Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Saturday, March 19, 2016

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या

सुरक्षित मातृत्व : गर्भिणी परिचर्या
गर्भवती स्त्री ज्या वातावरणात राहते, जो आहार घेते, त्या काळात ती ज्या ताणतणावातून जात असते, जी औषधे घेते ह्या सगळ्यांचे बरे-वाईट परिणाम होणाऱ्या बाळावर होत असतात. हे परिणाम कधी जन्मतःच दिसून येतात. तर कधी त्याच्या भविष्याच्या आजारातून ते प्रकट होतात. अनेकविध लढाया लढत बाळाला जन्माला घालण्याचे दिव्य माता करत असते तेव्हा गर्भधारणेच्या काळात मातेने स्वत:ला कसे जपायला पाहिजे ह्याचा विचार तिच्या कुटुंबाने करायला हवा. तरच श्रेष्ठ बालक जन्माला येऊन माता-पित्याचे सार्थक करेल व माता पित्याच्या आनंदाचे कारण होईल. कवी कुसुमाग्रजांच्य
ा कवितेत बदल करून म्हणावेसे वाटते की, “मातेच्या गर्भात उद्याचा, उज्ज्वल उष:काल”
माता पित्यांनी अपत्य निर्मितीच्या घटनेचा अर्थ समजून घेतला पाहिजे. धर्मशील आणि असामान्य अपत्य प्राप्तीसाठी पति-पत्नीने एकमेकांत तदात्म पावण्याच्या क्षणी तद्रूपता अनिवार्य असते. माता पित्याने गर्भनिर्मितीच्य
ा वेळी मिलनासाठी केवळ ‘शारीरिक सज्जतेचा’ नव्हे तर, ‘मानसिक सायुज्याचा’ क्षण हा विचार करावा. गर्भधारणेपासून मूल होईपर्यंत आई-वडिलांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो.
प्रसन्नतेने, आनंदाने केलेले भोजन देहाच्या कोषाची वृद्धी करते, पण असंतोषाने पंच पक्वान्नाचे केलेले भोजन मनामध्ये असंतोष निर्माण करते. म्हणून मातेने गर्भावस्थेत आपल्या आहाराकडे अधिक लक्ष द्यावे. आहाराबरोबरच गर्भवतीचा विहार, दैनंदिन जीवनशैली, मनाची प्रसन्नता यांनाही विशेष महत्त्व आहे.
पूर्वीच्या काळी जनजीवन निसर्गाशी एकरूप होते. त्यामुळे स्त्री पुरुष सर्वसाधारणपणे निसर्गाशी लयबद्ध जीवन व्यतीत करीत होते. त्यामुळे सुप्रजजननासाठी वेगळ्या मार्गदर्शनाची गरज नव्हती. परंतु अलीकडे विज्ञान व तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व्यक्तीनिष्ठ जगण्यास महत्त्व प्राप्त झाले आहे. इसवी सनापूर्वी महर्षी चरक यांनी गर्भिणी परिचर्येला महत्त्व दिले आहे. गर्भिणी परिचर्येमुळे उत्तम रोगप्रतिकारक शक्ति निर्माण होऊन सद्गुणी व मेधावी अपत्य प्राप्ती होते. श्रेयेसी व मनोवांच्छित प्रजोत्पादनाचे हे मूळ रहस्य आहे.
सुरक्षित मातृत्वासाठी जगातील पाच देश सर्वोत्तम आहेत. त्यात डेन्मार्क, स्वीडन, नॉर्वे, आइज्लँड, वॉशिंग्टन व युरोपीय देशाचा समावेश आहे. आफ्रिका हा देश सुरक्षित मातृत्वासाठी अत्यंत धोकादायक आहे. मनुष्य जीवनाला एक निश्चित अर्थ व प्रयोजन प्राप्त होण्यासाठी प्रत्येक गरोदर स्त्रीने गर्भिणी परिचर्येचे पालन करणे अत्यावश्यक आहे. केवळ गर्भवती झाल्यावर योगायोगाने जन्माला आलेले बालक म्हणजे संतती ह्याउलट योग्य परिचर्या पालन केल्यानंतर निर्माण होणारे बालक ह्यास ‘श्रेयसी बालक’ म्हणावे किंवा ‘चरकाचार्यांची श्रेयसी प्रजा’ अशी माझी धारणा आहे. प्रजजन ही बाब नैसर्गिक नसून मैथुन हा मजेचा विषय नाही. श्रेयसी प्रजेचे स्वप्न उभयतांनी पाहून मग संततीप्राप्तीचा संकल्प करावा हा ह्या लेखाचा उद्देश आहे. गर्भिणी परिचर्येतील महत्त्वाच्या विषयावर ह्या लेखात प्रकाश टाकला जाईल.
