Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Wednesday, October 21, 2015

सांधेदुखी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

सांधेदुखी – आयुर्वेदाच्या चष्म्यातून
पन्नाशी ओलांडली की किमान निम्म्या लोकांना सतावणारा आजार म्हणजे सांधेदुखी अगदी लहान वयात होणारे सांध्यांचे विकारही बरेच आहेत पण अशा विकारांचे गांभीर्य विशेष नसते व ते खास औषधोपचार न करता बरे पण लवकर होतात. तरुण वयात आणि उतार वयात होणारे सांध्यांचे विकार मात्र त्रासदायक ठरतात. म्हणून त्यांची माहिती साध्या-सोप्या, कोणालाही समजेल-उमजेल अशा भाषेत ह्याठिकाणी आपल्यासाठी सादर करीत आहोत.
ही माहिती फक्त औषधांबद्दलच नव्हे तर रोग, रोगाची कारणे, उपद्रव, संरक्षणाचे उपाय ह्यांसह दैनंदिन व्यवहारात आहार, विहार, आचरण, सवयी ह्यांविषयी देखील आहे.
सांधेदुखी म्हणजे काय ? ती कशी होते ?
सांधेदुखी साठी “संधिवात” हा शब्द व्यवहारात अगदी प्रचलित आहे. “संधि” आणि “वात” असे दोन मिळून “संधिवात” हा एक सामासिक शब्द बनलेला आहे. मुळात हा शब्द कसा तयार झाला हे सुरुवातीला समजून घेऊया.
आयुर्वेदाने वयाचे तीन गट केले आहेत. बाल वय हे कफाचे, तरुण वय पित्ताचे तर वार्धक्य हे वाताचे. त्यानुसार विशिष्ट वयोगटात होणारे रोग मुख्यतः त्या त्या दोषानुसार होत असतात. लहान वयात कफाचे रोग अधिक होतात, तारुण्यात पित्ताचे तर उतार वयात वातदोषाचे रोग अधिक होतात. आयुर्वेदाने शरीराचे पण असेच तीन हिस्से केलेले आहेत.
छातीपासून वरचा हिस्सा कफाचा, छातीपासून बेंबीपर्यंतचा भाग पित्ताचा तर बेंबीपासून खालचा हिस्सा वाताचा. त्यानुसार त्या त्या आजारांचे स्थान सुद्धा आपल्याला स्पष्ट दिसते.
कफ – पित्त - वात हे तीन दोष आहेत आणि त्या त्या दोषानुसार त्यांची स्वसंवेद्य तीन प्रमुख लक्षणे आहेत. कफाचे लक्षण आहे ‘खाज’, पित्ताचे लक्षण ‘दाह किंवा आग’ तर वाताचे लक्षण आहे ‘वेदना’.
ह्या सर्व बाबींचा विचार करता संधिवात हा उतार वयात होणारा आणि कंबरेच्या खालच्या भागात वेदना निर्माण करणारा आजार आहे हे आपल्याला स्पष्ट होईल. वास्तविक शरीरात सुमारे साडेतीनशे सांधे आहेत. मग सगळ्यात जास्त सांधेदुखी कंबरेच्या खालच्या भागातच का होते असा प्रश्न साहजिकच मनात येईल.
सगळ्या शरीराचा भार ज्या सांध्यांवर पडतो ते सांधे लवकर दुखू लागतात हे त्याचे साधे उत्तर. ही दुखणी संध्याच्या ठिकाणीच अधिक का होतात ह्याचेही कारण आयुर्वेदात दिले आहे.
"तत्रास्थिनि स्थितो वायुः पित्तं तु स्वेदरक्त्योः श्लेष्मा शेषेषु . . . ” म्हणजे वायु हाडांमध्ये असतो, पित्त घाम आणि रक्तात राहते तर कफ हा इतर सर्व धातूंमध्ये राहतो. म्हणून हाडांच्या सापळ्यात ज्या ठिकाणी सर्वाधिक हालचाली होतात त्या ठिकाणी म्हणजेच सांध्यांच्या ठिकाणी हे रोग जास्त प्रमाणात होतात.
सांधेदुखीची कारणे ?
