Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, November 26, 2015

आहारयोग

आहारयोग


लेख क्रमांक 7 (क्रमशः)

नमस्कार!
5. देश – म्हणजे सभोवताल वा परिसर व तेथील हवामान, तिथे पिकणारी धान्ये, फळे, भाज्या यांचा योग्य वापर. सध्या जग म्हणजे ग्लोबल व्हिलेज झाले आहे. इटलीतला पास्ता सिंगापूर मध्येही मिळतो आणि उत्तम चायनीज जेवण अमेरिकेतही मिळते. भारतापुरते बोलायचे तर वाळंवटासारखे रूक्ष प्रदेश ते आसाम-मेघालय वा केरळ सारखे सदाहरित, आर्द्र, दमट हवामानाचे प्रदेश वा पुणे-नाशिक सारखे साधारण प्रदेश. या प्रत्येक ठिकाणी हवामानाप्रमाणे धान्य व भाज्या, फळे पिकतात व तेच तिथल्या हवामानाला खाणे हे योग्य आहे. बघा बरं – दक्षिणेकडची इडली – दिल्लीत त्याच चवीची बनत नाही आणि पचतही नाही. तसेच गव्हाचे पदार्थ दक्षिणेकडे खाण्याचे प्रमाणही कमीच. पण हा भेद लक्षात न घेता सरसकट दाक्षिणात्यांचा आहार असलेले इडली-डोसे नाश्त्याचे पदार्थ झाले आणि उत्तरेकडचे गव्हाचे पदार्थ रोटी, फुलका हे दुपारच्या जेवणात सामावले गेले – ते केवळ सोयीमुळे – शरीर व आहारच्या योग्यायोग्यतेचा विचार करून नव्हे. पूर्वीपासून व्यापारामुळे वा आक्रमणांमुळे, स्थलांतरामुळे जागतिक अनेक पदार्थांची देवण-घेवाण झाली पण त्या-त्या परदेशी पदार्थांचा समावेश हळूहळू झाला. त्या त्या पदार्थांचा वापर हळूहळू वाढला, शरीराला त्या पदार्थांची ओळख करून दिली गेली, ते पचवायला – सवयीचे व्हायलाही वेळ दिला गेला. काल जाहिरात दिसली आणि आज लगेच तो पदार्थ पोटात असे नाही झाले. तो पदार्थ कसा आहे, त्यावर काय संस्कार केले तर तो आपल्याला पचेल, तो कधी खावा याविषयीचे आडाखे बांधले गेले असावेत व त्यानुसार तो आपल्या पद्धतीत कसा बसेल त्याप्रमाणे त्यांचा वापर केला गेला. उदा. – बटाटे. मूळचे भारतीय नसलेले बटाटे – आज कोणत्याही पदार्थ – उपवासाचा वा मेजवानीचा – बटाट्याशिवाय करणे म्हणजे जरा डोके खाजवावेच लागते . आज नैवेद्याच्या पानातही बटाटा नसेल तर समाधान होत नाही ना? नवनवीन पदार्थ खाण्याची हौस सगळ्यांनाच असते पण ते जरा तारतम्याने. ह्ल्ली घर हेही हॉटेलचे मेन्यू कार्डप्रमाणे आज पंजाबी, उद्या दाक्षिणात्य, परवा राजस्थानी, गेला बाजार विकेंडला चायनीज, मेक्सिकन, थायी, इटालियन... अबब.. पुरे.. कोणत्याही एका पदार्थाची शरीराला सवय व्हायला वेळ द्यावा लागतो, त्यात सर्व जगच पोटात लोटू पाहायचे असते आपल्याला. पंचतारांकित हौटेलातील बुफे प्रकरण म्हणजे साक्षात अन्नाचे विश्वरूपदर्शनच. पण त्यासाठी पोटालाही कृष्णाप्रमाणे गोवर्धन पेलण्याची ताकद असायला हवी, औषधरूपी गोपाळांनी काठ्या लावून तो उदरातला डोंगर व्यवस्थित पचणार नाही.
6. काल – अन्न सेवन करण्याचा योग्य काळ महत्त्वाचा. आधीचे अन्न पचल्यावरच पुढचा आहार घ्यायला हवा. आधीचे जेवण जर पचले नसेल तर जसे दह्यात कितीही दूध घाला ते नासतच जाते, त्याचप्रमाणे आधीचे अन्न न पचता त्यावर पुढील अन्न घातले गेले तर ते पचनशक्तिवर ताण निर्माण करते व त्यातून अनेक रोगांची निर्मिती होते. दिवसा 10 ते 12 या वेळात मुख्य दुपारचे जेवण घेणे अगदी योग्य. त्यातूनही ज्यांना जमत नाही त्यांनी निदान 2 पूर्वी तरी हा आहार घ्यायलाच हवा. तसेच रात्रिचे जेवण ही सूर्यास्तापूर्वी किंवा नंतर परंतु 9 च्या आत घ्यायला हवा. काळानुसारही अन्नात बदल करायला हवेतच. स्निग्ध, पचायला जड पदार्थ हिवाळ्यात नियमित खाणे योग्य होय तर पावसाळ्यात अग्नि वा पचनशक्ति मंद झालेली असताना स्निग्ध पण हलके, गरम अन्न-पान हे योग्य. दिवसातील वेगवेगळ्या वेळा, ऋतु या बरोबरच वयाच्या अवस्थांनुसारही खाण्यापिण्यात बदल करायला हवेत. वाढीच्या