन करतानाही आवश्यक आहे. लहानपणापासून हा श्लोक आपण म्हणत, ऐकत असतो, पण तो उमजून त्याप्रमाणे वागणे हे जेव्हा जमेल तेव्हाच खरे.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 6

नमस्कार!

आहाराचा समयोग साधण्यासाठी म्हणजेच योग्य आहार घेणे व तो पचवून त्याचे पूर्ण फायदे मिळणे यासाठी आयुर्वेदाने 8 गोष्टींचा विचार करायला सांगितले आहे. त्यांना म्हणतात आहारविधिविशेषायतन. थोडक्यात आहाराचा योग्य-अयोग्य विचार करताना तो खालील निकषांवर करावा.
1. प्रकृति
2. करण
3. संयोग
4. राशि
5. देश
6. काल
7. उपयोगसंस्था
8. उपभोक्ता
आयुर्वेद हे शास्त्र शरीर हे एखाद्या यंत्राप्रमाणे काळ-काम-वेग किंवा ऍव्हरेज किती देते मग त्या शरीराला कॅलरीज् किती घालाव्या अशा भाषेत बोलत नाही. मुळात कॅलरीज् ही संकल्पना ही पूर्णतः तर्कशुद्ध वा शास्रीय नाही पण त्याविषयी नंतर कधीतरी. आयुर्वेद हे शरीराला धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळविण्याचे साधन मानते. अशा या शरीराचे व मनाचे रोग होऊ नयेत म्हणून योग्य खाणे हे फार फार महत्त्वाचे आहे याविषयी तर आता दुमत नसावे. रोगाच्या चिकित्सेत असे म्हटले आहे की जर पथ्य नीट पाळले गेले तर औषधाची गरजच काय, आणि जर पथ्य पाळायचे नसेल तर औषधाचा उपयोग काय? यावरुनच योग्य खाणे मग ते स्वस्थ माणसाने असो वा रुग्णाने किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट आहे. विशेषतः हृद्रोगी वा प्रमेही लोकांचे उदाहरण घ्या बरं. पथ्य पाळलेच नाही आणि फक्त औषधावरच विसंबून राहिले तर चालेल का?
तर या वरील आठ गोष्टींचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
1. प्रकृति – येथे प्रकृति हा शब्द आहाराशी संबंधित आहे. म्हणजेच पदार्थाचा स्वभाव, थंड/गरमपणा, पचायला जड वा हलकेपणा इ. व्यवहारात आपण नेहमीच बघतो व विचार करतो की सामान्य शाकाहारी जेवणापेक्षा मांसाहारी जेवण पचायला जड असते, गोड पदार्थ तिखट पदार्थांपेक्षा पचायला जड असतात, इ. एकेरी पदार्थांबाबत विचार करताना गहू हा तांदळापेक्षा पचायला जड असतो, मांस हे भाज्यांपेक्षा पचायला जड असते, दुधी, दोडका या भाज्या बटाटे, पनीर इ. पेक्षा पचायला हलक्या व त्रास न करणाऱ्या असतात इ. नेहमीच्या तांदुळापेक्षा साठेसाळी हा तांदूळ पचायला हलका व पथ्यकर असतो इ.
2. करण – करण म्हणजे पदार्थांच्या वर होणारे वेगवेगळे संस्कार. संस्कारांमुळे पदार्थाचे गुणधर्म वाढतात वा कमी होतात किंवा पूर्ण बदलतात ही. उदा. – तांदुळ हे पचायला हलके. त्यातही साळीच्या लाह्या या पचायला भातापेक्षाही हलक्या. पण चुरमुरे व पोहे, इडली-डोसे इ. तांदुळाचे पदार्थ, तांदुळाच्या पिठाची उकड, विविध भाज्या, धान्ये, मांस इ. घालून केलेले पुलाव वा बिर्याणी इ. सर्व पचायला जड असतात. तेव्हा पथ्याचे पदार्थ म्हणताना रुग्ण व रोगानुसार विचार करणे महत्त्वाचे. पथ्य म्हटल्यावर सरसकट इडली पचायला हलकी वा तांदुळाची उकड चालेल असे म्हणणे बरोबर नाही. किंवा दूध आवडत नाही तर दही खा वा ताक प्या वा पनीर खा हे म्हणणेही बरोबर नाही. विशेषतः दही हे सूज वाढवणारे आहे तर ताक हे सूज कमी करणारे आहे. दह्यातील हा बदल ते घुसळल्यामुळे व पाणी घातल्याने होतो. आधुनिक आहारशास्त्रानुसार यात पाण्याखेरीज काहीच घातले नाही इतपतच मर्यादित विचार आहे आणि म्हणूनच त्यांच्या मते दही वा ताक दोन्हीही सारखेच.
तसेच कच्चे अन्न खाण्यापेक्षा त्यावर अग्निसंस्कार झालेले अन्न पचायला तुलनेने हलके असते. चुलीवरचे अन्न, उकडलेले अन्न, विस्तवावर प्रत्यक्ष अग्निवर ठेवून शिजवलेले अन्न, मायक्रोव्हेवमध्ये शिजवलेले अन्न अशा अनेक प्रकारे शिजवलेल्या अन्नाचे गुण वेगवेगळे व परिणाम ही वेगवेगळे. तसेच भाजलेले, उकडलेले, तळलेले, कच्चे इ. प्रत्येक प्रकारात अन्नाचे गुण बदलतात. म्हणून केवळ दुधी हा हृद्रोग्यासाठी हितकर असे म्हणून ज्यात-त्यात व कशाहीप्रकारे शिजवलेला दुधी खाऊन चालणार नाही. पारंपारिक बिन मसाल्याची भाजी न करता दुधीचे कोफ्ते, पुऱ्या, पराठे, हलवा, पावभाजी इ. अनेक प्रकारे खालेल्ल्या दुधीचे परिणाम हवे तसे मिळणार नाहीत, फक्त मानसिक समाधान (खोटे) मिळेल.
3. संयोग – संयोग म्हणजे पदार्थांचे एकत्रिकरण. जसे कच्चे पोहे व दूध हा संयोग. पोहे हे दूध-साखरेबरोबर खाल्ले असता उत्तम बलदायक आहेत. तसेच पोह्याचे अजीर्ण झाले असता दूध प्यायल्यानेही पोहे पचायला व त्याचे अजीर्ण कमी व्हायला मदत होते. याउलट दूध व आबंट पदार्थ, फळे, तिखटमिठाच्या पदार्थासोबत खाणे हा विपरीत संयोग. याने दोष वाढून रोगनिर्मितीला वाव मिळतो. तसेच दही व चिकन, मासे व दूध, मध गरम करणे वा गरम पदार्थासोबत खाणे वा गरम पाण्यात घालून पिणे हे विकृतच.
4. राशि – म्हणजे प्रमाण. पदार्थाचे वा आहारचे प्रमाण हे व्यक्तिसापेक्ष बदलते. जेवणातील प्रत्येक घटकाचे प्रमाण व संपूर्ण जेवणाचे प्रमाण या दोन्हीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. सरसकट वयोमानानुसार किती खावे असे न सांगता भुकेप्रमाणे व पचनशक्तिप्रमाणे खावे हे उत्तम. तसेच आपल्या पांरपारिक जेवणात मुख्य धान्य गहू, तांदूळ, क्वचित ज्वारी हे असते व त्याला डाळींची, भाज्यांची जोड दिलेली असते. लोणचे-चटण्या या चव वाढविण्यासाठी, अन्न पचायला मदत करण्यासाठी असतात. पण म्हणून भाजी चिमूटभर व लोणचे वाटीभर असेतर आपण जेवत नाही व तसे जेवूही नये. चमचाभर ठेचा वा लोणच्याबरोबर पूर्ण जेवण संपवणारी माणसे आहेत, पण हे योग्य नाही.
(क्रमशः)
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 5

नमस्कार!
आधीच्या लेखांमध्ये आहाराच्या अयोग-अतियोग-मिथ्यायोगाबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेतली. आज आहाराच्या समयोगाविषयी माहिती घेऊ या.
