Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Thursday, November 26, 2015

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 6

नमस्कार!

आहाराचा समयोग साधण्यासाठी म्हणजेच योग्य आहार घेणे व तो पचवून त्याचे पूर्ण फायदे मिळणे यासाठी आयुर्वेदाने 8 गोष्टींचा विचार करायला सांगितले आहे. त्यांना म्हणतात आहारविधिविशेषायतन. थोडक्यात आहाराचा योग्य-अयोग्य विचार करताना तो खालील निकषांवर करावा.
1. प्रकृति
2. करण
3. संयोग
4. राशि
5. देश
6. काल
7. उपयोगसंस्था
8. उपभोक्ता
आयुर्वेद हे शास्त्र शरीर हे एखाद्या यंत्राप्रमाणे काळ-काम-वेग किंवा ऍव्हरेज किती देते मग त्या शरीराला कॅलरीज् किती घालाव्या अशा भाषेत बोलत नाही. मुळात कॅलरीज् ही संकल्पना ही पूर्णतः तर्कशुद्ध वा शास्रीय नाही पण त्याविषयी नंतर कधीतरी. आयुर्वेद हे शरीराला धर्म, अर्थ, काम व मोक्ष मिळविण्याचे साधन मानते. अशा या शरीराचे व मनाचे रोग होऊ नयेत म्हणून योग्य खाणे हे फार फार महत्त्वाचे आहे याविषयी तर आता दुमत नसावे. रोगाच्या चिकित्सेत असे म्हटले आहे की जर पथ्य नीट पाळले गेले तर औषधाची गरजच काय, आणि जर पथ्य पाळायचे नसेल तर औषधाचा उपयोग काय? यावरुनच योग्य खाणे मग ते स्वस्थ माणसाने असो वा रुग्णाने किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट आहे. विशेषतः हृद्रोगी वा प्रमेही लोकांचे उदाहरण घ्या बरं. पथ्य पाळलेच नाही आणि फक्त औषधावरच विसंबून राहिले तर चालेल का?
तर या वरील आठ गोष्टींचा थोडक्यात परिचय करून घेऊ.
1. प्रकृति – येथे प्रकृति हा शब्द आहाराशी संबंधित आहे. म्हणजेच पदार्थाचा स्वभाव, थंड/गरमपणा, पचायला जड वा हलकेपणा इ. व्यवहारात आपण नेहमीच बघतो व विचार करतो की सामान्य शाकाहारी जेवणापेक्षा मांसाहारी जेवण पचायला जड असते, गोड पदार्थ तिखट पदार्थांपेक्षा पचायला जड असतात, इ. एकेरी पदार्थांबाबत विचार करताना गहू हा तांदळापेक्षा पचायला जड असतो, मांस हे भाज्यांपेक्षा पचायला जड असते, दुधी, दोडका या भाज्या बटाटे, पनीर इ. पेक्षा पचायला हलक्या व त्रास न करणाऱ्या असतात इ. नेहमीच्या तांदुळापेक्षा साठेसाळी हा तांदूळ पचायला हलका व पथ्यकर असतो इ.
2. करण – करण म्हणजे पदार्थांच्या वर होणारे वेगवेगळे संस्कार. संस्कारांमुळे पदार्थाचे गुणधर्म वाढतात वा कमी होतात किंवा पूर्ण बदलतात ही. उदा. – तांदुळ हे पचायला हलके. त्यातही साळीच्या लाह्या या पचायला भातापेक्षाही हलक्या. पण चुरमुरे व पोहे, इडली-डोसे इ. तांदुळाचे पदार्थ, तांदुळाच्या पिठाची उकड, विविध भाज्या, धान्ये, मांस इ. घालून केलेले पुलाव वा बिर्याणी इ. सर्व पचायला जड असतात. तेव्हा पथ्याचे पदार्थ म्हणताना रुग्ण व रोगानुसार विचार करणे महत्त्वाचे. पथ्य म्हटल्यावर सरसकट इडली पचायला हलकी वा तांदुळाची उकड चालेल असे म्हणणे बरोबर नाही. किंवा दूध आवडत नाही तर दही खा वा ताक प्या वा पनीर खा हे म्हणणेही बरोबर नाही. विशेषतः दही हे सूज वाढवणारे आहे तर ताक हे सूज कमी करणारे आहे. दह्यातील हा बदल ते घुसळल्यामुळे व पाणी घातल्याने होतो. आधुनिक आहारशास्त्रानुसार यात पाण्याखेरीज काहीच घातले नाही इतपतच मर्यादित विचार आहे आणि म्हणूनच त्यांच्या मते दही वा ताक दोन्हीही सारखेच.
तसेच कच्चे अन्न खाण्यापेक्षा त्यावर अग्निसंस्कार झालेले अन्न पचायला तुलनेने हलके असते. चुलीवरचे अन्न, उकडलेले अन्न, विस्तवावर प्रत्यक्ष अग्निवर ठेवून शिजवलेले अन्न, मायक्रोव्हेवमध्ये शिजवलेले अन्न अशा अनेक प्रकारे शिजवलेल्या अन्नाचे गुण वेगवेगळे व परिणाम ही वेगवेगळे. तसेच भाजलेले, उकडलेले, तळलेले, कच्चे इ. प्रत्येक प्रकारात अन्नाचे गुण बदलतात. म्हणून केवळ दुधी हा हृद्रोग्यासाठी हितकर असे म्हणून ज्यात-त्यात व कशाहीप्रकारे शिजवलेला दुधी खाऊन चालणार नाही. पारंपारिक बिन मसाल्याची भाजी न करता दुधीचे कोफ्ते, पुऱ्या, पराठे, हलवा, पावभाजी इ. अनेक प्रकारे खालेल्ल्या दुधीचे परिणाम हवे तसे मिळणार नाहीत, फक्त मानसिक समाधान (खोटे) मिळेल.
3. संयोग – संयोग म्हणजे पदार्थांचे एकत्रिकरण. जसे कच्चे पोहे व दूध हा संयोग. पोहे हे दूध-साखरेबरोबर खाल्ले असता उत्तम बलदायक आहेत. तसेच पोह्याचे अजीर्ण झाले असता दूध प्यायल्यानेही पोहे पचायला व त्याचे अजीर्ण कमी व्हायला मदत होते. याउलट दूध व आबंट पदार्थ, फळे, तिखटमिठाच्या पदार्थासोबत खाणे हा विपरीत संयोग. याने दोष वाढून रोगनिर्मितीला वाव मिळतो. तसेच दही व चिकन, मासे व दूध, मध गरम करणे वा गरम पदार्थासोबत खाणे वा गरम पाण्यात घालून पिणे हे विकृतच.
4. राशि – म्हणजे प्रमाण. पदार्थाचे वा आहारचे प्रमाण हे व्यक्तिसापेक्ष बदलते. जेवणातील प्रत्येक घटकाचे प्रमाण व संपूर्ण जेवणाचे प्रमाण या दोन्हीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. सरसकट वयोमानानुसार किती खावे असे न सांगता भुकेप्रमाणे व पचनशक्तिप्रमाणे खावे हे उत्तम. तसेच आपल्या पांरपारिक जेवणात मुख्य धान्य गहू, तांदूळ, क्वचित ज्वारी हे असते व त्याला डाळींची, भाज्यांची जोड दिलेली असते. लोणचे-चटण्या या चव वाढविण्यासाठी, अन्न पचायला मदत करण्यासाठी असतात. पण म्हणून भाजी चिमूटभर व लोणचे वाटीभर असेतर आपण जेवत नाही व तसे जेवूही नये. चमचाभर ठेचा वा लोणच्याबरोबर पूर्ण जेवण संपवणारी माणसे आहेत, पण हे योग्य नाही.
(क्रमशः)
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 5