संधिवात आणि आमवात असे दोन प्रकारचे मुख्य संधिविकार प्रत्यक्षात आढळतात. ह्या दोनही विकारात सांधेदुखी हे मुख्य लक्षण असते. संधिवातामध्ये विशिष्ट सांध्यात दोष उत्पन्न होतात तर आमवातामध्ये सर्व शरीरात निरनिराळी लक्षणे निर्माण होत असतात.
संधिवात हा मुख्यतः वात दोषाच्या वैषम्यामुळे उत्पन्न होतो तर आमवात मात्र अनेक दोषांच्या बिघाडामुळे निर्माण होतो. उतार वयामुळे होणारी वाताची विकृत वाढ, त्यात अस्थिसंधि म्हणजे वाताची हक्काची जागा, कुपथ्य, कमी व्यायाम, थंड पदार्थांचे अतिसेवन, वजन वाढणे, अनुवांशिकता अशा अनेक कारणांमुळे संधिवात होतो.
आमवात हा एक स्वतंत्र आणि गंभीर रोग आहे. त्यासाठी ‘आम’ म्हणजे काय व त्यामुळे आमवात कसा होतो हे समजणे आवश्यक आहे. त्यासाठी माधवनिदान ग्रंथात दिलेला श्लोक -
विरुद्धाहारचेष्टस्य मन्दाग्नेर्निश्चलस्य च l स्निग्धं भुक्तवतो ह्यन्नं व्यायामं कुर्वतस्तथा ll
वायुना प्रेरितो ह्यामः श्लेष्मस्थानं प्रधावति l तेनात्यर्थं विदग्धोऽसौ धमनीः प्रतिपद्यते ll
वातपित्तकफैर्भूयो दूषितः सोऽन्नजो रसः l स्रोतांस्यभिष्यन्दयति नानावर्णोऽतिपिच्छिलः ll
जनयत्याशु दौर्बल्यं गौरवं हृदयस्य च l व्याधीनामाश्रयो ह्येष आमसंज्ञोऽतिदारुणः ll
चुकीचा आहार विहार घेणारा, मंदाग्नि असणारा, व्यायाम न करणारा, पचायला जड व स्निग्ध अन्न सेवन करून लगेच व्यायाम करणाऱ्यास ‘आम’ होतो. असा आम, वायुने प्रेरित होऊन कफ स्थानात जातो. पुढे तो अमाशयाच्या सूक्ष्म स्रोतसांमध्ये शिरून अन्नरस, वात, आणि कफ-पित्ताने दूषित होऊन स्रोतसांना भरून बुळबुळीत व नाना रंगांनी प्रकट होतो. ही सर्व दूषित संरचना सांध्यांच्या ठिकाणी असलेल्या कफस्थानात (सायनोव्हियल कवचात) जाऊन स्थिर होतात. अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचा आमवात नावाचा विकार होतो.
आयुर्वेदाने सांगितलेली रोगाची ही संप्राप्ति समजायला नक्कीच कठीण आहे. थोडक्यात म्हणजे भूक नसतांना पचायला जड आणि स्निग्ध अन्न सेवन करून लगेच व्यायाम करण्यामुळे आमवात होण्याची भीती संभवते.
वेदना आणि सूज – विशेष माहिती....
थंडीने वेदना वाढते व शेकण्याने नियंत्रणात राहते. खेळतांना डोळ्याजवळ चेंडू लागला तर लगेच खिशातून रुमाल काढून तोंडाच्या वाफेने रुमालाला ऊब देऊन त्याठिकाणी हलकेच शेकण्याची पद्धत आपण अनेकदा पहिली असेल. हॉट वॉटर बॅगचा वापर पाठ किंवा कंबर शेकण्यासाठी आपण नेहमीच पाहतो. लवकर आराम पडण्यासाठी तेल लावून शेक घेण्याची पद्धत नक्कीच शास्त्रीय आहे.
