Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Friday, October 23, 2015

पंचकर्म

   सध्या प्रसारमाध्यमातून आयुर्वेद आणि पंचकर्म याबाबत इतकी जास्त जाहीरातबाजी होत आहे की पुष्कळजणाना पंचकर्म करून घेण्याची इच्छा उत्पन्न झालेली आहे .यासाठीच आता पंचकर्म म्हणजे काय ?, ते नेमके का?, कधी?, कशासाठी?,कोणाला करतात? ते पाहू.
पंचकर्म म्हणजे काय?
  आयुर्वेदात चिकित्सेचे महत्वाचे दोन प्रकार १)शमन आणि २) शोधन त्यातील हा आयुर्वेदीय शोधन चिकित्सा प्रकार आहे.
१)शमन-औषधे देउन वाढलेले दोष कमी करणे, कमी झालेले शरीरातील घटक, दोष प्रमाणात आणणे म्हणजे शमन चिकित्सा.
२)शोधन-दोष जर प्रमाणा बाहेर वाढलेले असतील किवा कुठल्यातरी शरीर घटकाच्या(शरीर धातू) आश्रयीत ,चिकटून बसलेले असतील तर त्याना त्या पासून मोकळे करून शरीरातून जवळच्या मार्गाने बाहेर काढणे म्हणजे शोधन चिकित्सा.
ही पंचकर्म कोणती ?
पंचकर्माच्या ५ मुख्य प्रक्रीया आहेत.
रोगाच्या स्वरूपानुसार त्या त्या दोषासाठी वेगवेगळ्या प्रक्रीया केल्या जातात.
तसेंच ऋतूनुसार देखील स्वस्थ व्यक्तीने स्वस्थ राहण्यासाठी ऋतु नुसार शोधन घेण्याचे वर्णन आहे. रसायन वाजीकरण चिकित्से पूर्वी शोधन घ्यावे असे वर्णन आहे, थोड्यात पंचकर्म हि शुद्धी चिकित्सा आहे  
पंचकर्म
१) वमन
२)विरेचन
३)बस्ती
४)नस्य
५)रक्तमोक्षण
हे शोधन कशा पद्धतीने करतात?
पूर्वकर्म :- 
  ह्या प्रक्रीया करण्यापूर्वी शरीरातील वाढलेले दोष जे शरीर घटकाना काही वेळा चिकटून बसलेले त्यात लपून बसलेले असतात त्याना त्या पासून मोकळे करून मध्य मार्गात (कोष्ठात)आणून जेणे करून ते सहजगत्या शरीराबाहेर काढता येतील अशी योजना करावी लागते. ह्यालाच पूर्वकर्म म्हणतात.ही २ आहेत
                    १)स्नेहन    २)स्वेदन
             १)स्नेहन- काही दिवस आधी पासून पोटातून औषधी तेलं /तुपं एका विशिष्ट मात्रेत प्यायला देउन,तसेच अंगाला मालिश करून (थोडक्यात शरीराला आंतरबाह्य स्निग्ध करून ) चिकटून बसलेले दोष सुटे केले जातात.
जस तेल लावलेल्या भांड्याला पदार्थ चिकटत नाही , किवा स्निग्ध ते मुळे चिकटून बसलेले घटक सुटे होतात त्याच प्रमाणे हे घडते.
         २)स्वेदन-शरीराला वेगवेगळ्या प्रकाराने घाम येइल असे उपाय करून (वाफेचा शेक.)देउन दोष उष्णते मुळे सुटे झालेले दोष वितळून पाझरत पाझरत मध्यमार्गात (कोष्ठात)येतात.
      दोषांच्या शक्ती नुसार प्रमाणानुसार तसेच आजारानुसार हे पूर्वकर्म साधारणपणे ३ ते ५ दिवस करावे लागते
त्यानंतर रुग्णाचे पोट आणि नाडी,बल  तपासून गरजेनुसार जवळच्या मार्गाने दुषित दोषांना शरीरातून बाहेर काढले जाते.
मुख्य कर्म
   १)वमन-दोषाना उर्ध्व मार्गाने (वरच्या बाजूने) शरीराबाहेर काढणे-अर्थात उलटी वाटे तोंडावाटे दोषाना बाहेर काढणे.
        ही क्रिया प्रामुख्याने ज्या रोगात दुषित कफ दोषाचे प्रमाण शरीरात वाढलेले असते अशा रोगात करतात(अनेक प्रकारचे त्वचारोग्,आम्लपित्त्,दमा ई.).पूर्वकर्मा नंतर आतड्यात वरील बाजूला किवा जठरात जमा झालेले दोष उलटीचे औषध,सहज उलटी होइल अशा काढ्याबरोबर /दुधाबरोबर, उसाच्या रसासह तथा औषधी कल्पांसह प्यायला देउन. तोंडातून बाहेर काढले जातात.