नमस्कार!
आधीच्या लेखांमध्ये आहाराच्या अयोग-अतियोग-मिथ्यायोगाबद्दल आपण थोडक्यात माहिती करून घेतली. आज आहाराच्या समयोगाविषयी माहिती घेऊ या.
मंडळी, आधीचे लेख वाचताना एक गोष्ट तर नक्कीच लक्षात आली असेल ना? ती अशी की – चुकीच्या आहार सेवनाने म्हणजेच आहाराच्या अयोग-अतियोग-मिथ्यायोग झाल्याने निर्माण झालेले आजार जर दूर करायचे असतील तर काय करायला हवे आणि काय नको हे समजून घेताना केवळ त्या चुका टाळणे एवढेच पुरेसे नाही तर योग्य पद्धत अवलंबणे हेही महत्त्वाचे आहे. खरेतर कोणत्याही चुकीच्या वा घातक गोष्टीने त्रास झाला तर ती गोष्ट पूर्णपणे बंद करणे गरजेचे असते हे आपण बघतो, जमेल तसे पाळतो पण त्या चुकीच्या गोष्टीचा प्रभाव कमी करण्यासाठी शरीराला हितकर अश्या चांगल्या गोष्टींचा वापरही करायला हवा हेही तितकेच खरे, हो ना? जसे हृद्रोग्याने आपल्याला रोग का झाला याचे कारण समजून घेऊन ते बंद करायला हवेच पण त्याचबरोबर शरीराला हितकर अशा चांगल्या सवयींचा अंतर्भाव नियमितपणे करायलाच हवा. जेवणात तेल-तूप पूर्ण बंद करणे, ओट्स्, जवस, इ. धान्यांचा वापर वाढवणे हा त्यावरचा पूर्ण उपाय नाही तर म्हणजेच आहाराच्या मिथ्यायोगाने झालेल्या हृद्रोगात, स्निग्ध पदार्थांचा अयोग (तेल-तूप पूर्णपणे बंद करणे) वा काही पदार्थांचा अतियोग (ओट्स्, नवनवीन तेले, जवस यांचा अमर्याद वापर करणे) हा त्यावरचा पूर्ण उपाय नसून संपूर्ण शरीराला आणि विशेषतः हृदयाला हितकर अश्या द्रव्यांचा, सवयींचा, पद्धतींचा वापर नियमित करणे व त्यापासून दुसरे कोणतेही आजार निर्माण न होता, आहे तोच आजार आटोक्यात ठेवता येणे वा बरा करता येणे म्हणजेच समयोग साधणे असे म्हणणे बरोबर ठरेल.
तर समयोग साधण्यासाठी या छोट्या छोट्या सवयी कोणत्या, कोणकोणते पदार्थ आपण उठल्यापासून निजेपर्यंत पोटात घालत असतो याचा सारासार विचार करायला हवा.
1. आपल्या रोजच्या छोट्या-छोट्या सवयींकडे डोळसपणे बघायला हवे ही पहिली पायरी.
2. चुकीच्या सवयी कोणत्या हे कळले की त्या बदलल्या पाहिजेत ही दुसरी पायरी.
3. बदलल्यानंतर कोणत्याही जाहिरातींना भुलून न जाता त्या चांगल्या सवयींवर ठाम राहाणे ही तिसरी पायरी. असे घडले तरच आपण आहाराचा व गंभीरपणे विचार करत आहोत असे म्हणता येईल.
आयुर्वेदानुसार स्वस्थ व्यक्तिची लक्षणे सागितली आहेत ती अशी –
समदोषः समाग्निश्च समधातुमलक्रियाः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनः स्वस्थ इत्यभिधीयते।।
सुश्रुतसंहिता सूत्रस्थान 15/10
म्हणजेच सोप्या भाषेत - शरीरातील सर्व घटक योग्य प्रमाणात असणे, भूक वेळच्यावेळी लागणे, त्यानंतर खाल्लेल्या अन्नाचे पचन योग्य होणे, शरीरातील सर्व लहान-मोठ्या क्रिया सुरळीत चालू असणे, आत्मा, मन व इंद्रिय हे प्रसन्न असणे ही ती लक्षणे होय.
WHO नेही Health ची व्याख्या सांगताना म्हटले आहे -
Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity.
“मला काहीही होत नाही, रोज मी दही खातो, शिकरण खातो, मी अजून तरी धडधाकट आहे” वा “रोज मी भेळ खाते” वा “रोज मी दोन पेग दारु पितो - काय धाड भरलीये मला?” अशी वाक्ये आपल्याला नेहमी ऐकू येतात. संवाद तेच फक्त चुकीच्या द्रव्यांची यादी न संपणारी. आता असे म्हणणे म्हणजे स्वतःबद्दल अति-आत्मविश्वास, चुकीच्या गोष्टीचे समर्थन आणि भविष्याकडे डोळेझाक असेच म्हणायला हवे.
किंवा - "पूर्वी मी फार तिखट खात होते, आताशा मात्र नाही चालत" म्हणजेच त्या पूर्वी खाल्लेल्या तिखटाचे दुष्परिणाम शरीर अजूनही भोगतंय आणि तिखट खाण्याची वा पचविण्याची शरीराची सहनशक्ती त्यामुळे कमी झालेली आहे. बघा बरं, लहानपणी खाल्लेली चिंचा,कैऱ्या,पेरू आता या मध्यम वा उतार वयात खायचा प्रयत्न केल्यास त्रास होतोच. ते पदार्थ वाईट नसतातच फक्त ते सध्या आपल्या शरीराला हितकर आहेत वा नाही याचा विचार प्रामुख्याने व्हायला हवा.
हितकर असे अन्न-पान योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने शिजवून, योग्य प्रकारे व नियमित सेवन करणे, ते पचविणे व एकूण देनंदिन व्यवहारही त्याला पूरक असा वा कमी त्रासदायक करणे म्हणजे समयोगाच्या दृष्टीने आपण योग्य पाऊल उचलले आहे असे म्हणायला हरकत नाही.
आहाराच्या समयोगाचे फायदे म्हणजे स्वास्थ्य मिळणे व ते दीर्घकाल टिकणे हे वेगळे सांगायला नकोच, नाही का? अर्थातच आहार बरोबर विहार व आचार हेही महत्त्वाचेच व सर्व एकमेकांवर अवलंबून असल्याने आहारानुसार विहार-आचार व विहार-आचारानुसार आहार हा बदलायलाच हवा. जसे रोज सात्त्विक पूजा करणाऱ्या वा साधना करणाऱ्या योग्याने तामसी आहाराच्या वाटेला जाऊच नये तसेच. विद्याभ्यास करणाऱ्यांनीही मीठ कमीत कमी खावे कारण त्याने इंद्रियांवर विशेषतः डोळ्यांवर वाईट परिणाम होतो परंतु आजच्या मुलांना चष्मा लागण्याचे प्रमाण वाढण्याचे मुख्य कारण - टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटर यांचबरोबर विविध कंपन्यांचे वेफर्स, बटर-चीझयुक्त पदार्थ, वेगवेगळे बाजारी सॉस, लोणची, फरसाण, बिस्किटे, पापड, रेडीमेड शीतपेये हेही आहेत. त्यामुळे फक्त गॅजेट्स्च्या वापरावर बंदी घालून पुरणार नाही, आहारातील बदल प्रामुख्याने करायलाच हवेत.
विषय आजच्या एका लेखात संपणार नाही म्हणून समयोगासाठी ही प्रस्तावना. समयोग साधण्यासाठी काय कसे खावे-प्यावे, कसे पचवावे, त्यांचे फायदे व त्यापासून स्वास्थ्य कसे मिळवावे व राखावे हे पुढच्या लेखापासून विस्तृतपणे जाणून घेऊया.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 4

नमस्कार!
आधीच्या लेखात आपण अयोग व अतियोग याविषयी माहिती घेतली. आजचा विषय – आहाराचा मिथ्यायोग.
खरंतर आज जे काही खाण्याच्या नावाखाली केले व खाल्ले जाते ते बहुतांशी सर्व मिथ्यायोग या प्रकारात मोडते असे म्हणायला हरकत नाही. आजच्या बहुतांशी रोगांचे मूळही या मिथ्यायोगात आहे.
मिथ्या म्हणजे अयोग्य, विकृत. जे खाऊ नये ते खाणे, जसे खाऊ नये तसे खाणे, जेव्हा खाऊ नये तो व्हा खाणे. अन्न म्हणून उपयोगी असणाऱ्या वा फायद्याच्या धान्य वा पदार्थांऐवजी जे अन्न नाही ते खाणे.
उदाहरणार्थ – आज-कालचे बहुतांशी बाजारी पदार्थ विशेषतः तयार अन्न वा प्रोसेस्ड फूड. मूळ घटक किती सत्त्ववान आहे या पेक्षा तो किती स्वस्त आहे, किती मुबलक उत्पन्न होतो, किती कमी खर्चात तो लोकांपर्यंत पोहोचवू शकतो यावर बहुतांशी कंपन्यांचे लक्ष असते व त्यातच त्यांचा सर्वाधिक स्वार्थ=फायदा दडलेला असतो.
उदा- ब्रेकफास्ट फूड म्हणून मक्याच्या रोस्टेड पोह्यांना (corn flakes) जगभर मान्यता मिळाली आहे. किंमत कमी(?), चवीसाठी अनेक स्वादांमध्ये उपलब्ध, शिवाय आबालवृद्धांसाठी उपयुक्त अशा जाहिराती पाहिल्यावर कोणाला भुरळ पडणार नाही? दूध घातले तर अधिक पौष्टिक अशी समजूत झाल्याने असल्याने मागणी वाढली नाही तरच नवल. विदेशी कंपन्यांबरोबरच देशी कंपन्याही त्यात मागे नाहीत. जणू काही विदेशी कोणतीही यशस्वी गोष्ट दिसली की ती भारतातही तयार झालीच पाहिजे यालाच प्रगती म्हणत असावेत – मग ती चुकीची गोष्ट वा वस्तू भारतीय ग्राहकांसाठीच का असेना.
वस्तुस्थिती अशी आहे की – पूर्वी मका हा गुरांचे अन्न म्हणून मिळत असे. अगदी गुरांनी खाण्यालायकच कडक दाणे, रवंथ करावा लागेल असे पीक. त्याचेच कोवळे कणीसच देशी वाण आपल्याकडे खात असत तोही सर्रास नव्हे.
सध्या मिळणाऱा गोड मका (sweet corn) हा GMO – Genetically Modified Organism या स्वरूपात मिळतो. कडक मक्यावर अमेरिकन शास्त्रज्ञांनी प्रयोग करून तो मऊ, गोड बनवला. जरा गूगल वर शोधलेत – तर बरीचशी माहिती मिळेल. GMO हा आजच्या लेखाचा विषय नाही म्हणून इथे सविस्तर आत्ता लिहित नाही, पुन्हा कधीतरी नक्की लिहिन.
हाच GMO मका आज सर्व पदार्थांमध्ये वापरला जातो. म्हणजे जे धान्य खाण्याच्या लायकीचे नाही ते कंपन्या कशा बेमालूमपणे आपल्याला खायला घालतात याचे हे उत्तम उदाहरण. शिवाय हे बनवताना – कितीतरी कृत्रिम वास व चवींचे घटक व प्रिझर्व्हेटिव्ज वापरली जातात त्याचेही दुष्परिणाम आहेतच.
हे झाले 1 उदारहण. मिथ्यायोगात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो यासाठी एक-दोन लेख अपुरेच पण थोडक्यात समजून घेण्यासाठी खालील गोष्टी उदाहरणादाखल पाहूया.
1. स्वतःची प्रकृती, राहाण्याचे ठिकाण, पचनशक्ति, वातावरण व ऋतु, शारीरिक बल, वय या नुसार आहाराचे नियम न पाळणे.
2. चांगले व वाईट पदार्थ एकत्र करून खाणे – उदा – शिळे व ताजे पदार्थ एकत्र करून खाणे.
3. पहिले अन्न न पचता दुसरे अन्न पोटात घालणे.
4. चांगलाच पदार्थ पण विकृत करून खाणे – उदा – दूध मुद्दाम नासवून त्याचे चीज, पनीर इत्यादि करून खाणे.
5. विरुद्धाहार – उदा – दूध व फळे दोन्ही गुणकारी आहेत पण स्वतंत्रपणे खाल्यासच. दुधाचे फायदे मिळण्यासाठी नुसते दूध प्यावे कोणतेही खारट,आंबट,तुरट,तिखट,कडू पदार्थ न घालता. गोड पदार्थही शक्यतो सल्ल्याशिवाय घालू नयेत. हल्लीच्या मुलांना नुसते दूध दिले तर पालकांनाही ते पूर्णान्न वाटत नाही, मुलांनाही दुसरी चव घातल्याशिवाय ते घशाखाली उतरत नाही. असो. तर फळे ही गुणकारीच पण दुधाच्या संयोगाने तो पदार्थ विकृत होतो आणि फायदे दोन्हीचेही मिळत नाहीत, फक्त चवीचे तात्पुरते समाधान.
6. अन्न पुन्हा-पुन्हा गरम करून खाणे, मुद्दाम शिळे खाणे.
7. आंबवलेले, नासलेले, तार आलेले, बुरशीयुक्त अन्न खाणे.
8. चुकीच्या पद्धतीने जेवणे – उदा – गोडाने सुरुवात करण्याऐवजी जेवल्यावर गोड खाणे
9. स्वतःसाठी योग्य नसलेले अन्न खाणे. एखाद्या व्यक्तिला त्याच्या तब्येतीसाठी वा तक्रारींसाठी काही विशिष्ट पदार्थ सुचवला जातो. उदा. जवस. पण याचा अर्थ जवस हे सर्व प्रकृतीच्या सर्वच लोकांना चालतील असे नाही. पण हा सारासार विचार न करता सर्रास जवसाचा आजकाल सगळे अनिर्बंध विना सल्ला वापर करताहेत. जवसाविषयी माहिती पुढील पैकी एका अंकात नक्की लिहिणार आहे.
10. चुकीच्या वातावरणात खाणे – जसे मोबाईल वा TV बघत, पुस्तक वाचत इ.
वरील गोष्टी वानगीदाखलच पण आज जास्त दिसून येतात. त्यात बदल कसा व का घडवायचा हे त्या त्या विषयी सविस्तर लिहिनच. आजसाठी इतके पुरे. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी अन्नाचा समयोग म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग


आहारयोग

लेख क्रमांक 3

आज आहाराच्या अतियोगाविषयी जाणून घेऊया.
अतियोग म्हणजे गरजेपेक्षा जास्त खाणे, जास्त वेळा सेवन करणे, भूक न लागताही खाणे, वेळेवर वा अवेळी पण पचायला अति जड, अति स्निग्ध, थंड, एकाच प्रकारचे वा रसाचे अन्न उदा फक्त गोडच वा तिखटच अन्न खाणे, जेवताना 2 घास कमी खावे असे असूनही केवळ जिभेला चांगले लागतेय म्हणून खाण्या-पिण्याचा अतिरेक करणे, तडस लागेपर्यंत जेवणे, जेवल्यावर सुस्ती, जडपणा जाणवणे म्हणजे अतियोग.
वजन जास्त असणारे वा मेद/चरबी जास्त असणार्या व्यक्तिंमध्ये अन्न प्रमाणतः जास्त असतेच असे नाही, मात्र पचायला जड, अयोग्य, अतितेलकट-तुपकट अन्नपदार्थ वेळी-अवेळी खाण्याने शरीर अतिबाळसेदार, फोपसे होते.
काही व्यक्ति सांगतात - की अगदी हवा ही सुद्धा अंगी लागते smile emoticon.. विनोद बाजूला ठेवला तर हवा ही अंगी लागते यासाठी पूर्वीचा चुकीचा आहार-विहार कारणीभूत आहे आणि त्याचे परिणाम आजही दिसताहेत असेच म्हणायला हवे.
आधीच्या लेखात वजन कमी करण्याचे अशास्त्रीय व चुकीचे पर्याय वापरले जातात असे लिहिलेय. त्याचप्रमाणे वजन वाढविण्यासाठीही फक्त केळी, वेगवेगळे flavoured शेक्स्, High protein, Soy, Malt इ.युक्त supplements, यांचा अयोग्य, अधिक व अनिर्बंध वापर याचेही दुष्परिणाम कालांतराने दिसतातच. केवळ खाणेच नव्हे तर Steroids सारख्या औषधांनीही वजन वाढणे, सूज येणे असे दुष्परिणाम दिसतात. जाहिरातींच्या मागे न लागता, आपल्या आयुर्वेदीय तज्न्य वा वैद्याला विचारून आपल्या पचनशक्ति व भुकेप्रमाणे खाणे हेच योग्य आहे.
बरे असे अति व अयोग्य खाण्याचे इतर दुष्परिणाम काय तर याने फक्त शरीरातील चरबीच जास्त वाढते, पण इतर सर्व शरीरघटकांचे योग्य पोषण न झाल्याने, दिसायला शरीर मोठे मात्र ताकद नाही असे होते, सूज येते, घाम येतो, कायम जडपणा, सुस्ती, निरुत्साह जाणवतो, केसांचे, त्वचेचे रोग होतातच शिवाय प्रमेह, मेदोरोग, हृदय, वृक्क/किडनीवर परिणाम, अंतःस्रावी ग्रंथीवर दुष्परिणाम, लघवीच्या तक्रारी, घामाच्या तक्रारी इ. अनेक तक्रारी निर्माण होतात. यावर आहार-विहार-जीवनशैली बदलणे हाच उपाय आहे हे कळत असूनही फक्त dieting वा पाणीच भरपूर पिणे, नुसती फळेच खाणे वा वेगवेगळे रस घेणे, वजन कमी करणाऱ्या गोळ्या घेणे, HRT, इन्सुलीन, थायराॅईड, इस्ट्रोजेन अशी hormonal treatment घेणे, केवळ ओटस्, सोया, काॅर्नफ्लेक्स असेच खाणे, कोणताही व्यायाम पण तोही प्रकृती,काल,वय,शरीराची गरज यांकडे दुर्लक्ष करून करणे अशा मार्गांनी कायमचा नव्हे तर तात्पुरता उपाय होतो, अपायही होतो. अशाने आलेले आजारपण लांबते. शिवाय आजारांचे स्वरूपही गंभीर असते.
जसे अन्नाबद्दलचे तसेच कोणतेही पेये अगदी पाणी सुद्धा पिण्याचा अतिरेक होऊन चालत नाही. पाणी न पिता इतरच पेये घेणे मग ती soft drinks असो वा hard drinks, चहा वा काॅफी इ पेये - त्यांच्या अतिरेकानेही त्रास होतात, शरीराचे योग्य पोषण होत नाही, प्रमेह, सूज येणे, यकृत्, किडनीवर ताण येऊन त्याची दुखणी निर्माण होणे असे विकार प्रामुख्याने होतात. विकतच्या पेयांतील कृत्रिम घटकांचे त्रास कैक पटींनी जास्त व दीर्घकालीन आहेत.
बघा बरं - जीभ व पोट हे स्वास्थ्य राखण्यासाठी आहेत, चोचले पुरविण्यासाठी नाहीत हे कळायला काही रोगच व्हावे लागतात, त्याशिवाय किंवा तरीही आपण मूळ कारणांचा विचार करत नाही यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? अज्ञानात सुख असते असे म्हणतात. तात्पुरते खरे असेलही ते पण दुर्लक्ष करण्यात मात्र सुख व कायमचे हित नक्की नाही.. हो किनई?
मागील लेखात लिहिल्याप्रमाणे आपल्या मौल्यवान शरीराशी, मनाशी संवाद साधलात का? साधला असेल तर उत्तमच. कालच हा संवाद साधायचा होता खरा, पण आजही, आत्ताही सुरुवात करू शकतोच की आपण.. तर सुरुवात करा, शरीराशी संवाद साधा- स्वतःच्या मनात डोकावून पाहा.. अगदीच नाही काही कळलं तर विचारा की आपल्या वैद्यांना.. अगदी समाधान होईपर्यंत विचारा पण मग मात्र खरोखरीच योग्य खाण्याचा मार्ग स्वीकाराच ही कळकळीची विनंती.

© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
skype ID - tanugokhale
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग

लेख क्रमांक 2 -
आज आहाराच्या अयोगाविषयी जाणून घेऊया.
अयोग म्हणजे कमी खाणे, गरजेपेक्षा कमी अन्न सेवन करणे, कमी वेळा सेवन करणे, भूक लागूनही न खाणे, वेळेवर वा अवेळी पण निकस, सत्त्वरहित, refined अन्न खाणे, अन्नातून जे गुण बल, ओज, स्थैर्य, पुष्टि, समाधान इ. मिळणे आवश्यक आहे ते न मिळणे म्हणजे अयोग.
हल्ली केवळ वजन कमी करणे वा सडपातळ दिसणे या कारणासाठी dieting चे फॅ़ड आलेले दिसते आहे. विविध औषधे- गोळ्या- वरून लावायचे लेप, spot reduction, यांबरोबरच अनेक 'diet' foods वा weight loss supplements, fat burners इ. नावांनी अगणित उत्पादनांच्या जाहिरातींचा मारा होताना दिसतोय. यातील योग्य-अयोग्य काय हे ठरविणे अवघ़ड होत चाललेले आहे कारण बरेचदा अनेक वैद्यकीय व्यावसायिकही अशा उत्पादनांचे वा सेवांचे promotion / endorsement - करताना दिसतात. ज्याअर्थी एक डाॅक्टरच सांगतो आहे त्या अर्थी ते बरोबरच असेल असे स्वत:चे समाधान करून घेतले जाते. जसे नट-नट्या फक्त पैश्यांसाठीच जाहिराती करतात- त्या वापरत नाहीत तसेच हेही आहे. कोणीही वैद्यकीय व्यावसायिक जर व्यक्तिला वा रुग्णाला न तपासता सरसकट एखाद्या उत्पादनाची जाहिरात करत असेल तर ते चूकच आहे. कायद्याने तर वैद्यकीय व्यावसायिकांना अश्या विशिष्ट उत्पादनांचे endorsement / promotion करण्यावर बंदीच आहे. म्हणजे कायद्याने चूक असलेल्या गोष्टींचाही आपण कसा स्वतःसाठी गैरवापर करतो? त्यातून जर कालांतराने त्या उत्पादनाने वा सेवेने कोणाला त्रास झाला, कोणत्या चाचणीत त्या गोष्टी अहितकारक आहेत असे दिसले तर मात्र आपण पुन्हा सरकारलाच दोषी ठरवून मोकळे होतो. जरी या वस्तू वा उत्पादने योग्य रीतिने तयार झाल्या तरी त्या सेवन करणे योग्य कसे? केवळ दोन मिनिटात भूक मिटवणारा पदार्थ हा वेळेअभावी सोयीस्कर असेलही पण म्हणून तो शरीरास हितकर आहे असे कसे म्हणू शकतो आपण? म्हणून कोणतेही बाजारी तयार अन्न मग ते packed food असो वा ready-mixes असो वा parcel असो - ते योग्य आहे का - पूर्ण जेवणाचा फायदा देणार आहे का की नुसतेच चमचमीत खाऊन पोटची खळगी भरून खोटे समाधान देणारे आहे याचाही विचार करा.
भूक नसतानाही वारंवार थोडे थोडे खात राहाणे - दर दोन तासांनी तोंड उष्टावणे यानेही शरीराची खाण्याची गरज भागत नाहीच तसेच व्यवस्थित जेवणाने मिळणारे समाधानही मिळत नाही. चटकन वजन कमी होण्यासारखे (दुः)परिणाम याचे असतीलही पण तिकडे कोण लक्ष देणार? सडपातळ दिसणे- दिसण्यावरून वाहवा मिळवणे यासाठी तर हा अट्टाहास.
बरे असे कमी व अयोग्य खाण्याचे इतर दुष्परिणाम काय तर याने अंगातील रक्त कमी होते, शरीराचे बल वा ताकद कमी होते, त्वचा रूक्ष होते, केस गळतात, लवकर पांढरे होऊ लागतात, सांधे झिजायला लागतात, कमी कष्टानेही दम लागतो, चिडचिड होते, सतत काहीतरी दुखत राहाते, झोप पुरत नाही वा लागतच नाही, मानसिक धैर्य ही कमी होते. त्यातून काही आजारपण आले तर त्यासाठी प्रतिकारशक्ती कमी झाल्याने आजारपण लांबते. शिवाय आजारांचे स्वरूपही गंभीर असते.
बघा बरं - केवळ बारीक दिसण्याच्या अट्टाहासासाठी वा केवळ जेवायला वा योग्य अन्न शिजवायला नाही म्हणून मिळेल ते तोंडात वेळी-अवेळी टाकल्याने आपण स्वतःलाच फसवत असतो.
वाहनात इंधन नाही वा चाकांत हवा भरली नाही वेळेवर तर आपण तिथे हयगय करत नाही - लगेच भरतो कारण ती गैरसोय टाळणे आपल्याला सुचते व आपण तसे जमवतोही. भले दोन पैसे जास्त जाऊदे पण वाहनाचे नुकसान नको म्हणून इंधनही उच्च प्रतीचे भरतो. मग देवाने दिलेल्या या सुंदर आजन्म बरोबर असणाऱ्या आपल्या शरीराकडे आपण का बरे दुर्लक्ष करतो - कारण ते बिचारे सहन करत राहते. काहीतरी बिनसतय हे सांगायचा ते प्रयत्नही करत राहते पण आपण मात्र चक्क दुर्लक्ष करतो किंवा मागील लेखात लिहिल्याप्रमाणे तात्पुरते उपाय करतो. अति झाल्यास मात्र दीर्घकालीन व महागड्या तपास्ण्या-उपाययोजना कराव्याच लागतात. त्यापेक्ष्या वेळीच तहान-भूक, मल-मूत्र प्रवृत्ति, झोप येणे इ. शरीराच्या रोजच्या छोट्या पण महत्त्वाच्या संवादाकडे नीट लक्ष द्या. बघा बरे तुमचे शरीर तुमच्याशी काय आणि कसा संवाद साधतेय - जरा कान देऊन - मन लावून - पुस्तके-फोन-टीव्ही-इंटरनेट बंद ठेवून एकदा ऐका तरी..
© वैद्य तनुजा गोखले,
पुणे.
tanugokhale@gmail.com
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735