भरपूर थंडीच्या ठिकाणी हातापायाला किंचितसा मार लागला तरी असह्य वेदना होतात पण तेवढाच मार उन्हाळ्याच्या दिवसात मात्र विशेष त्रासदायक वाटत नाही. कुठेही दुखापत झाल्यावर “ताबडतोब बर्फ लावावा” अशी सूचना डॉक्टर करतात. त्याचे कारणसुद्धा समजून घेऊया. मार लागल्यावर त्वचेखालच्या नाजूक रक्तवाहिन्या तुटतात व त्यातून रक्तस्राव सुरु होतो. हा रक्तस्राव त्वचेखालच्या जागेत साचू लागतो. तुटलेल्या रक्तवाहिन्या बर्फ लावण्यामुळे ताबडतोब आकुंचित होतात व रक्तस्राव की होतो. मार लागल्यावर त्याठिकाणी अपोआप बाधीर्य आलेले असते, म्हणून वेदना वाढत नाहीत आणि रक्तस्तंभनही होते.
सुजेवर बर्फ लावणे हा फक्त तात्पुरता इलाज आहे हे लक्षात ठेवावे. कालांतराने शेक देण्यानेच सूज व वेदना नियंत्रणात ठेण्यास उपयुक्त ठरते.
सुजेची ५ मुख्य लक्षणे -
1) स्थानिक उष्णता
2) लाली
3) वेदना
4) आकारात वाढ
5) हालचालीत अटकाव
सूज निर्माण होण्याची प्रक्रिया कशी घडते ?
शरीरात अराचिडोनिक अॅसिड नामक चरबी सदृश घटक असतो. सूज निर्मितीच्या प्रक्रियेत ह्यातील ऑक्सीडेटिव्ह प्रक्रिया वाढते. ह्यातून दोन मार्गाने सूजेची प्रक्रिया घडते. सायक्लो-ऑग्झिजिनेझ मार्गातून प्रोस्टाग्लॅंडिन्सची निर्मिती होते तर 5-लायपॉग्झिजिनेझ मधून ल्युकोट्राइन्सची निर्मिती होते. प्रोस्टाग्लॅंडिन्समध्ये अनेक रसायने असतात. त्यांच्या संयुक्त प्रभावाने रक्तवाहिन्यांचे विस्फारण होते, वेदनेची तीव्रता वाढते, परिणामी सूज, लाली, स्पर्शासहत्व ही लक्षणे उत्पन्न होतात. ल्युकोट्राइन्सपैकी LTB4 ह्या जातीच्या रसायनाने वेदनेच्या जागेवर पांढऱ्यापेशींचा संचय होऊन सूज वाढते. प्रोस्टाग्लॅंडिन्स व ल्युकोट्राइन्स ह्या घटकांना नित्रणात ठेवून सूजेची चिकित्सा करता येते. ह्या विषयाचे महत्व पुढे चिकित्सेच्या संदर्भात लक्षात येईल. अॅस्पिरीन सदृश (NSAID) औषधांची क्रिया अशीच होते.
सांधेदुखी होण्यापूर्वीची लक्षणे-
संधिवातात हालचालीच्या वेळी आवाज होणे, दीर्घकाळ एकाच सांध्यावर भार सहन न होणे अशी लक्षणे सुरुवातीला दिसतात. त्याकडे दुर्लक्ष केले तर रो बळावतो व लक्षणे तीव्र होऊन वेदना वाढत जातात.
आमवतात अंग दुखते, अन्नावर रुची राहत नाही, खूप तहान लागते, आळस येतो, शरीर जड होते, ताप येतो, अन्नपचन व्यवस्थित होत नाही व सांध्यांवर सूज येते.
प्रमुख लक्षणे –
संधिवात -
1. वार्धक्यात होणारा व वयानुसार लक्षणे अधिक बळावत जाणारा विकार. काही मार लागल्याशिवाय सहसा तरुण वयात होत नाही.
2. लोकसंख्येच्या मानाने खूप अधिक जणांना होतो
3. सांध्यांच्या मधली कूर्चा झिजते व हाडांचा एकमेकांवर घास्ल्याचा आवाज येतो
4. रोगात होणारी सर्व लक्षणे फक्त संध्यांपुरती मर्यादित असतात.
5. अधिक भार सोसणाऱ्या सांध्यांवर (गुडघे, कंबर, पाठीचे माणके) वेदना अधिक व सूज कमी
6. वेदना आणि सूज विशिष्ट सांध्यांवर स्थिर असते, जागा बदलत नाही.
7. सांध्यांच्या आजूबाजूला गाठी (स्पर) होतात.