मंडळी, आधीचे लेख वाचताना एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल ना? ती अशी की – चुकीच्या आहार सेवनाने म्हणजेच आहाराच्या अयोग-अतियोग-मिथ्यायोग झाल्याने निर्माण झालेले आजार जर दूर करायचे असतील तर काय करायला हवे आणि काय नको हे समजून घेताना केवळ त्या चुका टाळणे एवढेच पुरेसे नाही तर योग्य पद्धत अवलंबणे हेही महत्त्वाचे आहे. खरेतर कोणत्याही चुकीच्या वा घातक गोष्टीने त्रास झाला तर ती गोष्ट पूर्णपणे बंद करणे गरजेचे असते हे आपण बघतो, जमेल तसे पाळतो पण त्या चुकीच्या गोष्टीचा प्रभाव कमी करण्यासाठी शरीराला हितकर अश्या चांगल्या गोष्टींचा वापरही करायला हवा हेही तितकेच खरे, हो ना? जसे हृद्रोग्याने आपल्याला रोग का झाला याचे कारण समजून घेऊन ते बंद करायला हवेच पण त्याचबरोबर शरीराला हितकर अशा चांगल्या सवयींचा अंतर्भाव नियमितपणे करायलाच हवा. जेवणात तेल-तूप पूर्ण बंद करणे, ओट्स्, जवस, इ. धान्यांचा वापर वाढवणे हा त्यावरचा पूर्ण उपाय नाही तर म्हणजेच आहाराच्या मिथ्यायोगाने झालेल्या हृद्रोगात, स्निग्ध पदार्थांचा अयोग (तेल-तूप पूर्णपणे बंद करणे) वा काही पदार्थांचा अतियोग (ओट्स्, नवनवीन तेले, जवस यांचा अमर्याद वापर करणे) हा त्यावरचा पूर्ण उपाय नसून संपूर्ण शरीराला आणि विशेषतः हृदयाला हितकर अश्या द्रव्यांचा, सवयींचा, पद्धतींचा वापर नियमित करणे व त्यापासून दुसरे कोणतेही आजार निर्माण न होता, आहे तोच आजार आटोक्यात ठेवता येणे वा बरा करता येणे म्हणजेच समयोग साधणे असे म्हणणे बरोबर ठरेल.
तर समयोग साधण्यासाठी या छोट्या छोट्या सवयी कोणत्या, कोणकोणते पदार्थ आपण उठल्यापासून निजेपर्यंत पोटात घालत असतो याचा सारासार विचार करायला हवा.
1. आपल्या रोजच्या छोट्या-छोट्या सवयींकडे डोळसपणे बघायला हवे ही पहिली पायरी.
2. चुकीच्या सवयी कोणत्या हे कळले की त्या बदलल्या पाहिजेत ही दुसरी पायरी.
3. बदलल्यानंतर कोणत्याही जाहिरातींना भुलून न जाता त्या चांगल्या सवयींवर ठाम राहाणे ही तिसरी पायरी. असे घडले तरच आपण आहाराचा व गंभीरपणे विचार करत आहोत असे म्हणता येईल.
आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्तिची लक्षणे सागितली आहेत ती अशी –
समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियाः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनः स्वस्थ इत्यभिधीयते।।
सुश्रुतसंहिता सूत्रस्थान 15/10
म्हणजेच सोप्या भाषेत - शरीरातील सर्व घटक योग्य प्रमाणात असणे, भूक वेळच्यावेळी लागणे, त्यानंतर खाल्लेल्या अन्नाचे पचन योग्य होणे, शरीरातील सर्व लहान-मोठ्या क्रिया सुरळीत चालू असणे, आत्मा, मन व इंद्रिय हे प्रसन्न असणे ही ती लक्षणे होय.
WHO नेही Health ची व्याख्या सांगताना म्हटले आहे -
Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity.
“मला काहीही होत नाही, रोज मी दही खातो, शिकरण खातो, मी अजून तरी धडधाकट आहे” वा “रोज मी भेळ खाते” वा “रोज मी दोन पेग दारु पितो - काय धाड भरलीये मला?” अशी वाक्ये आपल्याला नेहमी ऐकू येतात. संवाद तेच फक्त चुकीच्या द्रव्यांची यादी न संपणारी. आता असे म्हणणे म्हणजे स्वतःबद्दल अति-आत्मविश्वास, चुकीच्या गोष्टीचे समर्थन आणि भविष्याकडे डोळेझाक असेच म्हणायला हवे.
किंवा - "पूर्वी मी फार तिखट खात होते, आताशा मात्र नाही चालत" म्हणजेच त्या पूर्वी खाल्लेल्या तिखटाचे दुष्परिणाम शरीर अजूनही भोगतंय आणि तिखट खाण्याची वा पचविण्याची शरीराची सहनशक्ती त्यामुळे कमी झालेली आहे. बघा बरं, लहानपणी खाल्लेली चिंचा,कैऱ्या,पेरू आता या मध्यम वा उतार वयात खायचा प्रयत्न केल्यास त्रास होतोच. ते पदार्थ वाईट नसतातच फक्त ते सध्या आपल्या शरीराला हितकर आहेत वा नाही याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा.
हितकर असे अन्न-पान योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने शिजवून, योग्य प्रकारे व नियमित सेवन करणे, ते पचविणे व एकूण देनंदिन व्यवहारही त्याला पूरक असा वा कमी त्रासदायक करणे म्हणजे समयोगाच्या दृष्टीने आपण योग्य पाऊल उचलले आहे असे म्हणायला हरकत नाही.
आहाराच्या समयोगाचे फायदे म्हणजे स्वास्थ्य मिळणे व ते दीर्घकाल टिकणे हे वेगळे सांगायला नकोच, नाही का? अर्थातच आहार बरोबर विहार व आचार हेही महत्त्वाचेच व सर्व एकमेकांवर अवलंबून असल्याने आहारानुसार विहार-आचार व विहार-आचारानुसार आहार हा बदलायलाच हवा. जसे रोज सात्त्विक पूजा करणाऱ्या वा साधना करणाऱ्या योग्याने तामसी आहाराच्या वाटेला जाऊच नये तसेच. विद्याभ्यास करणाऱ्यांनीही मीठ कमीत कमी खावे कारण त्याने इंद्रियांवर विशेषतः डोळ्यांवर वाईट परिणाम होतो परंतु आजच्या मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण - टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर यांचबरोबर विविध कंपन्यांचे वेफर्स, बटर-चीझयुक्त पदार्थ, वेगवेगळे बाजारी सॉस, लोणची, फरसाण, बिस्किटे, पापड, रेडीमेड शीतपेये हेही आहेत. त्यामुळे फक्त गॅजेट्स्च्या वापरावर बंदी घालून पुरणार नाही, आहारातील बदल प्रामुख्याने करायलाच हवेत.
विषय आजच्या एका लेखात संपणार नाही म्हणून समयोगासाठी ही प्रस्तावना. समयोग साधण्यासाठी काय कसे खावे-प्यावे, कसे पचवावे, त्यांचे फायदे व त्यापासून स्वास्थ्य कसे मिळवावे व राखावे हे पुढच्या लेखापासून विस्तृतपणे जाणून घेऊया.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 4

नमस्कार!
आधीच्या लेखात आपण अयोग व अतियोग याविषयी माहिती घेतली. आजचा विषय – आहाराचा मिथ्यायोग.
खरंतर आज जे काही खाण्याच्या नावाखाली केले व खाल्ले जाते ते बहुतांशी सर्व मिथ्यायोग या प्रकारात मोडते असे म्हणायला हरकत नाही. आजच्या बहुतांशी रोगांचे मूळही या मिथ्यायोगात आहे.
मिथ्या म्हणजे अयोग्य, विकृत. जे खाऊ नये ते खाणे, जसे खाऊ नये तसे खाणे, जेव्हा खाऊ नये तो व्हा खाणे. अन्न म्हणून उपयोगी असणाऱ्या वा फायद्याच्या धान्य वा पदार्थांऐवजी जे अन्न नाही ते खाणे.
उदाहरणार्थ – आज-कालचे बहुतांशी बाजारी पदार्थ विशेषतः तयार अन्न वा प्रोसेस्ड फूड. मूळ घटक किती सत्त्ववान आहे या पेक्षा तो किती स्वस्त आहे, किती मुबलक उत्पन्न होतो, किती कमी खर्चात तो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो यावर बहुतांशी कंपन्यांचे लक्ष असते व त्यातच त्यांचा सर्वाधिक स्वार्थ=फायदा दडलेला असतो.