आहारयोग

आहारयोग
लेख क्रमांक - 1
अन्न-पान हे प्रत्येक जीवाचे जगण्यासाठीचे साधन. मूलभूत गरज. पण मनुष्याच्या बाबतीत ही गरज चैनीचे रूप कधी घेते हेच कळत नाही. जसा आर्थिक स्तर उंचावतो तसा गरजेतून चैनीकडे प्रवास सुरू होतो. जगण्यासाठी खाणे हे वास्तव खाण्यासाठी जगणे यात बदलते आणि जोवर काही रोगनिदान वा त्रास होत नाही तोवर बिनबोभाट सुरू राहते. एकदा का काही बिनसू लागले, शारीरिक वा मानसिक तक्रारी जाणवू लागल्या की मग त्यांच्या तीव्रतेनुसार घरातील वडिलधाऱे, शेजार-पाजारी, सहकारी यांना विचारून वा दूरदर्शन, वृत्तपत्रातील जाहिराती वाचून नाहीतर सरळ कोपऱ्यावरच्या केमिस्टकडून मनानेच वा त्याच्या सल्ल्याने औषध(?) घेऊन उपाय केल्याचे तात्पुरते समाधान मिळवणे असे प्रथमोपचार केले जातात. काही बहाद्दर तर फेसबुकवरही आपल्या लक्षणांचा वा त्रासाचा जाहीर प्रचार-प्रसार करतात व तिथे सल्ले मिळवतात. ते योग्य असतातच असे नाही कारण प्रश्नकर्त्याच्या तक्रारी, सवयी, जीवनशैली याविषयी काहीही माहिती न घेता वा विचारता सर्वचजण ऐकीव वा स्वानुभवातून सल्ले देऊ लागतात. अगदी घरगुती उपायांपासून ते विविध पेन-कीलर्स, अँटीबायोटीक्स, अँटीहिस्टामिनिक्स्, व्हिटॅमिन्स्, स्टिराॅईडस् इ. च्या गोळ्या, सिरप, मलमे, इ प्रिस्क्रीप्शन, तसेच जिम लावा, चालायला जा, टेकडी चढा, पोहायला जा असेही सल्ले व्यक्ति-प्रकृति न बघता दिले जातात. यातून कधीतरी तात्पुरते बरे वाटते तर कधी त्रास वाढतो आणि मग मात्र वैद्यकीय सल्ला घेणे भाग पडते. केवळ तुमच्या लक्षणांवर व माहितीवर अवलंबून न राहता तपासण्यांचा सल्ला दिला जातो. त्यात काही त्रास दिसला तर त्यावरील विशेष औषधे दिली जातात. अन्यथा मानसिक कारणे आहेत असा निष्कर्ष काढला जातो. गरजेनुसार स्पेशालिस्ट वा मानसोपचारतज्न्याचा वा तात्पुरते औषध देऊन घरचा रस्ता दाखवला जातो. येथेच हे चक्र संपत नाही तर पुनःपुन्हा चालू राहाते. कालांतराने हृदयरोग, प्रमेह, संधिवात, दमा, त्वचारोग, कर्करोग, इ. भारदस्त रोग कायमचे ठाण मांडतात. त्यांचा पाहुणचार म्हणून तपासण्या व औषधे ही जन्मभरासाठी सोबत करतात. आपल्या नातेवाईकांना विशेषतः आई-वडिलांना होणारा त्रास आपल्याला व्हायला लागला की तो आनुवंशिकच आहे असे समजूत करून घेतली जाते पण तो आपल्यालाही होउ शकतो याची कल्पना असूनही त्यासाठी preventive काही केले मात्र जात नाही. अश्या गंभीर-दीर्घकालीन रोगांचे निदान झाल्यावर मात्र आहाराविषयी, जीवनशैली सुधारण्यासाठी जरा जागरूकता येते, त्या आजाराविषयी अनेक सल्ले दिले - घेतले जातात, विविध पुस्तके-साईट्स् वर माहिती मिळवून त्याचा उपयोग करायचे प्रमाण वाढते, जSरा आधी हे कळले असते तर असे हळहळून सुरुवातीला क़डक पथ्य पाळणे, लवकर उठून जिम, फिरायला जाणे यापासून ते सोयीस्कर पळवाटा काढणे असा प्रवास सुरू होतो तो अगदी शेवटपर्यंत.
आपण या वरील वर्णनात कुठे बसतो का याचा विचार करा बरं. होय असे उत्तर असेल तर आजच, आत्ताच सावध होण्याची गरज आहे आणि जाणीवपूर्वक आहारात-जीवनशैलीत बदल करण्याची गरज आहे. वरील वर्णन आपल्याला अजिबात लागू नसेल तर सध्यातरी अभिनंदन कारण हे कदाचित भविष्यातही घ़डू शकते, तेव्हा सावधान!
याच वरील विचारांनी आणि अनेक रुग्ण, लांबचे-जवळचे नातेवाईक यांच्या शंका व त्यांचे निरसन करण्यासाठी, आयुर्वेद हे शास्त्र म्हणून आजही कसे शाश्वत आहे हे सांगण्यासाठी या पानाद्वारे आपल्यापर्यंत पोचायचे ठरविले. पारंपारिक जीवनशैली, विशेषतः आहाराचे महत्त्व, ते बनविण्याच्या, खाण्याच्या पद्धतीतील योग्य-वाईट बदल यांविषयीचे लेखन इथे असणार आहे. आयुर्वेद म्हणजे केवळ हे खाऊ नका-ते खाऊ नका असे नकारार्थी सांगणारे शास्त्र नाही तर ते तुम्हाला कमी अपायकारक वा जास्तीतजास्त हितकर कसे होतील हे सांगणारे शास्त्र आहे यासाठीच हा खटाटोप. जीवनशैली महत्त्वाची आहेच, त्याबद्द्ल विषयानुरूप लिहिनच.
आहारयोग
आहार म्हणजे जे जे आपल्या अन्ननलिकेवाटे पोटात जाते तो आहार. योग म्हणजे जोडले जाणे. या आहाराशी आपण कसे जो़डले जातोय त्यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो.
योगाचे चार प्रकार - अयोग (पचनशक्तिपेक्षा कमी खाणे), अतियोग (पचनशक्तिपेक्षा जास्त खाणे), मिथ्यायोग (पचन विकृत करणारे वा चुकीचे खाणे) व समयोग (पचायला योग्य असे खाणे).
यातील स्वास्थ मिळ्ण्यासाठी व टिकण्यासाठी समयोग असणे हेच गरजेचे आहे व इतर योग टाळणे हेही महत्त्वाचे आहे. आपल्या प्रकृतिनुसार, वयानुसार, जीवनशैली, नोकरी / व्यवसायानुसार, जीवनांतील अवस्थांनुसार, राहाण्याचे ठिकाण व ऋतुनुसार योग्य असे अन्न-पान, योग्य वेळेला शिजवणे, योग्य वेळेला खाणे, आनंदाने खाणे इतकेच नाही तर ते नीट पचवून त्यापासून कोणताही त्रास न होता शरीरास बल, ऊर्जा मिळणे इतके साधले तरच त्या घेतलेल्या अन्न-पानाचा समयोग होय. हा समयोग जाणून घेऊया व निरोगी होण्याचा प्रयत्न करू या, निरोगी राहूया हाच 'आहारयोग' या पानाचा उद्देश.
© वैद्य तनुजा गोखले, पुणे.
tanugokhale@gmail.com
twitter handle - tanugokhale
संपर्क - 9765383735
नम्र विनंती - येथे दिली जाणारी माहिती ही आयुर्वेदानुसार योग्य आहाराविषयीची सर्वसामान्य माहिती आहे, ती प्रत्येक व्यक्तिस वा रुग्णास लागू पडेलच असे नाही. येथे वाचून आपल्या रोगावर उपाय करू नयेत वा इतरांना सुचवू नयेत. उपाय करण्यासाठी वैद्यकीय तज्न्यांचा विशेषतः आयुर्वेदीय उपचार करणाऱ्या वैद्यांचा सल्ला घ्यावा ही विनंती.

Saturday, November 21, 2015

औषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ, एक तौलनिक अभ्यास !