8. त्वचेखाली गाठी (नोड्यूल्स) होत नाहीत.
9. स्त्री व पुरुषांमध्ये समान प्रमाणात होतो.
10. वार्धक्य, आनुवंशिकता, बाहेरून आघात, झीज, अधिक वजन वाढणे, हॉरमोन्सची कमी, स्नायुदौर्बल्य अशी प्रमुख करणे आढळतात.
11. वेदना आणि सूज क्रमशः वाढते, जागा बदलत नाही.
12. सकाळी उठल्याबरोबर सांधे आखडतात पण थोड्याफार हालचालीनंतर मोकळे होतात. जास्त चाल झाल्यावर पुन्हा दुखू लागतात.
13. सांध्यांमध्ये वेदना आणि सूज ह्याशिवाय फारशी अधिक लक्षणे दिसत नाहीत.
14. आजार सांध्यांपुरताच मर्यादित असतो त्यामुळे वेदना सोडल्यास अन्य रोग होऊन आयुष्मान कमी होण्याची शक्यता नसते.
आमवात -
1. अगदी लहान वयापासून केव्हाही होऊ शकतो. ३० ते ५० मध्ये अधिक संभवतो.
2. लोकसंख्येच्या मानाने पीडितांची संख्या त्यामानाने कमी.
3. सांध्यांमधील सायनोव्हिअल कवचात दोष संचय होतो, कूर्चा शाबूत असते.
4. ताप, सर्व शरीरावर सूज, हृदयात जडपणा, फुप्फुस विकार, डोळ्यांचे विकार अशी अनेक सर्वादेहिक लक्षणे होतात.
5. हातापायांची बोटं, मनगट अशा सांध्यांवर सूज, वेदना, स्थानिक उष्णता, लाली अशी लक्षणे होतात.
6. सूज अदलून बदलून निरनिराळ्या तीस पर्यंत सांध्यांवर दिसते.
7. योग्य चिकित्सा न केल्यास सांध्यांमध्ये वक्रता / व्यंग निर्माण होते.
8. २० ते ३० % रुग्णांमध्ये त्वचेखाली गाठी (नोड्यूल्स) होतात.
9. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये ३ पट अधिक प्रमाणात होतो.
10. रोगप्रतिकारक्षमता कमतरतेमुळे सांध्यांच्या कवचावर आघात करणारा विकार (ऑटोइम्यून डिसीज).
11. अचानकपणे लक्षणांचे गांभीर्य कमी-अधिक होते व जागाही बदलत राहते.
12. सकाळी उठल्याबरोबर सांधे आखडतात व दीर्घकाळ पर्यंत तसेच आखडलेले राहतात.
13. सतत आजारी असल्याची भावना, मंद ताप, प्रचंड थकवा व स्नायूंमध्ये वेदना होत असतात. हृदयरोग व काही कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते.
14. सार्वदेहिक आजार असल्यामुळे आयुष्मान कमी होण्याची शक्यता असते.