प्यायला दिलेल औषधाचे  प्रमाण मोजलेले असते.उलटी वाटे बाहेर पडलेले द्रव्य ही मोजले जाते त्याचे स्वरूप वास याची नोंद ठेवली जाते.
  २)विरेचन- अधो  बाजूने म्हणजे मलमार्गाने दोषांना रेचक औषधांचा वापर करून बाहेर काढणे म्हणजे विरेचन.विरेचन हा वाढलेल्या पित्त दोषाचा प्रमुख उपचार आहे.अनेक प्रकारचे त्वचारोग ज्यात लाली, जळजळ असते ,पित्ताची डोकेदुखी,अंगावर  गांधी उठणे  ,मुळव्याध,कावीळ तसेच ज्या रोगात विकृत पित्त वाढलेले आहे अशात विरेचन दिले जाते.या प्रक्रियेतही रुग्णाला आलेल्या मल वेगांची नोंद ठेवली जाते 
  ३)बस्ती- "बस्ती जीरवते वाताची मस्ती " असच वैद्य प्रत्येक रुग्णाला सांगत असतात ,ही वात दोष वाढलेला असल्यास मुख्य उपचार म्हणून दिली जाते.बस्ती म्हणजे औषधी काढे,सिद्ध तेल अथवा सिद्ध तूप  असे गुदद्वारातून मोठया आतडयात सोडले जाते. यामुळे आतडयातील शुष्क  मलाचे थर सुटतात. तेल आतडयात शोषले जाऊन काही आवश्यक घटकांचा पुरवठा होतो.अनेक वातव्याधी(सांधेदुखी,कंबर दुखी),हाडांचे रोग,आतड्यातील विकार ,त्वचारोग यात बस्ती ची उपाययोजना उपयोगी ठरते .
  4)नस्य-नस्य म्हणजे नाकात औषधी तेलाचे ,तुपाचे थेंब किंवा चूर्ण टाकणे.मानेच्या वरच्या अवयवांचे आरोग्य सुधारण्यास,  काही प्रकारच्या डोकेदुखीत नस्याचा उपयोग होतो.ज्या आजारांचा मेंदूशी जवळचा संबंध आहे अशात (पक्षाघात , अर्दीत (facial palsy) याचा बराच उपयोग होतो.
  ५)रक्तमोक्षण -रक्तमोक्षण म्हणजे दूषित रक्ताला शरीराबाहेर काढणे. आयुर्वेदात यासाठी जळवांचा वापर करतात. पण त्वचाविकारात जेथे चिकट स्त्राव होत असतो तिथे जळवा लागत नाहीत अशाठिकाणी काही वेळा सुचीवेधाद्वारे रक्त काढल्या जाते 
     पंचकर्मा शी निगडीत काही उपचार आहेत.जे कहीवेळा एखादा पंचकर्मापैकी चा उपचार करताना सहाय्य म्हणून केले जातात किवा काहीवेळा मुख्य उपचार म्हणूनही करावे लागतात
वेगवेगळे अभ्यंगाचे प्रकार ,स्वेदनाचे प्रकार, शिरोधारा ,कटीबस्ती,जानुबस्ती ई.
ही पंचकर्म कधी करतात?
१) आजारानुसार पंचकर्म-
    आयुर्वेदात व्याधीच्या अवस्थांचे वर्णन आहे .पेशंट ची आजाराची लक्षणे पाहून ,नाडी आणि पोट ,बल  तपासून वैद्यास व्याधीची अवस्था कळते.अशा काही अवस्थांमध्ये गोळ्या काढे औषधे  देऊन व्याधी आटोक्यात येण्यासारखा ,बरा होण्यासारखा नसतो.अशावेळी हे उपचार उपयोगी ठरतात.
२)आजाराचा जोर कमी करण्यासाठी लाक्षणिक उपचार म्हणूनही काहीवेळा हे उपचार करावे लागतात.
उदा.खूप दिवस मलप्रव्रुत्ती न झाल्यास , मलाचे खडे झाल्यास बस्ती देतात. दम्यात कफाची घरघर वाढलेली असताना कधीकधी तात्कालिक उपाय म्हणून लघु  वमन द्यावे लागते.
३)ऋतू नुसार शरीरात दोषांचे प्रमाण कमी जास्त होत असते, अशावेळी काही आटोक्यात असलेल्या(सध्या लक्षणे न दिसणार्या) व्याधी बळावतात्,जोर धरतात अशा व्याधीत त्यापूर्वीच्या ऋतूत हे उपचार करावे लागतात.वर्ष्या ऋतूत वात निर्हरहर्नार्थ बस्ती, वसंत ऋतूत वामन, शरद ऋतूत विरेचन अथवा रक्तामोक्षण