औषधी गर्भसंस्कार उत्पादने व प्रचलित मासानुमासिक पाठ,
एक तौलनिक अभ्यास !

(फक्त वैद्यकीय व्यावसायिकांसाठी)
तौलनिक अभ्यास !
‘कोण बरोबर’ ह्यापेक्षा ‘काय बरोबर’ हे लक्षात घेणे अधिक महत्वाचे
आयुर्वेदोक्त सर्व पाठ अत्यंत सखोल अभ्यासातून निष्कर्ष स्वरुपात ग्रंथात दिले आहेत. त्यांचा उपयोग चिकित्सेत करतांना झापडं लाऊन करणे नक्कीच चुकीचे ठरेल. शास्त्रशुद्ध संकल्पना, निर्माण पद्धती ह्यांची युक्तिपूर्वक अंमलबजावणी केल्यास चिकित्सेत अपयश मिळणे असंभव.
बाजारातून कोणतीही लहानशी वस्तू किंवा जिन्नस घेतांना आपण चौकसपणे उपलब्ध असलेल्या अन्य तत्सम वस्तूंचा दर्जा, किंमत इ. गोष्टी पडताळून पाहतो. मग गर्भावस्थेत जे पाठ आपण रुग्णांना देणार त्यांच्या दर्जाबद्दल आपल्याला खात्री असणे नक्कीच गरजेचे आहे. अक्षय निर्मित “औषधी गर्भसंस्कार” उत्पादने आणि प्रचलित उत्पादनांची माहिती व्हावी आणि नीरक्षीर न्यायाने आपण त्यांचा पडताळा करून मगच चिकित्सेत वापर करावा हा प्रांजळ हेतू ह्या अभ्यासामागे आहे.
सर्वप्रथम निर्माण पद्धतीबद्दल बघूया –
रसः कल्कः शृतः शीतः फाण्टश्चेति प्रकल्पना l पञ्चधैव कषायाणां पूर्वं पूर्वं बलाधिका ll . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/८
स्वरस, कल्क, शृत (क्वाथ), शीत, फान्ट अशा पाच कषाय कल्पना पूर्व पूर्व क्रमाने बलवान आहेत. म्हणजेच गुणांच्या दृष्टीने स्वरस सर्वात अधिक बलवान, त्यानंतर कल्क, नंतर शृत (काढा), पुढे शीत व शेवटचा फाण्ट हा गुणांच्या दृष्टीने सर्वात कमी प्रभावी असतो. मासानुमासिक कल्पांमध्ये वर्णन केलेल्या बहुतांशी वनस्पती ओल्या मिळणे जवळजवळ अशक्य आहे. त्यामुळे शास्त्रवचनानुसार अक्षयनिर्मित मासानुमासिक कल्पांमध्ये 'कल्क संकल्पना' वापरून पाठ निर्मिती केली आहे. प्रचलित मासानुमासिक उत्पादनांमध्ये क्वाथाचाच नव्हे तर घन क्वाथाचा वापर केलेला दिसतो. म्हणून अक्षयनिर्मित मासानुमासिक कल्प प्रचलित उत्पादनांच्या तुलनेत अधिक प्रभावी सिद्ध होतात.
विशिष्ट पाठ ज्या ग्रंथातून घेतले आहेत त्याच ग्रंथातील सूत्रांचा वापर औषध निर्मितीच्या वेळी करणे अनिवार्य ठरते. अष्टांगहृदयातील मासानुमासिक पाठांमध्ये, फक्त वनस्पतींचा नामोल्लेख आहे. ह्याच ग्रंथातील पुढील सूत्रानुसार सदर पाठांचा वापर कल्कस्वरुपात करण्याचा शास्त्रादेश आहे.
कल्पयेत्सदृशान् भागान् प्रमाणं यत्र नोदितम् ।
कल्कीकुर्याच्च भैषज्यमनिरूपितकल्पनम् ।। . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/२४
पाठात घटकांचे प्रमाण उल्लेखित नसल्यास त्यांचा वापर समप्रमाणात करावा, ज्याठिकाणी वनस्पती कोणत्या स्वरुपात वापराव्यात असा स्पष्ट उल्लेख नसेल त्याठिकाणी कल्क स्वरुपात वापरणेच श्रेष्ठ समजावे.
‘कल्क’ निर्माण प्रक्रिया
कल्कः पिष्टो द्रवाप्लुतः . . . . अष्टांगहृदय कल्पस्थान ६/९
द्रव्यमात्रं शिलापिष्टं शुष्कं वा जलमिश्रितम्। . . . . शारंगधर २/५/३५
वनस्पती दगडावर वाटून कल्क करावा व शुष्क असल्यास चूर्णाबरोबर पाणी वापरून मर्दन करावे म्हणजे कल्क तयार होतो.
मर्दनात अप्रत्यक्ष उष्णता (उर्जा) अपेक्षित आहे. ह्या निर्माण पद्धतीत वनस्पतींमधील सुगंधी व उडनशील कार्यकारी घटकांचे रक्षण होते, औषधाची कार्मुकता वाढते, औषध टिकाऊ बनते व पचन यंत्रणेच्या सूक्ष्म स्रोतसांमध्ये सहज शोषले जाते.
“औषधी गर्भसंस्कार” पाठांची रचना करतांना ह्या सूत्रांनुसार वनस्पतींच्या चूर्णाला पाण्याऐवजी त्या पाठातील मुख्य कार्यकारी वनस्पतीच्या स्वरस किंवा क्वाथाची भावना दिली जाते. गुणवर्धन होण्यासाठी ही प्रक्रिया अधिक उपयुक्त ठरते. ह्याउलट प्रचलित पाठनिर्माण करतांना वनस्पतींच्या घनांचा (रसक्रिया) उपयोग केलेला दिसतो. क्वाथामध्ये उष्णता दिली जाते व गाळून त्यांना पुन्हा प्रखर उष्णता दिली जाते.
क्वाथादीनां पुनः पाकाद्‌ घनत्वं या रसक्रिया ।
- - - - - - - - - - - - -
आता औषध सेवन मात्रेविषयी बघूया -
पेष्यस्य कर्षमालोड्यं तद् द्रवस्य पलत्रये । . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/१३
कल्काची मध्यम मात्रा १ तोळा म्हणजे म्हणजे दिवसाला सुमारे १० ग्रॅम एवढी सांगितली आहे.
“औषधी गर्भसंस्कार” उत्पादनांमध्ये प्रत्येक गोळीत वनस्पती औषधाचे प्रमाण ५०० मिलिग्रॅम आहे. २ - २ गोळ्या रोज २ वेळा घेण्यामुळे दिवसाची एकूण मात्रा २ ग्रॅम होते. पाठातील कार्यकारी द्रव्याची भावना देऊन मर्दन केल्यामुळे गुणात दुप्पट वाढ होते असे तज्ञांनी सांगितले. म्हणजेच ही मात्रा ४ ग्रॅम धरणे समर्पक होईल. गर्भावस्थेत स्त्रीची संवेदनशील अवस्था समजून मध्यम मात्रेऐवजी लघु मात्रा देणे अधिक योग्य, म्हणजेच १ तोळा ऐवजी अर्धा तोळा पुरेशी आहे.
क्वाथाची मध्यम मात्रा ४ तोळे म्हणजे दिवसाला सुमारे ४० ग्रॅम एवढी सांगितली आहे.
क्वाथं द्रव्यपले कुर्यात्प्रस्थार्धं पादशेषितम् । . . . . अष्टांगहृदय, कल्पस्थान ६/१३
क्वाथासाठी वनस्पती द्रव्याची मात्रा १ पल म्हणजे ४ तोळे घेण्याचा संदर्भ आहे. प्रचलित उत्पादनांमध्ये ग्रंथोक्त मात्रेचा विचार केल्यास ह्या उत्पादनांच्या २५० मिलिग्रॅमच्या किमान १६० गोळ्या दिल्यास मात्रा पुरेशी होईल. गर्भावस्था नाजुक व संवेदनशील असल्याने निम्म्या मात्रेत औषध द्यावे असा विचार केला तरीही ८० गोळ्या द्याव्या लागतील.
- - - - - - - - - - - - -
प्रत्यक्षात -
“औषधी गर्भसंस्कार” उत्पादनांच्या गोळीचे वजन ६०० मिलिग्रॅम
घटक द्रव्यांचे वजन ५५० मिलिग्रॅम (भावना व मर्दन संस्कार करून)
एक्सीपियंट्स चे प्रमाण जेमतेम ५० ते ६० मिलिग्रॅम
प्रचलित उत्पादनांमध्ये –
गोळीचे वजन ५५० मिलिग्रॅम ; घटक द्रव्यांचे वजन २४० ते २५० मिलिग्रॅम
घन स्वरुपात द्रव्य प्रमाण सुमारे २४ ते ४८ मिलिग्रॅम
एक्सीपियंट्स चे प्रमाण ५२६ ते ५०२ मिलिग्रॅम एवढ्या बेसुमार मात्रेत
ज्या मात्रेत औषधी द्रव्य देण्याची आवश्यकता आहे, त्या मात्रेत एक्सीपियंट्स वापरल्याचे आढळते.
काही प्रचलित मासानुमासिक कल्पांमध्ये वनस्पतींचे घन समप्रमाणात वापरलेले दिसतात. वास्तविक प्रत्येक वनस्पतीचे घन रूपांतरित गुणोत्तर (Yield) भिन्न असते. त्यामुळे ग्रंथोक्त पाठाप्रमाणेच घन समप्रमाणात वापरले तर मूळ वनस्पतींचे प्रमाण विभिन्न होते. शास्त्रोक्त सूत्रांचे उल्लंघन झाल्याने अशा पाठांच्या कार्मुकतेबद्दल संभ्रम निर्माण होतो.
अष्टांगहृदयात १० भिन्न पाठ गर्भावस्थेच्या १० महिन्यांसाठी दिलेले आहेत. गर्भावस्था दहा महिन्यांची कशी हे शास्त्राधारे समजून मगच अक्षयने औषधी गर्भसंस्कार पाठांची योजना केली आहे. ह्या १० महिन्यांच्या पाठांमध्ये एकूण ३१ वनस्पतींचा अंतर्भाव आहे. त्यापैकी ८ वनस्पतींचा वापर अनेक वेळा (दोन, तीन व पाच वेळा) केलेला आहे.
- - - - - - - - - - - - -
वनस्पतींची अचूक ओळख व प्रतिनिधि द्रव्ये
मूळ ग्रंथाच्या भाषांतरित आवृत्तीमध्ये काही दोष किंवा विसंगती असू शकते. त्यामुळे चुकीच्या वनस्पतीचा अंतर्भाव पाठात केला जाऊ शकतो. अशावेळी संस्कृत श्लोकांचा सखोल अभ्यास करून मगच द्रव्य निश्चिती केली पाहिजे. केवळ भाषांतर पाहून औषधनिर्मिती केली तर पाठ चुकीचे होतील आणि अपेक्षित लाभ प्राप्त होणार नाहीत. त्याचप्रमाणे पाठातील काही विशिष्ट घटक संदिग्ध किंवा अनुपलब्ध असल्यास त्यांच्या ऐवजी प्रतिनिधि द्रव्यांची योजना शास्त्रकारांनी केली आहे.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
प्रत्येक महिन्याच्या पाठांचा तौलनिक अभ्यास
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
पहिला महिना -
मधुकंशाकबीजंच पयस्या सुरदारुच । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५४
मधुक, शाकबीज, पयस्या, सुरदारु . . . हा आहे पहिल्या महिन्याचा पाठ.
पयस्या म्हणजे क्षीरकाकोली. अष्टवर्गातील ह्या वनस्पतीचा समावेश एकूण ४ पाठांमध्ये आहे.
राज्ञामप्यष्टवर्गस्तु यत्तोSयमतिदुर्लभः ।
तस्मादस्य प्रतिनिधिं गृह्णीयात्तद् गुणं भिषक् ।।
. . . . भावप्रकाश निघंटु, हरितक्यादि १४३
अष्टवर्गातील वनस्पती अत्यंत दुर्मिळ व राजालाही दुर्लभ आहेत. म्हणून वैद्यांनी त्यांच्या प्रतिनिधि द्रव्यांचा वापर करावा.
सगर्भावस्थेचा विचार करता शतावरी हे सर्वोत्तम प्रतिनिधि द्रव्य ठरते म्हणून औषधी गर्भसंस्कार पाठांमध्ये सर्वत्र पयस्या ऐवजी शतावरीचा वापर केला आहे.
अक्षय निर्मित “प्रथमाह” पाठ
मधुक, शाकबीज, शतावरी, सुरदारु - प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
यष्टिमधु, साग बीज, क्षीरकाकोली, देवदार प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
९ महिन्याच्या दोन प्रचलित पाठांमध्ये क्षीरकाकोलीचा तर नवव्या महिन्याच्या पाठात विदारीकंदाचा वापर केला आहे. पहिल्या व तिसऱ्या पाठात वापरण्यासाठी जर क्षीरकाकोली उपलब्ध होते तर नवव्या महिन्याच्या पाठात विदारीकंद का वापरला ?
- - - - - - - - - - - - -
दुसरा महिना
अश्मन्तकः कृष्णतिलास्ताम्रवल्ली शतावरी । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५४