उदा- ब्रेकफास्ट फूड म्हणून मक्याच्या रोस्टेड पोह्यांना (corn flakes) जगभर मान्यता मिळाली आहे. किंमत कमी(?), चवीसाठी अनेक स्वादांमध्ये उपलब्ध, शिवाय आबालवृद्धांसाठी उपयुक्त अशा जाहिराती पाहिल्यावर कोणाला भुरळ पडणार नाही? दूध घातले तर अधिक पौष्टिक अशी समजूत झाल्याने असल्याने मागणी वाढली नाही तरच नवल. विदेशी कंपन्यांबरोबरच देशी कंपन्याही त्यात मागे नाहीत. जणू काही विदेशी कोणतीही यशस्वी गोष्ट दिसली की ती भारतातही तयार झालीच पाहिजे यालाच प्रगती म्हणत असावेत – मग ती चुकीची गोष्ट वा वस्तू भारतीय ग्राहकांसाठीच का असेना.
वस्तुस्थिती अशी आहे की – पूर्वी मका हा गुरांचे अन्न म्हणून मिळत असे. अगदी गुरांनी खाण्यालायकच कडक दाणे, रवंथ करावा लागेल असे पीक. त्याचेच कोवळे कणीसच देशी वाण आपल्याकडे खात असत तोही सर्रास नव्हे.
सध्या मिळणाऱा गोड मका (sweet corn) हा GMO – Genetically Modified Organism या स्वरूपात मिळतो. कडक मक्यावर अमेरिकन शास्त्रज्ञांनी प्रयोग करून तो मऊ, गोड बनवला. जरा गूगल वर शोधलेत – तर बरीचशी माहिती मिळेल. GMO हा आजच्या लेखाचा विषय नाही म्हणून इथे सविस्तर आत्ता लिहित नाही, पुन्हा कधीतरी नक्की लिहिन.
हाच GMO मका आज सर्व पदार्थांमध्ये वापरला जातो. म्हणजे जे धान्य खाण्याच्या लायकीचे नाही ते कंपन्या कशा बेमालूमपणे आपल्याला खायला घालतात याचे हे उत्तम उदाहरण. शिवाय हे बनवताना – कितीतरी कृत्रिम वास व चवींचे घटक व प्रिझर्व्हेटिव्ज वापरली जातात त्याचेही दुष्परिणाम आहेतच.
हे झाले 1 उदारहण. मिथ्यायोगात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो यासाठी एक-दोन लेख अपुरेच पण थोडक्यात समजून घेण्यासाठी खालील गोष्टी उदाहरणादाखल पाहूया.
1. स्वतःची प्रकृती, राहाण्याचे ठिकाण, पचनशक्ति, वातावरण व ऋतु, शारीरिक बल, वय या नुसार आहाराचे नियम न पाळणे.
2. चांगले व वाईट पदार्थ एकत्र करून खाणे – उदा – शिळे व ताजे पदार्थ एकत्र करून खाणे.
3. पहिले अन्न न पचता दुसरे अन्न पोटात घालणे.
4. चांगलाच पदार्थ पण विकृत करून खाणे – उदा – दूध मुद्दाम नासवून त्याचे चीज, पनीर इत्यादि करून खाणे.
5. विरुद्धाहार – उदा – दूध व फळे दोन्ही गुणकारी आहेत पण स्वतंत्रपणे खाल्यासच. दुधाचे फायदे मिळण्यासाठी नुसते दूध प्यावे कोणतेही खारट,आंबट,तुरट,तिखट,कडू पदार्थ न घालता. गोड पदार्थही शक्यतो सल्ल्याशिवाय घालू नयेत. हल्लीच्या मुलांना नुसते दूध दिले तर पालकांनाही ते पूर्णान्न वाटत नाही, मुलांनाही दुसरी चव घातल्याशिवाय ते घशाखाली उतरत नाही. असो. तर फळे ही गुणकारीच पण दुधाच्या संयोगाने तो पदार्थ विकृत होतो आणि फायदे दोन्हीचेही मिळत नाहीत, फक्त चवीचे तात्पुरते समाधान.
6. अन्न पुन्हा-पुन्हा गरम करून खाणे, मुद्दाम शिळे खाणे.
7. आंबवलेले, नासलेले, तार आलेले, बुरशीयुक्त अन्न खाणे.
8. चुकीच्या पद्धतीने जेवणे – उदा – गोडाने सुरुवात करण्याऐवजी जेवल्यावर गोड खाणे
9. स्वतःसाठी योग्य नसलेले अन्न खाणे. एखाद्या व्यक्तिला त्याच्या तब्येतीसाठी वा तक्रारींसाठी काही विशिष्ट पदार्थ सुचवला जातो. उदा. जवस. पण याचा अर्थ जवस हे सर्व प्रकृतीच्या सर्वच लोकांना चालतील असे नाही. पण हा सारासार विचार न करता सर्रास जवसाचा आजकाल सगळे अनिर्बंध विना सल्ला वापर करताहेत. जवसाविषयी माहिती पुढील पैकी एका अंकात नक्की लिहिणार आहे.
10. चुकीच्या वातावरणात खाणे – जसे मोबाईल वा TV बघत, पुस्तक वाचत इ.
वरील गोष्टी वानगीदाखलच पण आज जास्त दिसून येतात. त्यात बदल कसा व का घडवायचा हे त्या त्या विषयी सविस्तर लिहिनच. आजसाठी इतके पुरे. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी अन्नाचा समयोग म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग


आहारयोग

लेख क्रमांक 3

आज आहाराच्या अतियोगाविषयी जाणून घेऊया.
अतियोग म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाणे, जास्त वेळा सेवन करणे, भूक न लागताही खाणे, वेळेवर वा अवेळी पण पचायला अति जड, अति स्निग्ध, थंड, एकाच प्रकारचे वा रसाचे अन्न उदा फक्त गोडच वा तिखटच अन्न खाणे, जेवताना 2 घास कमी खावे असे असूनही केवळ जिभेला चांगले लागतेय म्हणून खाण्या-पिण्याचा अतिरेक करणे, तडस लागेपर्यंत जेवणे, जेवल्यावर सुस्ती, जडपणा जाणवणे म्हणजे अतियोग.
वजन जास्त असणारे वा मेद/चरबी जास्त असणार्या व्यक्तिंमध्ये अन्न प्रमाणतः जास्त असतेच असे नाही, मात्र पचायला जड, अयोग्य, अतितेलकट-तुपकट अन्नपदार्थ वेळी-अवेळी खाण्याने शरीर अतिबाळसेदार, फोपसे होते.
काही व्यक्ति सांगतात - की अगदी हवा ही सुद्धा अंगी लागते smile emoticon.. विनोद बाजूला ठेवला तर हवा ही अंगी लागते यासाठी पूर्वीचा चुकीचा आहार-विहार कारणीभूत आहे आणि त्याचे परिणाम आजही दिसताहेत असेच म्हणायला हवे.
आधीच्या लेखात वजन कमी करण्याचे अशास्त्रीय व चुकीचे पर्याय वापरले जातात असे लिहिलेय. त्याचप्रमाणे वजन वाढविण्यासाठीही फक्त केळी, वेगवेगळे flavoured शेक्स्, High protein, Soy, Malt इ.युक्त supplements, यांचा अयोग्य, अधिक व अनिर्बंध वापर याचेही दुष्परिणाम कालांतराने दिसतातच. केवळ खाणेच नव्हे तर Steroids सारख्या औषधांनीही वजन वाढणे, सूज येणे असे दुष्परिणाम दिसतात. जाहिरातींच्या मागे न लागता, आपल्या आयुर्वेदीय तज्न्य वा वैद्याला विचारून आपल्या पचनशक्ति व भुकेप्रमाणे खाणे हेच योग्य आहे.