४)विशिष्ट आजार लक्षणे नसणार्या व्यक्तीस तिच्या शरीरातील दोषबदल पाहून ऋतू नुसार एखादा उपचार सुचवला जाउ शकतो. उदा. स्थूल (obese ) स्वेदन.
५) आयुर्वेदात सांगितलेल्या रसायन,वाजीकरण  उपचारापूर्वी हे उपचार केले जातात
ह्या पंचकर्माचा साधारण कालावधी काय?
              प्रथम पंचकर्म उपचार म्हणजे हे सगळे उपचार एकत्र घ्यायचे हा समज चुकीचा आहे.
व्याधीच्या बलानुसार ,ऋतूनुसार्,प्रकृती नुसार रुग्णास उपचार केला जातो.
काहीवेळा शोधन उपचारापूर्वी चे पूर्वकर्म (स्नेहन आणि स्वेदनाचे उपचार ) केल्यानंतर दोषांची गती ( दिशा पाहून रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार जवळच्या मार्गाने दुषित दोषांना) शरीरातून बाहेर काढले जाते. अशावेळी वमनासाठी औषध द्यायचे का विरेचनासाठी हे त्या त्या वेळी ठरते.
दोषांच्या शक्ती नुसार प्रमाणानुसार तसेच आजारानुसार पूर्वकर्म साधारणपणे ३ ते ५ दिवस करावे लागते
त्यानंतर रुग्णाचे पोट आणि नाडी तपासून गरजेनुसार वमन किवा विरेचन दिले जाते
     बस्ती,नस्य हे उपचार काही दिवस सतत/दिवसाआड/एका दिवसातून दोनदाही गरजेनुसार करावे लागतात
रक्तमोक्षण त्या आजाराच्या लक्षणांनुसार करावे लागते.
काही आजारांमध्ये पूर्वकर्म (स्नेहन-स्वेदन) हीच मु़ख्य उपचार म्हणून केली जातात
पंचकर्मा साठी पथ्य :-
   कोणत्याही उपचारात पथ्यास खूप महत्व आहे,मग ती कोणतीही उपचार पद्धती असो.
हे उपचार करण्यापूर्वी,ते सुरू असताना आणि त्यानंतरही काही दिवस आहार विहारा संबंधीचे पथ्य पाळावेच लागते.यात अगदी खाण्यापिण्यापासून ,गरम कपडे,आंघोळीसाठी गरम पाणी ,थंड हवेत न जाणे , दिवसा न झोपणे ई. सर्व काटेकोर पणे पाळावेच लागते.
  इतर उपचारांप्रमाणेच ह्या उपचारातही अयोग- अतीयोग असे धोके असतात, मात्र अनुभवी,वैद्याकडून उपचार झाल्यास ते नगण्य असतात.
ह्या उपचारानंतर शरीर घटक दोषांचे प्रमाणात रहाणे योग्य आहारविहाराने,काही वेळा काही औषधांच्या सहाय्याने राखता येऊ शकते .
पण हे उपचार एकदा केले म्हणजे झाले असे नेहमीच नसते. बर्‍याच व्याधीत त्यांच्या अवस्थेनुसार्/ऋतू बदलान्चे परीणाम म्हणून नंतरही ते आवश्यकतेनुसार करावे लागतात.
वेगवेगळ्या व्याधीत,लक्षणानुसार,वयानुसार ह्या उपचारात वापरली जाणारी औषधी तेले-तुपे,काढे,शेकाचे प्रकार वेगवेगळे असतात.
    या उपचारास मर्यादा आहेत, कोणावरही सरसकट हे उपचार करता येत नाहीत आजाराच्या विशिष्ट अवस्था,वय,गर्भिणी ,अती नाजुक प्रकृतीची माणसे हे अपवाद ठरू शकतात.
यासर्व उपचारापूर्वी,उपचार चालू असताना आणि पूर्ण उपचार संपल्यानंतर(त्यानंतर जावा लागणारा पथ्याचा कालावधी झाल्यावर) त्या त्या आजारानुसार लक्षणान्ची ची नोंद ठेवली जाते.
हा एक वैद्यकीय उपचार आहे.प्रशिक्षीत वैद्याच्या सल्याने ,त्यांच्या मार्गदर्शनाखालीच केला जावा.
डॉ . सुशांत शशिकांत पाटील 
अथर्व आयुर्वेद हॉस्पिटल 
६० फुट रस्ता , आय. डी .बि. आय. बँकेसमोर ,
वसई रोड (पश्चिम )
9860431004
9158949110

No comments:

Post a Comment

Visit Our Page