अश्मंतक, कृष्ण तिळ, मंजिष्ठा, शतावरी . . . हा आहे दुसऱ्या महिन्याचा पाठ
अक्षय निर्मित “द्वितिमाह” पाठ -
अश्मंतक, कृष्ण तिळ, मंजिष्ठा, शतावरी प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: अश्मंतक १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
अश्मंतक, कृष्ण तिळ, मंजिष्ठा, शतावरी प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
सर्व वनस्पती योग्य असल्याचे दिसते. मात्र द्रव्यांचे प्रमाण व निर्माण पद्धती शास्त्राधारे चुकीची ठरते.
- - - - - - - - - - - - -
तिसरा महिना
वृक्षादनीपयस्या च लता चोत्पलसारिवा । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५५
वृक्षादनी, पयस्या, लता, उत्पलसारिवा . . . हा आहे तिसऱ्या महिन्याचा पाठ.
वृक्षादनी ही संदिग्ध व अपरिचित वनस्पती आहे.
प्रियङ्गुः फलिनी कान्ता लता च महिलाह्वया | - भावप्रकाश निघन्टु, कर्पुरादि १०१
लता म्हणजे प्रियंगु.
उत्पलसारिवा म्हणजे श्वेतसारिवा
अक्षय निर्मित “तृतिमाह” पाठ -
शतावरी, प्रियंगु, श्वेत सारिवा प्रत्येकी १६५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १६५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
क्षीरकाकोली, श्वेत सारिवा, कृष्ण सारिवा प्रत्येकी ८० मिलिग्रॅमचा घन
मूळ श्लोक न पाहता अष्टांगहृदय मराठी भाषांतरानुसार हा पाठ केलेला दिसतो. क्षीरकाकोली ह्या संदिग्ध व दुष्प्राप्य वनस्पतीचा वापर केला आहे.
- - - - - - - - - - - - -
चौथा महिना
अनन्ता शारिवा रास्ना पद्मा च मधुयष्टिका । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५५
अनंतमूळ, सारिवा, रास्ना, पद्मा, मधुयष्टि . . . हा आहे चौथ्या महिन्याचा पाठ
अक्षय निर्मित “चतुर्माह” पाठ -
अनंतमूळ, कृष्ण सारिवा, रास्ना ऐवजी कुलिंजन, पद्मा, यष्टिमधु प्रत्येकी १०० मिलिग्रॅम; भावना द्रव्य: अनंतमूळ १०० मिलिग्रॅम
रास्ना ऐवजी कुलिंजन वापरण्याचा उद्देश -
अष्टांगहृदयकारांना अभिप्रेत असलेली रास्ना, प्रचलित रास्नांपेक्षा भिन्न असावी असे वाटते. भावप्रकाश निघन्टु मध्ये एकूण ५ भिन्न वनस्पतींना रास्ना नावाने संबोधले आहे. त्यातील प्रामुख्याने वापरली जाणारी Pluchea lanceolata सोनामुखीप्रमाणे भेदन तर Inula racemosa गर्भाशय संकोचक आहे. सदर गुणधर्मांनुसार गर्भावस्थेत ह्यांचा वापर करणे अयोग्य ठरते. कार्मुकतेचा अभ्यास करून प्रतिनिधि द्रव्य कुलिंजनचा वापर केला आहे.
प्रचलित पाठ -
धमासा, रास्ना, सारिवा, मंजिष्ठा, जेष्टमध प्रत्येकी ५० मिलिग्रॅमचा घन
रास्ना बद्दल विवेचन आपण आत्ताच पाहिले. मूळ श्लोकात धमाशाचा उल्लेखही नाही. भावप्रकाश निघन्टु मध्ये धमासा हा अनंतमूळाचा पर्याय सांगितला आहे. मराठी भाषांतरातही धमासा म्हटले आहे. जेस्टेशनल डायबिटिसचा धोका सगर्भावस्थेच्या चौथ्या महिन्यात सर्वाधिक असतो. धमाशात केन शुगर २६.४%, इनव्हर्ट शुगर्स ११.६%, मेलिझिटोझ ४७.१% अशा ३ प्रकारच्या शर्करा असतात, म्हणून अशावेळी धमासा वापरणे चुकीचे वाटते. एकंदरितच प्रचलित पाठात ५ वनस्पतींपैकी ३ वनस्पती चुकीच्या असल्याचे दिसते.
- - - - - - - - - - - - -
पाचवा महिना
बृहतीद्वयकाश्मर्यक्षीरिशुङ्गत्वचा घृतं । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५६
रिंगणी, डोरली, काश्मरी, वडसाल, वटांकुर . . . हा आहे पाचव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “पंचमाह” पाठ -
रिंगणी, डोरली, काश्मरी, वटांकुर, वडसाल प्रत्येकी १०० मिलिग्रॅम; भावना द्रव्य: वडसाल १०० मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
रिंगणी, डोरली, वडसाल, वटांकुर प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
ह्यात काश्मरीचा वापरच नाही. वास्तविक 'गर्भशोष' अवस्थेत काश्मरी उपयुक्त असल्याचे वर्णन भावप्रकाश निघन्टुमध्ये आहे. त्यामुळे हा पाठही अपूर्ण असल्याचे दिसते.
- - - - - - - - - - - - -
सहावा महिना
पृश्निपर्णी बला शिग्रुः श्वदंष्ट्रा मधुपर्णिका । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५६
पिठवण, बला, शेवगा, गोखरू, मधुपर्णिका . . . हा आहे सहाव्या महिन्याचा पाठ.
गम्भारी भद्रपर्णी च श्रीपर्णी मधुपर्णिका I भावप्रकाश निघन्टु, गुडुच्यादि १४
मधुपर्णिका म्हणजेच गम्भारी.
अक्षय निर्मित “षष्ठमाह” पाठ -
पिठवण, बला, शेवगा, गोखरू, गम्भारी प्रत्येकी १०० मिलिग्रॅम; भावना द्रव्य: बला १०० मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
पिठवण, चिकणा, शेवगा, गोक्षुर प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
ह्यात गम्भारीचा समावेशच नाही. 'गर्भशोष' अवस्थेत उपयुक्त असल्यामुळे हिचा अंतर्भाव अनिवार्य वाटतो.
- - - - - - - - - - - - -
सातवा महिना
शृङ्गाटकं बिसं द्राक्षा कसेरु मधुकं सिता । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५७
शृंगाटक, कमळ, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, खडीसाखर . . . हा आहे सातव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “सप्तमाह” पाठ -
शृंगाटक, कमळ, द्राक्ष, कसेरु, यष्टिमधु, खडीसाखर प्रत्येकी ८५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: यष्टिमधु ८५ मिलिग्रॅम
कसेरुमध्ये नैसर्गिक प्रोजेस्टेरॉन असल्याचे सिध्द झाले आहे. गर्भावस्थेत सर्वात अधिक प्रोजेस्टेरॉनची आवश्यकता सातव्या महिन्यात असते व ही गरज कसेरुच्या सहाय्याने भरून निघते.
प्रचलित पाठ
शिंगाडा, कमल, द्राक्ष, कचोरा, जेष्टमध, खडीसाखर प्रत्येकी ४० मिलिग्रॅमचा घन
अष्टांगहृदय मराठी भाषांतरात 'कसेरु' ऐवजी 'केसरु' असा मुद्रण दोष दिसतो. त्यानुसार भाषांतरही 'केशर' असे केलेले आहे. मात्र हिंदी आवृत्तीमध्ये श्लोकात व भाषांतरातही कसेरुच म्हटले आहे.
प्रचलित पाठात इतर ५ द्रव्ये जरी मूळ ग्रंथानुसार असली तरी कसेरु ऐवजी कचोरा वापरला आहे. 'कसेरु' आणि 'कचोरा' ह्यात फक्त उच्चार साधर्म्य आहे. गर्भावस्थेच्या दृष्टीने कोणताही उपयुक्त गुण कचोरामध्ये नाही.
- - - - - - - - - - - - -
आठवा महिना
कपित्थबिल्वबृहतीपटोलेक्षुनिदिग्धिकात् । . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५८
कपित्थ, बिल्व, बृहती, पटोल, इक्षु, निदिग्धिका . . . हा आहे आठव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “अष्टमाह” पाठ -
कपित्थमूळ, बिल्वमूळ, बृहती, पटोल, इक्षु मूळ, निदिग्धिका प्रत्येकी ८५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: निदिग्धिका ८५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
कवठमूळ, बेलमूळ, रिंगणी, पटोलपत्र, इक्षुमूळ, डोरली प्रत्येकी ४० मिलिग्रॅमचा घन
सर्व वनस्पती योग्य असल्याचे दिसते. मात्र द्रव्यांचे प्रमाण व निर्माण पद्धती अशास्त्रीय आहे.
- - - - - - - - - - - - -
नववा महिना
नवमे शारिवानन्तापयस्यामधुयष्टिभिः l . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/५९
सारिवा, अनंता, क्षीरकाकोली, मधुयष्टि . . . हा आहे नवव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “नवमाह” पाठ -
सारिवा, अनंता, शतावरी, यष्टिमधु प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
अनंतमूळ, धमासा, विदारीकंद, जेष्टमध प्रत्येकी ६० मिलिग्रॅमचा घन
अष्टांगहृदय हिंदी भाषांतरात दोन (श्वेत व कृष्ण) सारिवा आहेत. मराठी भाषांतरात सारिवा आणि धमासा आहे. धमासा योग्य वाटत नाही. पयस्या म्हणजे क्षीरकाकोली. अन्य पाठात वापरण्यासाठी जर ही उपलब्ध झाली तर ह्या पाठात विदारीकंद का वापरला? विदारीकंद घन स्वरुपात वापरल्याचे म्हटले आहे. ग्रंथोक्त पद्धतीने घन करण्याचा प्रयत्न केला तर विदरीकंदाची खळ बनते, घन होतच नाही.
- - - - - - - - - - - - -
दहावा महिना
योजयेद्दशमे मासि सिद्धं क्षीरं पयस्यया l अथवा यष्टिमधुकनागरामरदारुभिः ll . . . . अष्टांगहृदय, शारीरस्थान २/६०
क्षीरकाकोली, यष्टिमधु, सुंठ, देवदारु . . . हा आहे दहाव्या महिन्याचा पाठ.
अक्षय निर्मित “दशमाह” पाठ -
शतावरी, यष्टिमधु, सुंठ, देवदार प्रत्येकी १२५ मिलिग्रॅम; भावना द्रव्य: शतावरी १२५ मिलिग्रॅम
प्रचलित पाठ -
दहाव्या महिन्यासाठी पाठ निर्मितीच नाही म्हणजेच अपूर्ण चिकित्सा.
स्त्री शारीरक्रियेचा विचार न करता सगर्भावस्था कालावधीची सांगड इतर कालमापन पद्धतीशी घालून केलेली ९ महिन्यांच्या पाठांची निर्मिती संपूर्णतः अशास्त्रीय वाटते.
- - - - - - - - - - - - -
एकं शास्त्रं अधीयानो न विद्यात शास्त्र निश्चयः।
तस्मात् बहुश्रुतम शास्त्रम विजानीयात चिकित्सकः।। . . . . सुश्रुत संहिता, सूत्रस्थान ४/७
एका शास्त्राने शास्त्र निश्चय होत नाही म्हणून वैद्याने अनेक शास्त्रांचा अभ्यास करुन मग चिकित्सा करावी.
ह्या उक्तीनुसार विशेषतः आयुर्वेद अभ्यासकांनी सिद्धांत, निदान-चिकित्सा, द्रव्यगुण विज्ञान, मान परिभाषा, भैषज्य कल्पना, अर्थकारण अशा सर्वच दृष्टिकोनातून सदर माहितीचा उपयोग करून ‘नीर क्षीर’ विवेक बुद्धीने सुयोग्य अशा औषधी कल्पांचा वापर व्यवसायात करावा.