बरे असे अति व अयोग्य खाण्याचे इतर दुष्परिणाम काय तर याने फक्त शरीरातील चरबीच जास्त वाढते, पण इतर सर्व शरीरघटकांचे योग्य पोषण न झाल्याने, दिसायला शरीर मोठे मात्र ताकद नाही असे होते, सूज येते, घाम येतो, कायम जडपणा, सुस्ती, निरुत्साह जाणवतो, केसांचे, त्वचेचे रोग होतातच शिवाय प्रमेह, मेदोरोग, हृदय, वृक्क/किडनीवर परिणाम, अंतःस्रावी ग्रंथीवर दुष्परिणाम, लघवीच्या तक्रारी, घामाच्या तक्रारी इ. अनेक तक्रारी निर्माण होतात. यावर आहार-विहार-जीवनशैली बदलणे हाच उपाय आहे हे कळत असूनही फक्त dieting वा पाणीच भरपूर पिणे, नुसती फळेच खाणे वा वेगवेगळे रस घेणे, वजन कमी करणाऱ्या गोळ्या घेणे, HRT, इन्सुलीन, थायराॅईड, इस्ट्रोजेन अशी hormonal treatment घेणे, केवळ ओटस्, सोया, काॅर्नफ्लेक्स असेच खाणे, कोणताही व्यायाम पण तोही प्रकृती,काल,वय,शरीराची गरज यांकडे दुर्लक्ष करून करणे अशा मार्गांनी कायमचा नव्हे तर तात्पुरता उपाय होतो, अपायही होतो. अशाने आलेले आजारपण लांबते. शिवाय आजारांचे स्वरूपही गंभीर असते.
जसे अन्नाबद्दलचे तसेच कोणतेही पेये अगदी पाणी सुद्धा पिण्याचा अतिरेक होऊन चालत नाही. पाणी न पिता इतरच पेये घेणे मग ती soft drinks असो वा hard drinks, चहा वा काॅफी इ पेये - त्यांच्या अतिरेकानेही त्रास होतात, शरीराचे योग्य पोषण होत नाही, प्रमेह, सूज येणे, यकृत्, किडनीवर ताण येऊन त्याची दुखणी निर्माण होणे असे विकार प्रामुख्याने होतात. विकतच्या पेयांतील कृत्रिम घटकांचे त्रास कैक पटींनी जास्त व दीर्घकालीन आहेत.
बघा बरं - जीभ व पोट हे स्वास्थ्य राखण्यासाठी आहेत, चोचले पुरविण्यासाठी नाहीत हे कळायला काही रोगच व्हावे लागतात, त्याशिवाय किंवा तरीही आपण मूळ कारणांचा विचार करत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? अज्ञानात सुख असते असे म्हणतात. तात्पुरते खरे असेलही ते पण दुर्लक्ष करण्यात मात्र सुख व कायमचे हित नक्की नाही.. हो किनई?
मागील लेखात लिहिल्याप्रमाणे आपल्या मौल्यवान शरीराशी, मनाशी संवाद साधलात का? साधला असेल तर उत्तमच. कालच हा संवाद साधायचा होता खरा, पण आजही, आत्ताही सुरुवात करू शकतोच की आपण.. तर सुरुवात करा, शरीराशी संवाद साधा- स्वतःच्या मनात डोकावून पाहा.. अगदीच नाही काही कळलं तर विचारा की आपल्या वैद्यांना.. अगदी समाधान होईपर्यंत विचारा पण मग मात्र खरोखरीच योग्य खाण्याचा मार्ग स्वीकाराच ही कळकळीची विनंती.

© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 2 -
आज आहाराच्या अयोगाविषयी जाणून घेऊया.
अयोग म्हणजे कमी खाणे, गरजेपेक्षा कमी अन्न सेवन करणे, कमी वेळा सेवन करणे, भूक लागूनही न खाणे, वेळेवर वा अवेळी पण निकस, सत्त्वरहित, refined अन्न खाणे, अन्नातून जे गुण बल, ओज, स्थैर्य, पुष्टि, समाधान इ. मिळणे आवश्यक आहे ते न मिळणे म्हणजे अयोग.
हल्ली केवळ वजन कमी करणे वा सडपातळ दिसणे या कारणासाठी dieting चे फॅ़ड आलेले दिसते आहे. विविध औषधे- गोळ्या- वरून लावायचे लेप, spot reduction, यांबरोबरच अनेक 'diet' foods वा weight loss supplements, fat burners इ. नावांनी अगणित उत्पादनांच्या जाहिरातींचा मारा होताना दिसतोय. यातील योग्य-अयोग्य काय हे ठरविणे अवघ़ड होत चाललेले आहे कारण बरेचदा अनेक वैद्यकीय व्यावसायिकही अशा उत्पादनांचे वा सेवांचे promotion / endorsement - करताना दिसतात. ज्याअर्थी एक डाॅक्टरच सांगतो आहे त्या अर्थी ते बरोबरच असेल असे स्वत:चे समाधान करून घेतले जाते. जसे नट-नट्या फक्त पैश्यांसाठीच जाहिराती करतात- त्या वापरत नाहीत तसेच हेही आहे. कोणीही वैद्यकीय व्यावसायिक जर व्यक्तिला वा रुग्णाला न तपासता सरसकट एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असेल तर ते चूकच आहे. कायद्याने तर वैद्यकीय व्यावसायिकांना अश्या विशिष्ट उत्पादनांचे endorsement / promotion करण्यावर बंदीच आहे. म्हणजे कायद्याने चूक असलेल्या गोष्टींचाही आपण कसा स्वतःसाठी गैरवापर करतो? त्यातून जर कालांतराने त्या उत्पादनाने वा सेवेने कोणाला त्रास झाला, कोणत्या चाचणीत त्या गोष्टी अहितकारक आहेत असे दिसले तर मात्र आपण पुन्हा सरकारलाच दोषी ठरवून मोकळे होतो. जरी या वस्तू वा उत्पादने योग्य रीतिने तयार झाल्या तरी त्या सेवन करणे योग्य कसे? केवळ दोन मिनिटात भूक मिटवणारा पदार्थ हा वेळेअभावी सोयीस्कर असेलही पण म्हणून तो शरीरास हितकर आहे असे कसे म्हणू शकतो आपण? म्हणून कोणतेही बाजारी तयार अन्न मग ते packed food असो वा ready-mixes असो वा parcel असो - ते योग्य आहे का - पूर्ण जेवणाचा फायदा देणार आहे का की नुसतेच चमचमीत खाऊन पोटची खळगी भरून खोटे समाधान देणारे आहे याचाही विचार करा.
भूक नसतानाही वारंवार थोडे थोडे खात राहाणे - दर दोन तासांनी तोंड उष्टावणे यानेही शरीराची खाण्याची गरज भागत नाहीच तसेच व्यवस्थित जेवणाने मिळणारे समाधानही मिळत नाही. चटकन वजन कमी होण्यासारखे (दुः)परिणाम याचे असतीलही पण तिकडे कोण लक्ष देणार? सडपातळ दिसणे- दिसण्यावरून वाहवा मिळवणे यासाठी तर हा अट्टाहास.
बरे असे कमी व अयोग्य खाण्याचे इतर दुष्परिणाम काय तर याने अंगातील रक्त कमी होते, शरीराचे बल वा ताकद कमी होते, त्वचा रूक्ष होते, केस गळतात, लवकर पांढरे होऊ लागतात, सांधे झिजायला लागतात, कमी कष्टानेही दम लागतो, चिडचिड होते, सतत काहीतरी दुखत राहाते, झोप पुरत नाही वा लागतच नाही, मानसिक धैर्य ही कमी होते. त्यातून काही आजारपण आले तर त्यासाठी प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आजारपण लांबते. शिवाय आजारांचे स्वरूपही गंभीर असते.
बघा बरं - केवळ बारीक दिसण्याच्या अट्टाहासासाठी वा केवळ जेवायला वा योग्य अन्न शिजवायला नाही म्हणून मिळेल ते तोंडात वेळी-अवेळी टाकल्याने आपण स्वतःलाच फसवत असतो.
वाहनात इंधन नाही वा चाकांत हवा भरली नाही वेळेवर तर आपण तिथे हयगय करत नाही - लगेच भरतो कारण ती गैरसोय टाळणे आपल्याला सुचते व आपण तसे जमवतोही. भले दोन पैसे जास्त जाऊदे पण वाहनाचे नुकसान नको म्हणून इंधनही उच्च प्रतीचे भरतो. मग देवाने दिलेल्या या सुंदर आजन्म बरोबर असणाऱ्या आपल्या शरीराकडे आपण का बरे दुर्लक्ष करतो - कारण ते बिचारे सहन करत राहते. काहीतरी बिनसतय हे सांगायचा ते प्रयत्नही करत राहते पण आपण मात्र चक्क दुर्लक्ष करतो किंवा मागील लेखात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते उपाय करतो. अति झाल्यास मात्र दीर्घकालीन व महागड्या तपास्ण्या-उपाययोजना कराव्याच लागतात. त्यापेक्ष्या वेळीच तहान-भूक, मल-मूत्र प्रवृत्ति, झोप येणे इ. शरीराच्या रोजच्या छोट्या पण महत्त्वाच्या संवादाकडे नीट लक्ष द्या. बघा बरे तुमचे शरीर तुमच्याशी काय आणि कसा संवाद साधतेय - जरा कान देऊन - मन लावून - पुस्तके-फोन-टीव्ही-इंटरनेट बंद ठेवून एकदा ऐका तरी..