पथ्यापथ्य –
रोग होण्याच्या कारणांपासून दूर राहणे हाच पथ्यापथ्याचा खरा कानमंत्र. फक्त संधिविकारातच नव्हे तर स्वास्थ्याच्या दृष्टीने एकूणच विचार केला तर आपल्याला एक गोष्ट स्पष्ट दिसेल की जाडजूड लोकांपेक्षा सडपातळ प्रकृतीचे लोक तुलनेने कमी आजारी असतात. त्यांना काही आजार झालाच तर लवकर आटोक्यात येतो, रोगाचे इतर उपद्रव अतिशय कमी प्रमाणत होतात, चिकित्साही जास्त काल घ्यावी लागत नाही, त्यांचे आयुष्मान देखील तुलनेने अधिक असते. दोन घास जास्त खाण्यापेक्षा दोन घास कमी खाणे कधीही हितकार असते हे कायम स्मरणात ठेवावे. अतिव्यायामाने धातूंची झीज अधिक होते. त्यामुळे मर्यादित व्यायाम पण अतिशय नियमितपणे करावा. शीतपेय, आईस्क्रीम्स ह्यांचे सेवन क्वचित व मर्यादित प्रमाणात करावे. फसव्या जाहिरातींच्या मोहात पडून बारा महिने तेरा काळ थंड पाणी / पेय घेण्यामुळे आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो. सूर्यनमस्कार व योगासने करण्याने बॉडी पहेलवानासारखी दिसणार नाही पण निरोगी राहू शकते. प्रत्येक संध्याला एक नियोजित हालचाल करण्यासाठी निसर्गाने रचलेले आहे. दिवसातून एकवेळा तरी ती नियोजित हालचाल त्यात्या संध्याकडून करून घ्यावी. उदा. मनगटाच्या हालचाली किती प्रकारे होऊ शकतात (प्रसाद घेण्यासाठी हात पुढेकारतो तशा स्थितीपासून, मुठ गुंडाळून) –
1) शरीराच्या जवळ घेणे (फ्लेक्शन)
2) शरीरापासून खाली घेणे (एक्सटेन्शन)
3) शरीरापासून बाजूला घेणे (अॅब्डेक्शन)
4) शरीराजवळ घेणे (अॅडक्शन)
5) सुलट्या दिशेने फिरवणे (क्लॉकवाईज रोटेशन)
6) उलट्या दिशेने फिरवणे (अॅंटिक्लॉकवाईज रोटेशन)
सांधेदुखी ची परिपूर्ण चिकित्सा -
सांधेदुखीची चिकित्सा दोन प्रकारांनी होते. तोंडावाटे औषधोपचार करून आणि स्थानिक उपचार करून. ह्या दोन्ही प्रकारच्या चिकित्सा यशस्वीपणे करण्यासाठी वातमुक्ता गोळ्या व लिनिमेंट कशाप्रकारे सहाय्य करतात ते आता पाहूया-
वातमुक्ता गोळ्या -
देवदार (Cedrus deodara), एरंडमूळ (Ricinus communis), हाडजोडा (Cessus quadrangularis), शल्लकी निर्यास (Boswellia serrata), शुद्ध गुग्गुळ (Balsamodendron mukul), शुद्ध कुचला (Strychnous Nux-vomica) हा आहे वातमुक्ता गोळ्यांचा पाठ.
देवदार : सूजनिर्मितीच्या प्रक्रियेत केंद्रबिंदु असलेले लायपॉग्झिजिनेझ स्राव रोखून सूज नियंत्रण करण्याचे प्रभावी कार्य देवदाराने होते. ह्याशिवाय उत्तम वेदनाशामक म्हणून ही वनस्पती स्वयंसिद्ध आहे.
एरंडमूळ : डायक्लोफिनॅक सोडियम नामक वेदनाशामक औषध आधुनिक वैद्यक शास्त्रात प्रसिद्ध आहे. कोणतेही कारण असो, ह्या औषधाने तत्काळ वेदना थांबते. एरंडमुळाचा तौलनिक अभ्यास ह्या औषधाबरोबर केला असता ह्यातील वेदनाशामक गुण तुल्यबलअसल्याचे निदर्शनास आले. आयुर्वेदातही आमवाताच्या चिकित्सेत हे श्रेष्ठ असल्याचे वर्णन मिळते. “आमवातगजेन्द्र स्य शरीरवनचारिणःl एक एव निहन्ताऽयमैरण्डस्नेहकेसरी ll” आमवातरुपी गजेन्द्राचा नाश करणारा एकमेव सिंह म्हणजे एरंडस्नेह आहे.
हाडजोडा : व्यायाम नेहमी अर्धशक्ति करावा असे आयुर्वेदात वर्णन आहे. अवाक्यापेक्षा जास्त व्यायाम केल्यामुळे हाडांतील सांध्यांची झीज होते व त्याठिकाणी सूज येते. व्यायामाबद्दलच्या चुकीच्या समजुतीने किंवा जलद वजन नियंत्रणाच्या अपेक्षेने काही तरुण मंडळी अघोरी व्यायाम करतात. अशा कारणामुळे झालेल्या सांधेदुखीवर हाडजोडाचा प्रयोग वेदनामुक्ति उत्तम ठरला असा निष्कर्ष संशोधनांति सिद्ध झाला.