वयात पौष्टिक पदार्थ जसे योग्य तसेच वृद्धापकाळात पौष्टिक पण पचायला हलके, पथ्यकर पदार्थ खायला हवेत. स्त्रियांच्याही बाला-कुमारी-स्त्री-गर्भवती-माता-रजोनिवृत्ता या अवस्थांनुसारही खाण्याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जसे हे काल खाणारा व निसर्गातील काळ व शारीरिक अवस्थांतील काळ यांचा जसा विचार करायला हवा तसाच विचार अन्न-धान्य-फळे-भाच्या यांच्या नैसर्गिक उपलब्धिंच्या काळाचाही विचार करायला हवा. काही फळे, भाज्या,धान्ये ही विशिष्ट ऋतुनुसार मिळतात तर काही बारमाही मिळतात. आंब्याचे महत्त्व उन्हाळ्यात जितके तितके बारमाही मिळायला लागल्यावर राहिल काय? आता वर्षभर लोक आम्रखंड, आमरस, पन्हे या गोष्टी खाउ-पिऊ शकतात पण नैसर्गिकपणे मिळणारा रसरसलेला आंबा कुठे आणि कृत्रिम द्रव्ये घालून टिकवलेले बर्फात टिकवलेले वा बाटलीबंद वा कॅन्ड पदार्थ – हे फक्त चवीचेच चोचले. एरवी वापरताना त्यांचे प्रमाण नगण्यच व क्वचितच खावे. रोगाच्या अवस्थांनुसारही अन्नपानाचे नियम बदलतात तेव्हा त्याविषयी वैद्यांकडूनच सल्ला घ्यावा.
7. उपयोग संस्था – उपयोगसंस्था म्हणजे अन्नसेवनाचे नियम. जसे आधीचे अन्न पचल्यावरच पुढचा आहार घ्यावा तसेच तो कसा कुठे कोणत्या स्वरूपात सेवन करावा इ. ही लक्षात घ्यायला हवे. अन्न हे सुखाने खाता येईल इतपत गरम, स्निग्ध (तेलकट वा तळलेले नव्हे), योग्य प्रमाणात, विरुद्ध नसलेले हवे. तसेच मनस्थितीही शांत, प्रसन्न हवी. अन्न हे न हसता, न बोलता, अति घाईने वा रेंगाळत सेवन करू नये. अन्न ज्याठिकाणी सेवन करायचे आहे ते ठिकाणही योग्य हवे. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे दुर्लक्ष करत, उभ्याने, हसत, गप्पा मारत, डास-माशा हाकलत, वाहनांच्या वा वाद्यांच्या गोंगाटात अन्न खाणे हा सध्याच्या तरुणाईच्या दिनचर्येचा महत्त्वाचा भाग झाला आहे. घरीही शांतपणे कुटुंबियांबरोबर शांतपणे, मोजके पण प्रेमळ संवाद साधत जेवायची पद्धतही लोप पावत आहे. कानात बूचे घालून वा टीव्ही वरील नवरसांनी भरलेल्या मालिका वा कार्यक्रम बघत जेवणे म्हणजे नुसतेच पोट भरणे. नावडते पदार्थ मुलांच्या पोटात घालायची आईची आवडती जागा म्हणजे टीव्ही. त्याचा बघता बघता कधी अतिरेक होतो कळतच नाही.
8. उपभोक्ता – अन्न-पान घेणारी व्यक्ती म्हणजे उपभोक्ता – म्हणजे आपण स्वतः. वरील सर्व नियम पाळताना आपण स्वतः अन्न-पान कसे घ्यावे – स्वतःच्या तब्येतीनुसार, तक्रारींनुसार, शारीरीक-मानसिक अवस्थेनुसार, पचनशक्तिनुसार, आधीचे अन्न पचल्यावरच व भूक-तहान लागल्यावरच अन्न-पान सेवन करावे. स्वतःचे शरीर व मनःस्थिती योग्य असताना खाल्ले अन्न हेच सर्व फायदे मिळवून देते. हल्ली उठल्या-उठल्या काहीतरी तोंडात घातल्याशिवाय लोकांचा दिवस सुरू होत नाही. भूक असो वा नसो, आंघोळ झालेली असो वा नसो, पोट साफ झालेले असो वा नसो – तोंड धुतले की खाणे सुरू. कालांतराने सकाळी खाण्याऐवजी औषधांनीच दिवसाची सुरूवात करावी लागते तरी चुकीच्या सवयी सोडाव्यात, त्यात बदल करावेत हे लक्षातच येत नाही.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे। सहज हवन होते नाम घेता फुकाचे।।
जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म। उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म।।
खरोखर जसे यज्ञकर्म करताना योग्य वेळ, शांतता, पावित्र्य, योग्य सामग्री लागते तसेच अन्नसेवन करतानाही आवश्यक आहे. लहानपणापासून हा श्लोक आपण म्हणत, ऐकत असतो, पण तो उमजून त्याप्रमाणे वागणे हे जेव्हा जमेल तेव्हाच खरे.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

No comments:

Post a Comment

Visit Our Page