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग
लेख क्रमांक - 1
अन्न-पान हे प्रत्येक जीवाचे जगण्यासाठीचे साधन. मूलभूत गरज. पण मनुष्याच्या बाबतीत ही गरज चैनीचे रूप कधी घेते हेच कळत नाही. जसा आर्थिक स्तर उंचावतो तसा गरजेतून चैनीकडे प्रवास सुरू होतो. जगण्यासाठी खाणे हे वास्तव खाण्यासाठी जगणे यात बदलते आणि जोवर काही रोगनिदान वा त्रास होत नाही तोवर बिनबोभाट सुरू राहते. एकदा का काही बिनसू लागले, शारीरिक वा मानसिक तक्रारी जाणवू लागल्या की मग त्यांच्या तीव्रतेनुसार घरातील वडिलधाऱे, शेजार-पाजारी, सहकारी यांना विचारून वा दूरदर्शन, वृत्तपत्रातील जाहिराती वाचून नाहीतर सरळ कोपऱ्यावरच्या केमिस्टकडून मनानेच वा त्याच्या सल्ल्याने औषध(?) घेऊन उपाय केल्याचे तात्पुरते समाधान मिळवणे असे प्रथमोपचार केले जातात. काही बहाद्दर तर फेसबुकवरही आपल्या लक्षणांचा वा त्रासाचा जाहीर प्रचार-प्रसार करतात व तिथे सल्ले मिळवतात. ते योग्य असतातच असे नाही कारण प्रश्नकर्त्याच्या तक्रारी, सवयी, जीवनशैली याविषयी काहीही माहिती न घेता वा विचारता सर्वचजण ऐकीव वा स्वानुभवातून सल्ले देऊ लागतात. अगदी घरगुती उपायांपासून ते विविध पेन-कीलर्स, अँटीबायोटीक्स, अँटीहिस्टामिनिक्स्, व्हिटॅमिन्स्, स्टिराॅईडस् इ. च्या गोळ्या, सिरप, मलमे, इ प्रिस्क्रीप्शन, तसेच जिम लावा, चालायला जा, टेकडी चढा, पोहायला जा असेही सल्ले व्यक्ति-प्रकृति न बघता दिले जातात. यातून कधीतरी तात्पुरते बरे वाटते तर कधी त्रास वाढतो आणि मग मात्र वैद्यकीय सल्ला घेणे भाग पडते. केवळ तुमच्या लक्षणांवर व माहितीवर अवलंबून न राहता तपासण्यांचा सल्ला दिला जातो. त्यात काही त्रास दिसला तर त्यावरील विशेष औषधे दिली जातात. अन्यथा मानसिक कारणे आहेत असा निष्कर्ष काढला जातो. गरजेनुसार स्पेशालिस्ट वा मानसोपचारतज्न्याचा वा तात्पुरते औषध देऊन घरचा रस्ता दाखवला जातो. येथेच हे चक्र संपत नाही तर पुनःपुन्हा चालू राहाते. कालांतराने हृदयरोग, प्रमेह, संधिवात, दमा, त्वचारोग, कर्करोग, इ. भारदस्त रोग कायमचे ठाण मांडतात. त्यांचा पाहुणचार म्हणून तपासण्या व औषधे ही जन्मभरासाठी सोबत करतात. आपल्या नातेवाईकांना विशेषतः आई-वडिलांना होणारा त्रास आपल्याला व्हायला लागला की तो आनुवंशिकच आहे असे समजूत करून घेतली जाते पण तो आपल्यालाही होउ शकतो याची कल्पना असूनही त्यासाठी preventive काही केले मात्र जात नाही. अश्या गंभीर-दीर्घकालीन रोगांचे निदान झाल्यावर मात्र आहाराविषयी, जीवनशैली सुधारण्यासाठी जरा जागरूकता येते, त्या आजाराविषयी अनेक सल्ले दिले - घेतले जातात, विविध पुस्तके-साईट्स् वर माहिती मिळवून त्याचा उपयोग करायचे प्रमाण वाढते, जSरा आधी हे कळले असते तर असे हळहळून सुरुवातीला क़डक पथ्य पाळणे, लवकर उठून जिम, फिरायला जाणे यापासून ते सोयीस्कर पळवाटा काढणे असा प्रवास सुरू होतो तो अगदी शेवटपर्यंत.
आपण या वरील वर्णनात कुठे बसतो का याचा विचार करा बरं. होय असे उत्तर असेल तर आजच, आत्ताच सावध होण्याची गरज आहे आणि जाणीवपूर्वक आहारात-जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. वरील वर्णन आपल्याला अजिबात लागू नसेल तर सध्यातरी अभिनंदन कारण हे कदाचित भविष्यातही घ़डू शकते, तेव्हा सावधान!
याच वरील विचारांनी आणि अनेक रुग्ण, लांबचे-जवळचे नातेवाईक यांच्या शंका व त्यांचे निरसन करण्यासाठी, आयुर्वेद हे शास्त्र म्हणून आजही कसे शाश्वत आहे हे सांगण्यासाठी या पानाद्वारे आपल्यापर्यंत पोचायचे ठरविले. पारंपारिक जीवनशैली, विशेषतः आहाराचे महत्त्व, ते बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धतीतील योग्य-वाईट बदल यांविषयीचे लेखन इथे असणार आहे. आयुर्वेद म्हणजे केवळ हे खाऊ नका-ते खाऊ नका असे नकारार्थी सांगणारे शास्त्र नाही तर ते तुम्हाला कमी अपायकारक वा जास्तीतजास्त हितकर कसे होतील हे सांगणारे शास्त्र आहे यासाठीच हा खटाटोप. जीवनशैली महत्त्वाची आहेच, त्याबद्द्ल विषयानुरूप लिहिनच.
आहारयोग
आहार म्हणजे जे जे आपल्या अन्ननलिकेवाटे पोटात जाते तो आहार. योग म्हणजे जोडले जाणे. या आहाराशी आपण कसे जो़डले जातोय त्यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.
योगाचे चार प्रकार - अयोग (पचनशक्तिपेक्षा कमी खाणे), अतियोग (पचनशक्तिपेक्षा जास्त खाणे), मिथ्यायोग (पचन विकृत करणारे वा चुकीचे खाणे) व समयोग (पचायला योग्य असे खाणे).
यातील स्वास्थ मिळ्ण्यासाठी व टिकण्यासाठी समयोग असणे हेच गरजेचे आहे व इतर योग टाळणे हेही महत्त्वाचे आहे. आपल्या प्रकृतिनुसार, वयानुसार, जीवनशैली, नोकरी / व्यवसायानुसार, जीवनांतील अवस्थांनुसार, राहाण्याचे ठिकाण व ऋतुनुसार योग्य असे अन्न-पान, योग्य वेळेला शिजवणे, योग्य वेळेला खाणे, आनंदाने खाणे इतकेच नाही तर ते नीट पचवून त्यापासून कोणताही त्रास न होता शरीरास बल, ऊर्जा मिळणे इतके साधले तरच त्या घेतलेल्या अन्न-पानाचा समयोग होय. हा समयोग जाणून घेऊया व निरोगी होण्याचा प्रयत्न करू या, निरोगी राहूया हाच 'आहारयोग' या पानाचा उद्देश.
© वैद्य तनुजा गोखले, पुणे.
tanugokhale@gmail.com
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735
नम्र विनंती - येथे दिली जाणारी माहिती ही आयुर्वेदानुसार योग्य आहाराविषयीची सर्वसामान्य माहिती आहे, ती प्रत्येक व्यक्तिस वा रुग्णास लागू पडेलच असे नाही. येथे वाचून आपल्या रोगावर उपाय करू नयेत वा इतरांना सुचवू नयेत. उपाय करण्यासाठी वैद्यकीय तज्न्यांचा विशेषतः आयुर्वेदीय उपचार करणाऱ्या वैद्यांचा सल्ला घ्यावा ही विनंती.