+917208777773

Sunday, November 15, 2015

अबीज रजःप्रवृत्ती (Anovulatory cycle) व संशोधनात्मक उपचार

अबीज रजःप्रवृत्ती (Anovulatory cycle) व संशोधनात्मक उपचार

स्त्री हि मूलमपत्यानां स्त्री हि रक्षति रक्षिता।
सर्वाश्रमाणां प्रथमं गृहस्थत्वमनिन्दितम्॥ . . . . अष्टांगसंग्रह २/४०
स्त्री ही अपत्य प्राप्तीचे मूळ असले तरी आजच्या काळात बऱ्याच स्त्रिया अपत्य सुखापासून वंचित राहतात असे निदर्शनास येते. वर्षभर सातत्याने प्रयत्न करूनही मूल न होण्याला ‘वंध्यत्व’ म्हणतात. आयुर्वेदातील विविध संहिता ग्रंथांतून वंध्यत्व विषयावर विस्तृत वर्णन केलेले आहे.
ध्रुवं चतुर्णां सान्निध्याद्गर्भः स्याद्विधिपूर्वकम् |
ऋतुक्षेत्राम्बुबीजानां सामग्र्यादङ्कुरो यथा || . . . . सुश्रुत शारीर ३/२३
शास्त्राप्रमाणे गर्भधारणेसाठी चार गोष्टींची आवशकता असते.
गर्भोत्पत्तिसाठी योग्य कालावधि रजस्त्रावानंतरचा १२ ते १६ दिवसांचा असतो. गर्भाची उत्पत्ती व वाढ जेथे होणार ते गर्भाशय दोषरहित व सर्वगुणसंपन्न असे स्त्रीबीज व पुरुषबीज ह्या सर्वांच्या पोषणासाठी प्रसादरूप असा उपधातु ‘रज’ आहे.
ह्या चारही गोष्टी प्राकृत व दोषरहित असतील तर निसर्गाच्या नियमानुसार गर्भोत्पत्ती होते. पुरुषबीज विकृत असले व स्त्रीबीज प्राकृत असले तरीही गर्भोत्पत्ती होत नाही त्याचप्रमाणे पुरुषबीज प्राकृत असले व स्त्रीबीज विकृत असले तरीही गर्भोत्पत्ती होत नाही. अर्थात दोन्ही बीज सुदृढ असणे आवश्यक आहे.
ज्याप्रमाणे उत्तम असलेले बीज पेरले तर फळही उत्तम येते. त्याचप्रमाणे बीज (स्त्रीबीज, पुरुषबीज) उत्तम प्रतीचे असेल तर गर्भ हा चांगलाच निपजतो. वंध्यत्वाच्या अनेक कारणांपैकी एक म्हणजे स्त्रीबीजाचा अभाव किंवा स्त्रीबीजाचा उत्सर्गच न होणे, म्हणजेच (Anovulation) अबीजोत्सर्ग जो ५० ते ७३% अनपत्यतेला कारणीभूत आहे.
स्त्रीच्या आरोग्याचा विचार करतांना काही गोष्टी प्रकर्षाने जाणवतात. स्त्रीही अनेक ठिकाणी आपला ठसा उमटवत आहे. शिक्षण, नोकरी, राजकारण, समाजकारण, खेळ अशा कोणत्याही बाबतीत पुरुषांच्या तुलनेत स्त्री मागे नाही. ह्याशिवाय प्रजननाच्या दृष्टीने स्त्रीवर जबाबदाऱ्यांचे ओझेही वाढत चालले आहे. त्याचा परिणाम स्त्रीच्या शरीरस्वास्थ्य व मनस्वास्थ्यावर होतो. कार्यबाहुल्य, महत्वकांक्षा, जबाबदाऱ्या ह्या बरोबरच आज पाश्चात्य जगताच्या अनुकरणाच्या नावाखाली आपणच आपले संपूर्ण राहणीमान, जीवनमान बदलून टाकले आहे. त्यातूनच बदलेल्या खाण्यापिण्याच्या सवयी ह्यामुळे अलीकडच्या काळात विविध रोगांचे प्रमाण वाढत आहे. ह्या अशाच जीवनमान बदलातून होणाऱ्या व्याधींपैकी (Lifestyle disorders) अबीज रजःप्रवृत्ती (Anovulatory cycle) ह्या व्याधीचे प्रमाण वाढत आहे.
मासिक रजःस्त्राव सुरु झाल्यापासून सुरुवातीचे काही महिने मासिक रजःस्त्राव अनियमित असणे ही प्रकृती असते. पण स्त्रीबीज निर्मितीस सुरुवात झाली की मात्र हा मासिक रजःस्त्राव नियमित प्रतिमाह येणे आवश्यक असते.
अनियमित मासिक रजःस्त्रावामुळे अपत्यप्राप्ती होत नाही व इतर लक्षणे देखिल स्त्री स्वास्थ्यावर दिसून येतात. उदा. स्थौल्य, उदरवृद्धी, शोथ, उच्चरक्तदाब, आम्लपित्त प्रमेह इ.
रजः प्रसेकान्नारीणां मासि मासि विशुध्यती |
सर्व शरीरं दोषाश्च न प्रमेहन्त्यत: स्त्रिया || . . . . . सु. नि. ६|३
मासिक रजःस्त्रावात अनियमितता असेल, अल्पता असेल तर गर्भधारणा होऊ शकत नाही.
सुश्रुताचार्यांनी आर्तवक्षयाची संप्राप्ती व लक्षणे सांगितली आहेत.
आर्तवक्षये यथोचितकालदर्शननिमल्पता व योनिवेदना च | सु. सु. १५|१२
प्राकृत प्रमाणात रजस्त्राव न होणे, अनियमित रजःस्त्राव, अल्पप्रमाणात रजःस्त्राव होणे. ह्यावर आधुनिक शास्त्रात Hormonal therapy दिली जाते. व हि Hormonal therapy चालू असे पर्यंत मासिक रजःस्त्रावामध्ये नियमितता असते. औषधी बंद केल्यास ती अनियमितता पुन्हा सुरु होते. ह्याठिकाणी संप्राप्ती लक्षात घेऊन चिकित्सा करावी. समानाने समानाची वृद्धी ह्या सिद्धांतानुसार चिकित्सा करावी.
तत्रसंशोधनमाग्नेयानां च द्रव्याणां विविधादुपयोग: | सु. सु. १५|१६
स्वयोनि अर्थात “आर्तवं तु आग्नेयम्” | आर्तव हे आग्नेय गुणात्मक असल्यामुळे संशोधनानंतर आग्नेय गुणात्मक द्रव्यांची योजना करावी. स्त्री शरीरातील हे आग्नेय तत्व स्त्री सुलभ लक्षणांचा विकास करत असते. पाचक-पित्त हे आग्नेय तत्व वाढविण्यास मदत करते.
अशा प्रकारे आग्नेय तत्वाच्या विकृतीच्या परिणामी होणारा मासिक रजःस्त्राव “आग्नेयानां च द्रव्याणां विविधदुपयोग:” | ह्या चिकित्सासूत्रानुसार नियमित करता येतो .
अबीजोत्सर्गाची संप्राप्ती बघता संग, वातसंक्षोभ व धातुक्षय होतो व हा संप्राप्ती भंग होण्यासाठी दीपन, पाचन व अनुलोमन करणारे द्रव्य किंवा औषधीचा वापर करावा.
ह्यासाठीच काश्यपसंहितेत शतावरी व शतपुष्पा उपयोगी असल्याचे संदर्भ आहेत. कल्पाध्यायात शतपुष्पा ही पुष्टी, वर्ण, अग्निवर्धक ऋतुप्रवर्तक आणि शुक्रविशोधनी सांगितली आहे.
मधुरा वृह्णी बल्या पुष्टी वर्णाग्नीवर्धनी |
ऋतुप्रवर्तती श्रन्या योनिशुक्रविशोधनी ||
उष्णावात प्रशयनी मंगल्यापापनाशनी |
पुत्रपदा वीर्यकरी शतपुष्पा निदर्शता || . . . . . काश्यप कल्पस्थान
शतपुष्पा शतावरी कल्प :
शतपुष्पाच्या आग्नेय गुणाचा विचार करून चिकित्सा सिद्धान्ताप्रमाणे शुतपुष्पाचा उपयोग अबीज रजःप्रवृत्तीमध्ये अतिशय उत्कृष्ट रीतीने होतो.
शतपुष्पा चुर्णास जेष्ठमध व शतपुष्पा कषायाच्या भावना देऊन वटी बनवली आणि दररोज अपानकाली अर्धापत्य प्रमाणात रुग्णेस दिली. त्याचबरोबर योगबस्तीसाठी शतपुष्पा कषाय व शतपुष्पातैल ह्याच्या अनुक्रमे निरूह व अनुवासन बस्तीसाठी तीन महिने उपयोग केला. योगबस्ती हा प्रत्येक महिन्याच्या मासिक पाळीनंतर सात दिवस दिला.
त्याचसोबतच काश्यपांनी शतपुष्पा नस्याचा उपयोग करण्यास सांगितला आहे.
शतपुष्पा पलशतं जलद्रोणेषु पज्यसु |
पादावशेष निषकाथ्य पुतं भूयो विपाचयेतु ||
तैलाढ़कं पचेतेन शनै: क्षीरे चतुर्गुणे |
ततू पक्व नस्य पानाघस्नेहस्यक्षणबस्ति च |
प्रशस्तभूषिणा नित्यं यथोत्तगुणलक्ष्यये || . . . . . काश्यप कल्पस्थान
ज्या स्त्रिया नस्य व बस्तीसाठी येऊ शकत नाहीत त्यांना ह्या सूत्रानुसार शतपुष्पा वटी घ्यावयास सांगितल्या. एका ग्रुपमधील स्त्रियांना मासिक पाळीच्या पाचव्या दिवसापासून तीन दिवस नस्य आणि नंतर पुढे आठ दिवस शतपुष्पा कषाय आणि सिद्धूतैल योगबस्ती असा चिकित्सा उपक्रम तीन महिने केला.
ह्या चिकित्सा सिद्धान्ताप्रमाणे शतपुष्पाचा उपयोग अबीज रजःप्रवृत्तीमध्ये (Anovulatory cycle) मध्ये अतिशय उत्कृष्ट रीतीने होतो असे अनुभवास आले.
अबीज रजःप्रवृत्ती (Anovulatory cycle) ह्या विषयावर मी स्वतः संशोधन केले असून एकूण १३६ रुग्णांवर ह्या चिकित्सेचा उत्तम उपशय अनुभवास आहे.
ह्याचबरोबर सकष्टरजः प्रवृत्ती (Dysmenorrhoea), अनियमित रजः प्रवृत्ती (Irregular menses), PCOD ह्या विकारांमध्येही सदर चिकित्सेने उपशय मिळाला असा अनुभव आहे.
अबीज रजःप्रवृत्ती (Anovulatory cycle) मध्ये मेदसंचिती असून वजन कमी करणे अनिवार्य असते. म्हणून वरील चिकित्सेसोबत योगासने, सूर्यनमस्कार, सर्वागासन, पश्चिमोत्तासन, हलासन, प्राणायाम इ. करावीत.
अशाप्रकारे अबीज रजःप्रवृत्तीमध्ये (Anovulatory cycle) मध्ये औषधी चिकित्सा व शोधन चिकित्सा करावी. जो अनुभव आम्हाला आला तो इतरांनाही यावा हीच आशा बाळगून शास्त्रोक्त चिकित्सेचा अनुभव घ्यावा.
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