शल्लकी निर्यास : शाल्लकी नावाच्या झाडापासून निघणाऱ्या डिंकाला शल्लकी निर्यास म्हणतात. ह्यात बोसवेलिक अॅसिडनाकाम कार्यकारी घटक असतो. शाल्लकी सेवनाने उत्तम वेदनानियंत्रण होते व गुडघ्यातील हालचाली अल्पकाळात पूर्ववत होतात असे सिद्ध झाले आहे. आमवात व संधिवात अशा दोन्ही प्रकारच्या संधिविकारात उपयोगी ठरणारे हे औषधी द्रव्य आहे. सूजनिर्मितीसाठी कारणीभूत असलेल्या ल्युकोट्राइन्सवर ह्याचे कार्य होते.
शुद्ध गुग्गुळ : केवळ सूजनियंत्रण नव्हे तर विशेषकरून सांध्यांच्या सुजेवर शुद्ध गुग्गुळ अतिशय उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. रक्तातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठीसुद्धा गुग्गुळाचा उपयोग प्रसिद्ध आहे. वजन वाढीमुळे सांध्यांवर पडणारा भार कमी करून ह्याचा दुहेरी फायदा होतो. सूजनिर्मिती करणाऱ्या प्रोस्टाग्लॅंडिन्सना आटोक्यात ठेवून ह्याची क्रिया होते.
शुद्ध कुचला : ही एक विषारी वनस्पती आहे. योग्यप्रकारे उपयोग केला तर विषदेखील परामौषध म्हणून उपयोगी होऊ शकते तर चुकीच्या पद्धतीने उपयोग केला तर अमृतसुद्धा विषसमान काम करते. ह्या तत्वानुसार आयुर्वेदाने कुचल्याची शुद्धि करून त्याचा अमृतरूपी वापर करण्याचा कानमंत्र दिला आहे. स्ट्रिकनिन व ब्रूसीन असे दोन विषारी घटक ह्यात प्रामुख्याने असतात. पैकी स्ट्रिकनिन अधिक विषारी असते. आयुर्वेदात सांगितलेल्या शुद्धी क्रियेमुळे ह्यातील स्ट्रिकनिन नाहीसे होते व ब्रूसीन चे परिवर्तन आयसोब्रूसीनमध्ये होऊन अत्यंत प्रभावशाली वेदनाशामक म्हणून कार्य करते. हे कार्य केवळ स्थानिक नव्हे तर केंद्रीय मज्जा यंत्रणेवरही होते ज्यामुळे वेदनेचे गांभीर्य त्वरित आटोक्यात येते. शुद्धी केल्यावर कुचल्याचे अनेक सुप्त गुण दिसू लागतात. ह्याने रोगप्रतिकारक्षमता सुधारते, यकृताचे कार्य सुधारते, अपस्मार रोगात उपयोगी ठरते, स्मरणशक्ती सुधारण्यास सहाय्य करते, काही विशिष्ट प्रकारच्या कॅन्सरसाठी उपयोगी ठरते, पचनाच्या तक्रारींवर (जुलाबावर) नियंत्रण करते व सर्पदंशावर लाभदायक होते.
वातमुक्ता लिनिमेंट
विषगर्भ तेल, महामाष तेल, नारायण तेल, गंधपुरा तेल – हा आहे वातमुक्ता लिनिमेंटचा पाठ.
विषगर्भ तेल : प्रामुख्याने शुद्ध कुचला असलेले, सांध्यांच्या सुजेवर अत्यंत गुणकारी असे हे तेल आहे. गृध्रसी (सायाटिका), डोकेदुखी, हाडांमध्ये वेदना, कानामध्ये आवाज (टिनिटस), मांसक्षय, खूप चालण्यामुळे होणारी अंगदुखी, पक्षाघात (पॅरालिसिस), हनुस्तंभ अशा सर्वप्रकारच्या वातरोगांवर गुणकारी आहे. बाल वयात आणि गर्भावस्थेत ह्याचा वापर करू नये.