Saturday, November 21, 2015

औषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास !

औषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ,
एक तौलनिक अभ्यास !

(फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी)
तौलनिक अभ्यास !
‘कोण बरोबर’ ह्यापेक्षा ‘काय बरोबर’ हे लक्षात घेणे अधिक महत्वाचे
आयुर्वेदोक्त सर्व पाठ अत्यंत सखोल अभ्यासातून निष्कर्ष स्वरुपात ग्रंथात दिले आहेत. त्यांचा उपयोग चिकित्सेत करतांना झापडं लाऊन करणे नक्कीच चुकीचे ठरेल. शास्त्रशुद्ध संकल्पना, निर्माण पद्धती ह्यांची युक्तिपूर्वक अंमलबजावणी केल्यास चिकित्सेत अपयश मिळणे असंभव.
बाजारातून कोणतीही लहानशी वस्तू किंवा जिन्नस घेतांना आपण चौकसपणे उपलब्ध असलेल्या अन्य तत्सम वस्तूंचा दर्जा, किंमत इ. गोष्टी पडताळून पाहतो. मग गर्भावस्थेत जे पाठ आपण रुग्णांना देणार त्यांच्या दर्जाबद्दल आपल्याला खात्री असणे नक्कीच गरजेचे आहे. अक्षय निर्मित “औषधी गर्भसंस्कार” उत्पादने आणि प्रचलित उत्पादनांची माहिती व्हावी आणि नीरक्षीर न्यायाने आपण त्यांचा पडताळा करून मगच चिकित्सेत वापर करावा हा प्रांजळ हेतू ह्या अभ्यासामागे आहे.
सर्वप्रथम निर्माण पद्धतीबद्दल बघूया –
रसः कल्कः शृतः शीतः फाण्टश्चेति प्रकल्पना l पञ्चधैव कषायाणां पूर्वं पूर्वं बलाधिका ll . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/८
स्वरस, कल्क, शृत (क्वाथ), शीत, फान्ट अशा पाच कषाय कल्पना पूर्व पूर्व क्रमाने बलवान आहेत. म्हणजेच गुणांच्या दृष्टीने स्वरस सर्वात अधिक बलवान, त्यानंतर कल्क, नंतर शृत (काढा), पुढे शीत व शेवटचा फाण्ट हा गुणांच्या दृष्टीने सर्वात कमी प्रभावी असतो. मासानुमासिक कल्पांमध्ये वर्णन केलेल्या बहुतांशी वनस्पती ओल्या मिळणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे शास्त्रवचनानुसार अक्षयनिर्मित मासानुमासिक कल्पांमध्ये 'कल्क संकल्पना' वापरून पाठ निर्मिती केली आहे. प्रचलित मासानुमासिक उत्पादनांमध्ये क्वाथाचाच नव्हे तर घन क्वाथाचा वापर केलेला दिसतो. म्हणून अक्षयनिर्मित मासानुमासिक कल्प प्रचलित उत्पादनांच्या तुलनेत अधिक प्रभावी सिद्ध होतात.
विशिष्ट पाठ ज्या ग्रंथातून घेतले आहेत त्याच ग्रंथातील सूत्रांचा वापर औषध निर्मितीच्या वेळी करणे अनिवार्य ठरते. अष्टांगहृदयातील मासानुमासिक पाठांमध्ये, फक्त वनस्पतींचा नामोल्लेख आहे. ह्याच ग्रंथातील पुढील सूत्रानुसार सदर पाठांचा वापर कल्कस्वरुपात करण्याचा शास्त्रादेश आहे.
कल्पयेत्सदृशान् भागान् प्रमाणं यत्र नोदितम् ।
कल्कीकुर्याच्च भैषज्यमनिरूपितकल्पनम् ।। . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/२४
पाठात घटकांचे प्रमाण उल्लेखित नसल्यास त्यांचा वापर समप्रमाणात करावा, ज्याठिकाणी वनस्पती कोणत्या स्वरुपात वापराव्यात असा स्पष्ट उल्लेख नसेल त्याठिकाणी कल्क स्वरुपात वापरणेच श्रेष्ठ समजावे.
‘कल्क’ निर्माण प्रक्रिया
कल्कः पिष्टो द्रवाप्लुतः . . . . अष्टांगहृदय कल्पस्थान ६/९
द्रव्यमात्रं शिलापिष्टं शुष्कं वा जलमिश्रितम्। . . . . शारंगधर २/५/३५
वनस्पती दगडावर वाटून कल्क करावा व शुष्क असल्यास चूर्णाबरोबर पाणी वापरून मर्दन करावे म्हणजे कल्क तयार होतो.
मर्दनात अप्रत्यक्ष उष्णता (उर्जा) अपेक्षित आहे. ह्या निर्माण पद्धतीत वनस्पतींमधील सुगंधी व उडनशील कार्यकारी घटकांचे रक्षण होते, औषधाची कार्मुकता वाढते, औषध टिकाऊ बनते व पचन यंत्रणेच्या सूक्ष्म स्रोतसांमध्ये सहज शोषले जाते.
“औषधी गर्भसंस्कार” पाठांची रचना करतांना ह्या सूत्रांनुसार वनस्पतींच्या चूर्णाला पाण्याऐवजी त्या पाठातील मुख्य कार्यकारी वनस्पतीच्या स्वरस किंवा क्वाथाची भावना दिली जाते. गुणवर्धन होण्यासाठी ही प्रक्रिया अधिक उपयुक्त ठरते. ह्याउलट प्रचलित पाठनिर्माण करतांना वनस्पतींच्या घनांचा (रसक्रिया) उपयोग केलेला दिसतो. क्वाथामध्ये उष्णता दिली जाते व गाळून त्यांना पुन्हा प्रखर उष्णता दिली जाते.
क्वाथादीनां पुनः पाकाद्‌ घनत्वं या रसक्रिया ।
- - - - - - - - - - - - -
आता औषध सेवन मात्रेविषयी बघूया -
पेष्यस्य कर्षमालोड्यं तद् द्रवस्य पलत्रये । . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/१३
कल्काची मध्यम मात्रा १ तोळा म्हणजे म्हणजे दिवसाला सुमारे १० ग्रॅम एवढी सांगितली आहे.
“औषधी गर्भसंस्कार” उत्पादनांमध्ये प्रत्येक गोळीत वनस्पती औषधाचे प्रमाण ५०० मिलिग्रॅम आहे. २ - २ गोळ्या रोज २ वेळा घेण्यामुळे दिवसाची एकूण मात्रा २ ग्रॅम होते. पाठातील कार्यकारी द्रव्याची भावना देऊन मर्दन केल्यामुळे गुणात दुप्पट वाढ होते असे तज्ञांनी सांगितले. म्हणजेच ही मात्रा ४ ग्रॅम धरणे समर्पक होईल. गर्भावस्थेत स्त्रीची संवेदनशील अवस्था समजून मध्यम मात्रेऐवजी लघु मात्रा देणे अधिक योग्य, म्हणजेच १ तोळा ऐवजी अर्धा तोळा पुरेशी आहे.
क्वाथाची मध्यम मात्रा ४ तोळे म्हणजे दिवसाला सुमारे ४० ग्रॅम एवढी सांगितली आहे.
क्वाथं द्रव्यपले कुर्यात्प्रस्थार्धं पादशेषितम् । . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/१३
क्वाथासाठी वनस्पती द्रव्याची मात्रा १ पल म्हणजे ४ तोळे घेण्याचा संदर्भ आहे. प्रचलित उत्पादनांमध्ये ग्रंथोक्त मात्रेचा विचार केल्यास ह्या उत्पादनांच्या २५० मिलिग्रॅमच्या किमान १६० गोळ्या दिल्यास मात्रा पुरेशी होईल. गर्भावस्था नाजुक व संवेदनशील असल्याने निम्म्या मात्रेत औषध द्यावे असा विचार केला तरीही ८० गोळ्या द्याव्या लागतील.