Tuesday, November 3, 2015

मेदोरोग


निरोगी माणसाच्या शरीरांत कमी अगर अधिक चरबी असते. परंतु जेव्हां तिचें प्रमाण फाजील वाढून शरीरव्यापार अगर त्या माणसाचा व्यवसाय चालण्यास त्यामुळें अडचण पडूं लागते तेव्हां त्यास रोग समजून त्यावर उपचार केले पाहिजेत. निरोगी स्थितींत चरबी किती असावी व मेदोरोग झाला असें समजण्यास तिची वृद्धि किती असली पाहिजे हें सांगणें कठिण आहे, म्हणून वरील व्याख्या पुरेशी आहे. कारण मेदामुळें अत्यंत स्थूल झालेलीं कित्येक माणसें सदृढ, निरोगी व कष्टाळू आढळतात.


मेदोरोगाची लक्षणे पुढीलप्रमाणे असतात.
सातिवृद्धत्वात्‌ चलस्फिगुदरस्तनः ।
अयथोपचयोत्साहो नरोऽतिस्थूल उच्यते ।। ...माधवनिदान

- पोट (उदर), स्तन व नितंब या ठिकाणी मेद साठायला सुरुवात होते.
- शरीरात शिथिलता येते.
- उत्साह तसेच मानसिक शक्‍ती कमी होते.

वात, पित्तदोषांमध्ये बिघाड होतो, कफदोषही अति प्रमाणात वाढलेला असतो. म्हणूनच मेदोरोगातून अनेक समस्या उद्भवू शकतात. तेव्हा वजन वाढू लागले, विशेषतः शरीरात मेद साठायला लागला तर त्यावर वेळीच योग्य उपचार घेणे श्रेयस्कर होय.
रोंगाचें स्वरूप.-त्वचेखालीं पुष्कळ चरबी जमणें हें लक्षण या रोगांत असून शिवाय शरीरांतील अंतस्त्रावक, बहिवस्त्राक व रसोत्पादक नाना पिंड, स्नायु, इंद्रियें वगैरे नाना प्रकारच्या रचनांच्या पेशींमध्येंहि मेदोवृद्धि होऊन त्यांच्या व्यापारास व क्रियेस अडथळा येतो व रोगलक्षणें होतात. हृदयस्नायूंत वसावृद्धि झाल्यानें हृदयक्रियेंत अडथळा येणें स्वाभाविक घडतें. थोडा मेद असणें हें पोषण सुस्थितींत असल्याचें चिन्ह आहे, परंतु फाजील मेदोवृद्धीमुळें रोग होतो.
लक्षणें.- तरुणपणीं अंगांत मेद शिरला म्हणजे वजन वाढतें व तें सहन करण्यासाठीं स्नायूंचीहि वृद्धि होते. कांहीं पहिलवान लोक अशामुळेंच लठ्ठ बनलेले असतात. पण एकंदरींत या दिसण्यांत ढब्बू लोकांच्यानें फारसे श्रम करवत नाहींत व केले तर त्यांनां वाजवीपेक्षां अधिक दम लागून, छाती उडते व ते धांपा टाकतात. ते बहुधां सुस्त व झोंपाळू असून त्यांच्यानें शारीरिक अगर मानसिक श्रम फारसे करवत नाहींत; मात्र यास पुष्कळ अपवाद सांपडतात. कांहीं लठ्ठ माणसांची कांति लालबुंद गाजरासारखी व निरोगी दिसते व कांहीं मात्र फिकटलेले असतात. त्यांनां संधिवात, बहुमूत्ररोग, दम, श्वास, मधुमेह यांपैकीं एखादा रोग होण्याची प्रवृत्ति असते.

मेदोरोगाचे वैशिष्ट्य असे, की मेदधातू अति प्रमाणात वाढला की त्याच्या पुढचे धातू उदा. हाडे, मज्जा, शुक्र यांना पोषण मिळेनासे होते आणि याचा परिणाम म्हणून मनुष्याची शक्‍ती कमी होते, थोड्याही परिश्रमांनी थकून जातो, थोडेही चालले असता त्याला दम लागतो, फार तहान लागते, अस्वस्थ व्हायला होते, झोपेमध्ये घोरण्याची प्रवृत्ती वाढते, अंग दुखते, भूक जास्ती लागते, घाम अतिप्रमाणात येतो, घामाला दुर्गंध येतो, तसेच काख, जांघ वगैरे ठिकाणी दुर्गंध येतो. काहीही करण्याचा उत्साह राहत नाही. तसेच मैथुनाच्या बाबतीत असमर्थता येते.
मेदोरोगावर आयुर्वेदात अनेक औषधे सांगितली आहेत. पण हि औषधे आयुर्वेद तज्ञ अथवा वैद्याच्या सल्ल्यानुसारच घ्यावीत .
आयुर्वेदानुसार अत्यांबू सेवनाने म्हणजेच जास्तीचे पाणी पिल्याने मेदोरोग बळावतात . यांचा उल्लेख संतार्पनोत्थ व्याधीन मध्ये म्हणजे स्निघ्ध पदार्थांच्या सेवनाने होणारे रोग यात केलेला आहे . मेदोरोगात पाणी तहान असेल तरच आणि गरज असेल तितकेच आणि शक्यतो कोमट करूनच प्यावे .
औषधे
कैशोर गुग्गुळ
चंद्रप्रभा वटी
आरोग्य वर्धिनी
कुम्भजतु
अशी औषधे यात वापरता येतत. तसेच वमन , लेखन बस्ती सारख्या पंचाकार्मातील उपचार पद्धतीनी यात अनेक लक्षणीय बदल होऊ शकतात .
अथर्व आयुर्वेद हॉस्पीटल
आय. डी . बी . आय. बँके समोर
६० फुटी रस्ता ,
वसई रोड पश्चिम 9860431004


Visit Our Page