महामाष तेल : पक्षाघात (पॅरालिसिस), हनुस्तंभ, चेहऱ्याचा पॅरालिसिस (फेशियल पॅरालिसिस), मन्यास्तंभ, हनुस्तंभ, सांधे आखडणे, पाठीच्या व मानेच्या मणक्यांचे विकार (स्पॉन्डिलोसिस), मुकामार, आमवात व संधिवात, मांसक्षय, अशा विकारांमध्ये उपयोगी. ह्याचा विशेष उपयोग वार्धक्यात होणाऱ्या विविध वातविकारांवर उत्तम होतो. अभ्यंग, नस्य, शिरोधारा, बस्ति व सेवनासाठी ह्या तेलाचा वापर करता येतो.
नारायण तेल : लांबच्या प्रवासामुळे होणारी अंगदुखी, संधिवात, आमवात, वातरक्त (गाऊट), मणक्यांचे विकार (स्पॉन्डिलोसिस) व हाडांना बळकटी देण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. अभ्यंग, नस्य, शिरोधारा, बस्ति व सेवनासाठी ह्या तेलाचा वापर करता येतो.
गंधपुरा तेल : ह्यालाच विंटरग्रीन तेलही म्हणतात. ह्याचे झाड ऐन बर्फावृष्टीतही सदा हिरवे राहणारे असल्यामुळे विंटरग्रीन नाव पडले आहे. ह्या झाडापासून निघणारे पिवळसर सुगंधी तेल जगात सर्वत्र वापरले जाते. ह्या तेलात मिथाइल सॅलिसिलेट नामक वेदनाशामक रसायन असते. ह्या तेलाचा वास थोडाफार निलगीरीप्रमाणे असतो. ह्याचा प्रयोग फक्त बाह्य वापरासाठीच करावा. पोटात घेणे योग्य नाही. त्वचेवर लावल्याने शेकल्याप्रमाणे जाणवते व वेदना शमन करण्यास उपयुक्त ठरते. त्वचाविकार किंवा जखम असता ह्याचा वापर टाळावा.
वातमुक्ता कोणी घ्यावे?
तहान लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा आधीच पाण्याची व्यवस्था करावी. सांधेदुखी होण्यापूर्वीची लक्षणे दिसू लागताच वातमुक्ता गोळ्या व लिनिमेंट मध्यम मात्रेत घेण्याची व वापरण्याची सुरुवात करावी. ह्याने “प्रिवेन्शनइज बेटर दॅन क्युअर” ही म्हण आपल्याला अंमलात आणता येईल व पुढे होणारे त्रास, उपद्रव आणि ऑपरेशन (नी रिप्लेस्मेंट / जॉइंट रिप्लेसमेंट) सारखे खर्चिक इलाज टाळता येतील. गर्भिणींनी उदरावर लावण्यासाठी व ६-७ वर्षाखालील मुलांनी सोडून सर्वांनी ह्या तेलाचा सर्वप्रकारच्या दुखण्यांवर डोळे झाकून वापर करावा. वेदना, सूज, पाठदुखी, कंबरदुखी, खांदे आखडणे (फ्रोजन शोल्डर), सायाटिका क्निवा अन्य कोणत्याही वातरोगापासून खऱ्या अर्थाने मुक्ति मिळवण्यासाठीच निर्माण केले आहे वातमुक्ता, गोळ्या व लिनिमेंट स्वरुपात.
सेवन विधी :
गोळ्या : २ – २ गोळ्या दोन वेळा रिकाम्यापोटी, कोमट पाण्याबरोबर.
लिनिमेंट : वेदनेच्या ठिकाणी हलक्या हाताने मसाज व शेक, दिवसातून दोन वेळा.
सावधगिरीचा इशारा :
औषध घेण्याने क्वचित प्रसंगी थोडे आम्लपित्त होण्याची शक्यता आहे. असे होत असल्यास गोळ्या जेवणानंतर घ्याव्यात. लिनिमेंटचा वापर गर्भिणींनी करू नये. बाल वयात त्वचा सुकुमार असते म्हणून लिनिमेंटचा वापर टाळावा. त्वचारोग, त्वचेला भेगा असतील त्या ठिकाणी लिनिमेंट वापरू नये.
ह्या लेखातील माहिती वाचकांना ज्ञानवर्धनासाठी दिली आहे. वैद्यांच्या सल्ल्याशिवाय औषधसेवन करणे योग्य नाही हे सदैव स्मरणात ठेवावे.

No comments:

Post a Comment

Visit Our Page