- - - - - - - - - - - - -
प्रत्यक्षात -
“औषधी गर्भसंस्कार” उत्पादनांच्या गोळीचे वजन ६०० मिलिग्रॅम
घटक द्रव्यांचे वजन ५५० मिलिग्रॅम (भावना व मर्दन संस्कार करून)
एक्सीपियंट्स चे प्रमाण जेमतेम ५० ते ६० मिलिग्रॅम
प्रचलित उत्पादनांमध्ये –
गोळीचे वजन ५५० मिलिग्रॅम ; घटक द्रव्यांचे वजन २४० ते २५० मिलिग्रॅम
घन स्वरुपात द्रव्य प्रमाण सुमारे २४ ते ४८ मिलिग्रॅम
एक्सीपियंट्स चे प्रमाण ५२६ ते ५०२ मिलिग्रॅम एवढ्या बेसुमार मात्रेत
ज्या मात्रेत औषधी द्रव्य देण्याची आवश्यकता आहे, त्या मात्रेत एक्सीपियंट्स वापरल्याचे आढळते.
काही प्रचलित मासानुमासिक कल्पांमध्ये वनस्पतींचे घन समप्रमाणात वापरलेले दिसतात. वास्तविक प्रत्येक वनस्पतीचे घन रूपांतरित गुणोत्तर (Yield) भिन्न असते. त्यामुळे ग्रंथोक्त पाठाप्रमाणेच घन समप्रमाणात वापरले तर मूळ वनस्पतींचे प्रमाण विभिन्न होते. शास्त्रोक्त सूत्रांचे उल्लंघन झाल्याने अशा पाठांच्या कार्मुकतेबद्दल संभ्रम निर्माण होतो.
अष्टांगहृदयात १० भिन्न पाठ गर्भावस्थेच्या १० महिन्यांसाठी दिलेले आहेत. गर्भावस्था दहा महिन्यांची कशी हे शास्त्राधारे समजून मगच अक्षयने औषधी गर्भसंस्कार पाठांची योजना केली आहे. ह्या १० महिन्यांच्या पाठांमध्ये एकूण ३१ वनस्पतींचा अंतर्भाव आहे. त्यापैकी ८ वनस्पतींचा वापर अनेक वेळा (दोन, तीन व पाच वेळा) केलेला आहे.
- - - - - - - - - - - - -
वनस्पतींची अचूक ओळख व प्रतिनिधि द्रव्ये
मूळ ग्रंथाच्या भाषांतरित आवृत्तीमध्ये काही दोष किंवा विसंगती असू शकते. त्यामुळे चुकीच्या वनस्पतीचा अंतर्भाव पाठात केला जाऊ शकतो. अशावेळी संस्कृत श्लोकांचा सखोल अभ्यास करून मगच द्रव्य निश्चिती केली पाहिजे. केवळ भाषांतर पाहून औषधनिर्मिती केली तर पाठ चुकीचे होतील आणि अपेक्षित लाभ प्राप्त होणार नाहीत. त्याचप्रमाणे पाठातील काही विशिष्ट घटक संदिग्ध किंवा अनुपलब्ध असल्यास त्यांच्या ऐवजी प्रतिनिधि द्रव्यांची योजना शास्त्रकारांनी केली आहे.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
प्रत्येक महिन्याच्या पाठांचा तौलनिक अभ्यास
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पहिला महिना -
मधुकंशाकबीजंच पयस्या सुरदारुच । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५४
मधुक, शाकबीज, पयस्या, सुरदारु . . . हा आहे पहिल्या महिन्याचा पाठ.
पयस्या म्हणजे क्षीरकाकोली. अष्टवर्गातील ह्या वनस्पतीचा समावेश एकूण ४ पाठांमध्ये आहे.
राज्ञामप्यष्टवर्गस्तु यत्तोSयमतिदुर्लभः ।
तस्मादस्य प्रतिनिधिं गृह्णीयात्तद् गुणं भिषक् ।।
. . . . भावप्रकाश निघंटु, हरितक्यादि १४३
अष्टवर्गातील वनस्पती अत्यंत दुर्मिळ व राजालाही दुर्लभ आहेत. म्हणून वैद्यांनी त्यांच्या प्रतिनिधि द्रव्यांचा वापर करावा.
सगर्भावस्थेचा विचार करता शतावरी हे सर्वोत्तम प्रतिनिधि द्रव्य ठरते म्हणून औषधी गर्भसंस्कार पाठांमध्ये सर्वत्र पयस्या ऐवजी शतावरीचा वापर केला आहे.
अक्षय निर्मित “प्रथमाह” पाठ
मधुक, शाकबीज, शतावरी, सुरदारु - प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
यष्टिमधु, साग बीज, क्षीरकाकोली, देवदार प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
९ महिन्याच्या दोन प्रचलित पाठांमध्ये क्षीरकाकोलीचा तर नवव्या महिन्याच्या पाठात विदारीकंदाचा वापर केला आहे. पहिल्या व तिसऱ्या पाठात वापरण्यासाठी जर क्षीरकाकोली उपलब्ध होते तर नवव्या महिन्याच्या पाठात विदारीकंद का वापरला ?
- - - - - - - - - - - - -
दुसरा महिना
अश्मन्तकः कृष्णतिलास्ताम्रवल्ली शतावरी । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५४
अश्मंतक, कृष्ण तिळ, मंजिष्ठा, शतावरी . . . हा आहे दुसऱ्या महिन्याचा पाठ
अक्षय निर्मित “द्वितिमाह” पाठ -
अश्मंतक, कृष्ण तिळ, मंजिष्ठा, शतावरी प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: अश्मंतक १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
अश्मंतक, कृष्ण तिळ, मंजिष्ठा, शतावरी प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
सर्व वनस्पती योग्य असल्याचे दिसते. मात्र द्रव्यांचे प्रमाण व निर्माण पद्धती शास्त्राधारे चुकीची ठरते.
- - - - - - - - - - - - -
तिसरा महिना
वृक्षादनीपयस्या च लता चोत्पलसारिवा । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५५
वृक्षादनी, पयस्या, लता, उत्पलसारिवा . . . हा आहे तिसऱ्या महिन्याचा पाठ.
वृक्षादनी ही संदिग्ध व अपरिचित वनस्पती आहे.
प्रियङ्गुः फलिनी कान्ता लता च महिलाह्वया | - भावप्रकाश निघन्टु, कर्पुरादि १०१
लता म्हणजे प्रियंगु.
उत्पलसारिवा म्हणजे श्वेतसारिवा
अक्षय निर्मित “तृतिमाह” पाठ -
शतावरी, प्रियंगु, श्वेत सारिवा प्रत्येकी १६५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १६५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
क्षीरकाकोली, श्वेत सारिवा, कृष्ण सारिवा प्रत्येकी ८० मिलिग्रॅमचा घन
मूळ श्लोक न पाहता अष्टांगहृदय मराठी भाषांतरानुसार हा पाठ केलेला दिसतो. क्षीरकाकोली ह्या संदिग्ध व दुष्प्राप्य वनस्पतीचा वापर केला आहे.
- - - - - - - - - - - - -
चौथा महिना
अनन्ता शारिवा रास्ना पद्मा च मधुयष्टिका । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५५
अनंतमूळ, सारिवा, रास्ना, पद्मा, मधुयष्टि . . . हा आहे चौथ्या महिन्याचा पाठ
अक्षय निर्मित “चतुर्माह” पाठ -
अनंतमूळ, कृष्ण सारिवा, रास्ना ऐवजी कुलिंजन, पद्मा, यष्टिमधु प्रत्येकी १०० मिलिग्रॅम; भावना द्रव्य: अनंतमूळ १०० मिलिग्रॅम
रास्ना ऐवजी कुलिंजन वापरण्याचा उद्देश -
अष्टांगहृदयकारांना अभिप्रेत असलेली रास्ना, प्रचलित रास्नांपेक्षा भिन्न असावी असे वाटते. भावप्रकाश निघन्टु मध्ये एकूण ५ भिन्न वनस्पतींना रास्ना नावाने संबोधले आहे. त्यातील प्रामुख्याने वापरली जाणारी Pluchea lanceolata सोनामुखीप्रमाणे भेदन तर Inula racemosa गर्भाशय संकोचक आहे. सदर गुणधर्मांनुसार गर्भावस्थेत ह्यांचा वापर करणे अयोग्य ठरते. कार्मुकतेचा अभ्यास करून प्रतिनिधि द्रव्य कुलिंजनचा वापर केला आहे.
