Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, November 26, 2015

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 5

नमस्कार!
आधीच्या लेखांमध्ये आहाराच्या अयोग-अतियोग-मिथ्यायोगाबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेतली. आज आहाराच्या समयोगाविषयी माहिती घेऊ या.
मंडळी, आधीचे लेख वाचताना एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल ना? ती अशी की – चुकीच्या आहार सेवनाने म्हणजेच आहाराच्या अयोग-अतियोग-मिथ्यायोग झाल्याने निर्माण झालेले आजार जर दूर करायचे असतील तर काय करायला हवे आणि काय नको हे समजून घेताना केवळ त्या चुका टाळणे एवढेच पुरेसे नाही तर योग्य पद्धत अवलंबणे हेही महत्त्वाचे आहे. खरेतर कोणत्याही चुकीच्या वा घातक गोष्टीने त्रास झाला तर ती गोष्ट पूर्णपणे बंद करणे गरजेचे असते हे आपण बघतो, जमेल तसे पाळतो पण त्या चुकीच्या गोष्टीचा प्रभाव कमी करण्यासाठी शरीराला हितकर अश्या चांगल्या गोष्टींचा वापरही करायला हवा हेही तितकेच खरे, हो ना? जसे हृद्रोग्याने आपल्याला रोग का झाला याचे कारण समजून घेऊन ते बंद करायला हवेच पण त्याचबरोबर शरीराला हितकर अशा चांगल्या सवयींचा अंतर्भाव नियमितपणे करायलाच हवा. जेवणात तेल-तूप पूर्ण बंद करणे, ओट्स्, जवस, इ. धान्यांचा वापर वाढवणे हा त्यावरचा पूर्ण उपाय नाही तर म्हणजेच आहाराच्या मिथ्यायोगाने झालेल्या हृद्रोगात, स्निग्ध पदार्थांचा अयोग (तेल-तूप पूर्णपणे बंद करणे) वा काही पदार्थांचा अतियोग (ओट्स्, नवनवीन तेले, जवस यांचा अमर्याद वापर करणे) हा त्यावरचा पूर्ण उपाय नसून संपूर्ण शरीराला आणि विशेषतः हृदयाला हितकर अश्या द्रव्यांचा, सवयींचा, पद्धतींचा वापर नियमित करणे व त्यापासून दुसरे कोणतेही आजार निर्माण न होता, आहे तोच आजार आटोक्यात ठेवता येणे वा बरा करता येणे म्हणजेच समयोग साधणे असे म्हणणे बरोबर ठरेल.
तर समयोग साधण्यासाठी या छोट्या छोट्या सवयी कोणत्या, कोणकोणते पदार्थ आपण उठल्यापासून निजेपर्यंत पोटात घालत असतो याचा सारासार विचार करायला हवा.
1. आपल्या रोजच्या छोट्या-छोट्या सवयींकडे डोळसपणे बघायला हवे ही पहिली पायरी.
2. चुकीच्या सवयी कोणत्या हे कळले की त्या बदलल्या पाहिजेत ही दुसरी पायरी.
3. बदलल्यानंतर कोणत्याही जाहिरातींना भुलून न जाता त्या चांगल्या सवयींवर ठाम राहाणे ही तिसरी पायरी. असे घडले तरच आपण आहाराचा व गंभीरपणे विचार करत आहोत असे म्हणता येईल.
आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्तिची लक्षणे सागितली आहेत ती अशी –
समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियाः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनः स्वस्थ इत्यभिधीयते।।
सुश्रुतसंहिता सूत्रस्थान 15/10
म्हणजेच सोप्या भाषेत - शरीरातील सर्व घटक योग्य प्रमाणात असणे, भूक वेळच्यावेळी लागणे, त्यानंतर खाल्लेल्या अन्नाचे पचन योग्य होणे, शरीरातील सर्व लहान-मोठ्या क्रिया सुरळीत चालू असणे, आत्मा, मन व इंद्रिय हे प्रसन्न असणे ही ती लक्षणे होय.
WHO नेही Health ची व्याख्या सांगताना म्हटले आहे -
Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity.
“मला काहीही होत नाही, रोज मी दही खातो, शिकरण खातो, मी अजून तरी धडधाकट आहे” वा “रोज मी भेळ खाते” वा “रोज मी दोन पेग दारु पितो - काय धाड भरलीये मला?” अशी वाक्ये आपल्याला नेहमी ऐकू येतात. संवाद तेच फक्त चुकीच्या द्रव्यांची यादी न संपणारी. आता असे म्हणणे म्हणजे स्वतःबद्दल अति-आत्मविश्वास, चुकीच्या गोष्टीचे समर्थन आणि भविष्याकडे डोळेझाक असेच म्हणायला हवे.
किंवा - "पूर्वी मी फार तिखट खात होते, आताशा मात्र नाही चालत" म्हणजेच त्या पूर्वी खाल्लेल्या तिखटाचे दुष्परिणाम शरीर अजूनही भोगतंय आणि तिखट खाण्याची वा पचविण्याची शरीराची सहनशक्ती त्यामुळे कमी झालेली आहे. बघा बरं, लहानपणी खाल्लेली चिंचा,कैऱ्या,पेरू आता या मध्यम वा उतार वयात खायचा प्रयत्न केल्यास त्रास होतोच. ते पदार्थ वाईट नसतातच फक्त ते सध्या आपल्या शरीराला हितकर आहेत वा नाही याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा.
हितकर असे अन्न-पान योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने शिजवून, योग्य प्रकारे व नियमित सेवन करणे, ते पचविणे व एकूण देनंदिन व्यवहारही त्याला पूरक असा वा कमी त्रासदायक करणे म्हणजे समयोगाच्या दृष्टीने आपण योग्य पाऊल उचलले आहे असे म्हणायला हरकत नाही.
आहाराच्या समयोगाचे फायदे म्हणजे स्वास्थ्य मिळणे व ते दीर्घकाल टिकणे हे वेगळे सांगायला नकोच, नाही का? अर्थातच आहार बरोबर विहार व आचार हेही महत्त्वाचेच व सर्व एकमेकांवर अवलंबून असल्याने आहारानुसार विहार-आचार व विहार-आचारानुसार आहार हा बदलायलाच हवा. जसे रोज सात्त्विक पूजा करणाऱ्या वा साधना करणाऱ्या योग्याने तामसी आहाराच्या वाटेला जाऊच नये तसेच. विद्याभ्यास करणाऱ्यांनीही मीठ कमीत कमी खावे कारण त्याने इंद्रियांवर विशेषतः डोळ्यांवर वाईट परिणाम होतो परंतु आजच्या मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण - टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर यांचबरोबर विविध कंपन्यांचे वेफर्स, बटर-चीझयुक्त पदार्थ, वेगवेगळे बाजारी सॉस, लोणची, फरसाण, बिस्किटे, पापड, रेडीमेड शीतपेये हेही आहेत. त्यामुळे फक्त गॅजेट्स्च्या वापरावर बंदी घालून पुरणार नाही, आहारातील बदल प्रामुख्याने करायलाच हवेत.
विषय आजच्या एका लेखात संपणार नाही म्हणून समयोगासाठी ही प्रस्तावना. समयोग साधण्यासाठी काय कसे खावे-प्यावे, कसे पचवावे, त्यांचे फायदे व त्यापासून स्वास्थ्य कसे मिळवावे व राखावे हे पुढच्या लेखापासून विस्तृतपणे जाणून घेऊया.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

No comments:

Post a Comment

Visit Our Page