प्रचलित पाठ -
धमासा, रास्ना, सारिवा, मंजिष्ठा, जेष्टमध प्रत्येकी ५० मिलिग्रॅमचा घन
रास्ना बद्दल विवेचन आपण आत्ताच पाहिले. मूळ श्लोकात धमाशाचा उल्लेखही नाही. भावप्रकाश निघन्टु मध्ये धमासा हा अनंतमूळाचा पर्याय सांगितला आहे. मराठी भाषांतरातही धमासा म्हटले आहे. जेस्टेशनल डायबिटिसचा धोका सगर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यात सर्वाधिक असतो. धमाशात केन शुगर २६.४%, इनव्हर्ट शुगर्स ११.६%, मेलिझिटोझ ४७.१% अशा ३ प्रकारच्या शर्करा असतात, म्हणून अशावेळी धमासा वापरणे चुकीचे वाटते. एकंदरितच प्रचलित पाठात ५ वनस्पतींपैकी ३ वनस्पती चुकीच्या असल्याचे दिसते.
- - - - - - - - - - - - -
पाचवा महिना
बृहतीद्वयकाश्मर्यक्षीरिशुङ्गत्वचा घृतं । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५६
रिंगणी, डोरली, काश्मरी, वडसाल, वटांकुर . . . हा आहे पाचव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “पंचमाह” पाठ -
रिंगणी, डोरली, काश्मरी, वटांकुर, वडसाल प्रत्येकी १०० मिलिग्रॅम; भावना द्रव्य: वडसाल १०० मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
रिंगणी, डोरली, वडसाल, वटांकुर प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
ह्यात काश्मरीचा वापरच नाही. वास्तविक 'गर्भशोष' अवस्थेत काश्मरी उपयुक्त असल्याचे वर्णन भावप्रकाश निघन्टुमध्ये आहे. त्यामुळे हा पाठही अपूर्ण असल्याचे दिसते.
- - - - - - - - - - - - -
सहावा महिना
पृश्निपर्णी बला शिग्रुः श्वदंष्ट्रा मधुपर्णिका । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५६
पिठवण, बला, शेवगा, गोखरू, मधुपर्णिका . . . हा आहे सहाव्या महिन्याचा पाठ.
गम्भारी भद्रपर्णी च श्रीपर्णी मधुपर्णिका I भावप्रकाश निघन्टु, गुडुच्यादि १४
मधुपर्णिका म्हणजेच गम्भारी.
अक्षय निर्मित “षष्ठमाह” पाठ -
पिठवण, बला, शेवगा, गोखरू, गम्भारी प्रत्येकी १०० मिलिग्रॅम; भावना द्रव्य: बला १०० मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
पिठवण, चिकणा, शेवगा, गोक्षुर प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
ह्यात गम्भारीचा समावेशच नाही. 'गर्भशोष' अवस्थेत उपयुक्त असल्यामुळे हिचा अंतर्भाव अनिवार्य वाटतो.
- - - - - - - - - - - - -
सातवा महिना
शृङ्गाटकं बिसं द्राक्षा कसेरु मधुकं सिता । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५७
शृंगाटक, कमळ, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, खडीसाखर . . . हा आहे सातव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “सप्तमाह” पाठ -
शृंगाटक, कमळ, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, खडीसाखर प्रत्येकी ८५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: यष्टिमधु ८५ मिलिग्रॅम
कसेरुमध्ये नैसर्गिक प्रोजेस्टेरॉन असल्याचे सिध्द झाले आहे. गर्भावस्थेत सर्वात अधिक प्रोजेस्टेरॉनची आवश्यकता सातव्या महिन्यात असते व ही गरज कसेरुच्या सहाय्याने भरून निघते.
प्रचलित पाठ
शिंगाडा, कमल, द्राक्ष, कचोरा, जेष्टमध, खडीसाखर प्रत्येकी ४० मिलिग्रॅमचा घन
अष्टांगहृदय मराठी भाषांतरात 'कसेरु' ऐवजी 'केसरु' असा मुद्रण दोष दिसतो. त्यानुसार भाषांतरही 'केशर' असे केलेले आहे. मात्र हिंदी आवृत्तीमध्ये श्लोकात व भाषांतरातही कसेरुच म्हटले आहे.
प्रचलित पाठात इतर ५ द्रव्ये जरी मूळ ग्रंथानुसार असली तरी कसेरु ऐवजी कचोरा वापरला आहे. 'कसेरु' आणि 'कचोरा' ह्यात फक्त उच्चार साधर्म्य आहे. गर्भावस्थेच्या दृष्टीने कोणताही उपयुक्त गुण कचोरामध्ये नाही.
- - - - - - - - - - - - -
आठवा महिना
कपित्थबिल्वबृहतीपटोलेक्षुनिदिग्धिकात् । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५८
कपित्थ, बिल्व, बृहती, पटोल, इक्षु, निदिग्धिका . . . हा आहे आठव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “अष्टमाह” पाठ -
कपित्थमूळ, बिल्वमूळ, बृहती, पटोल, इक्षु मूळ, निदिग्धिका प्रत्येकी ८५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: निदिग्धिका ८५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
कवठमूळ, बेलमूळ, रिंगणी, पटोलपत्र, इक्षुमूळ, डोरली प्रत्येकी ४० मिलिग्रॅमचा घन
सर्व वनस्पती योग्य असल्याचे दिसते. मात्र द्रव्यांचे प्रमाण व निर्माण पद्धती अशास्त्रीय आहे.
- - - - - - - - - - - - -
नववा महिना
नवमे शारिवानन्तापयस्यामधुयष्टिभिः l . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५९
सारिवा, अनंता, क्षीरकाकोली, मधुयष्टि . . . हा आहे नवव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “नवमाह” पाठ -
सारिवा, अनंता, शतावरी, यष्टिमधु प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
अनंतमूळ, धमासा, विदारीकंद, जेष्टमध प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
अष्टांगहृदय हिंदी भाषांतरात दोन (श्वेत व कृष्ण) सारिवा आहेत. मराठी भाषांतरात सारिवा आणि धमासा आहे. धमासा योग्य वाटत नाही. पयस्या म्हणजे क्षीरकाकोली. अन्य पाठात वापरण्यासाठी जर ही उपलब्ध झाली तर ह्या पाठात विदारीकंद का वापरला? विदारीकंद घन स्वरुपात वापरल्याचे म्हटले आहे. ग्रंथोक्त पद्धतीने घन करण्याचा प्रयत्न केला तर विदरीकंदाची खळ बनते, घन होतच नाही.
- - - - - - - - - - - - -
दहावा महिना
योजयेद्दशमे मासि सिद्धं क्षीरं पयस्यया l अथवा यष्टिमधुकनागरामरदारुभिः ll . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/६०
क्षीरकाकोली, यष्टिमधु, सुंठ, देवदारु . . . हा आहे दहाव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “दशमाह” पाठ -
शतावरी, यष्टिमधु, सुंठ, देवदार प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
दहाव्या महिन्यासाठी पाठ निर्मितीच नाही म्हणजेच अपूर्ण चिकित्सा.
स्त्री शारीरक्रियेचा विचार न करता सगर्भावस्था कालावधीची सांगड इतर कालमापन पद्धतीशी घालून केलेली ९ महिन्यांच्या पाठांची निर्मिती संपूर्णतः अशास्त्रीय वाटते.
- - - - - - - - - - - - -
एकं शास्त्रं अधीयानो न विद्यात शास्त्र निश्चयः।
तस्मात् बहुश्रुतम शास्त्रम विजानीयात चिकित्सकः।। . . . . सुश्रुत संहिता, सूत्रस्थान ४/७
एका शास्त्राने शास्त्र निश्चय होत नाही म्हणून वैद्याने अनेक शास्त्रांचा अभ्यास करुन मग चिकित्सा करावी.
ह्या उक्तीनुसार विशेषतः आयुर्वेद अभ्यासकांनी सिद्धांत, निदान-चिकित्सा, द्रव्यगुण विज्ञान, मान परिभाषा, भैषज्य कल्पना, अर्थकारण अशा सर्वच दृष्टिकोनातून सदर माहितीचा उपयोग करून ‘नीर क्षीर’ विवेक बुद्धीने सुयोग्य अशा औषधी कल्पांचा वापर व्यवसायात करावा.

+917208777773

Visit Our Page