गर्भिणी आहाराबद्दल ह्यापूर्वी दोन लेखांमध्ये सविस्तर मार्गदर्शन केल्याचे आठवत असेलच. सुप्रजजननासाठी गर्भवती स्त्रीच्या जीवनशैलीचे नियोजन असणे आवश्यक आहे. ह्यामध्ये सामान्य दिनचर्या, ऋतुचर्या अंतर्भुत आहे. परिचर्येची सुरुवात ब्राह्म मुहूर्तापासून अपेक्षित आहे. कारण ह्या काळात विविध प्रकारचे उपयुक्त संप्रेरके शरीरामध्ये निर्माण होत असतात. आयुर्वेद तज्ञांनी गर्भ गर्भाशयात २८० दिवस म्हणजे १० महिने कसा वाढतो ह्या संदर्भातील विविचेन केलेले आहे. गर्भपोषण आणि मातृपोषण हा परिचर्येचा गाभा आहे. गर्भिणी परिचर्येत वापरण्यात येणाऱ्या औषधींमुळे १० महिन्यांच्या काळात कुठल्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. व वारंवार होणारे गर्भपात गर्भिणी शोथासारखे त्रास सुध्दा परिचर्येमुळे आटोक्यात आले आहेत. गर्भ विकासासाठी १० महिन्याच्या औषधोपचार संकल्प पहिल्या महिन्यांपासून केल्यास गर्भाचे योग्य पोषण होऊन गर्भिणीचे बल टिकून राहते.
प्रथम आपण महर्षी चरक व आचार्य सुश्रुत यांच्या परिचर्येचा संक्षिप्त मागोवा घेऊ.
१) पहिल्या महिन्यामध्ये देशी गायीचे ताजे दूध व मधुर, शीत द्रव आहार घ्यावा. ह्यामध्ये गव्हाची गरम पोळी, दूध, साजूक तूप, भाज्या घातलेला पराठा, शिरा, कणिक किंवा नारळ घातलेल्या करंज्या असा आहार घ्यावा.
२) मधुर औषधांनी सिद्ध केलेले देशी गायीचे दूध प्यावे. वात दोषांचा प्रकोप करणारा आहार (वांगी, मोड आलेली कडधान्ये, बटाटे इ.) घेऊ नये.
३) आहारामध्ये दूध, तूप, मध, लोणी, साखर यांचा समावेश करावा. तिसऱ्या महिन्यापासून सहावा महिना पूर्ण होईपर्यंत गर्भिणीस हेमप्राश ६ थेंब रोज सकाळी द्यावेत. ह्याने गर्भाच्या ज्ञानेन्द्रियांची क्षमता व बालकाची रोगप्रतिकार क्षमता वाढते.
४) लोणी, दुधाचे पदार्थ व ताजे दही – भात खाण्यास हरकत नाही. देशी गायीच्या दुधापासून काढलेले लोणी शक्य झाल्यास खावे. जर्सी गायीचे दूध व त्यापासून केलेले पदार्थ योग्य नाहीत. ह्या काळात डाळिंब हृदयाला पोषक असल्यामुळे तसेच अग्निदीपक असल्यामुळे हितकर आहे.
५) “पंचमे मनः प्रतिबुद्धतरं भवति ||” पाचव्या महिन्यात बीजरूप मनाचे व्यक्तीकरण होते. रक्त धातू, मांस धातू पुष्ट होतात. त्यामुळे दूध, तुपाचा वापर बंद करू नये. विशेषतः स्त्रिया दूध, तूप सेवनास राजी नसतात. त्यामुळे आचार्यांनी ह्यावर भर दिलेला दिसतो.
६) “षष्ठे बुद्धी: ||” बुद्धीच्या विकासासाठी सहाव्या महिन्यात औषधी सिद्ध दूध, गोक्षुर सिद्ध तूप, मुगाचे कढण हमखास वापरावे.
७) “सप्तमे सर्वांग प्रत्यंग विभाग: ||” मधुर औषधी सिद्ध दूध, तूप तसेच भोजनामध्ये पहिला घास साजूक तूप व भाताचा असावा. ह्या महिन्यात स्तनाग्रास तेल लावून स्तनाग्रे बाहेर हळूहळू ओढवीत. योनिभागी तिळाच्या तेलाने तर्जनीद्वारे अभ्यंग करावा. ह्या महिन्यात लघवीला आग व जळजळ होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते म्हणून मीठ कमी खावे. औषधी गर्भसंस्कार संचात वर्णित औषधांच्या जोडीला मज्जाधातू पोषक औषधे वापरण्यास हरकत नाही. अस्थि पोषणासाठी शतावरी, गुळवेल, शुंठी, चंदन सुध्दा मी वापरत असतो.
८) “अष्टमे अस्थिरी भवति ओज: ||” मुगाचे कढण दूध तुपासह तसेच आस्थापन अनुवासन बस्तीचा वापर तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावा. सुप्रसव तेलाचा पिचुधारण प्रयोग दररोज रात्री प्रसूतीच्या दिवसापर्यंत करावा. निर्जंतुक केलेल्या कापसाचा पिचु योनीमार्गात ठेऊन सकाळी काढून टाकावा. ह्याने प्रसवमार्गात स्निग्धता निर्माण होते, स्नायूंची लवचिकता सुधारते, मार्ग निर्जंतुक राहतो व प्रसूती अगदी सहज सुलभ होते.
९) “नवम दशम एकादश द्वाद्शानाम् अन्यतम् जायते | अतो अन्यथा विकारी भवति ||” नवव्या महिन्यात गर्भ सर्वांग प्रत्यंगांनी युक्त होतो. योग्य विल पाहून मग सुतिकागार प्रवेश अर्थात रुग्णालयामध्ये प्रवेशित करावे.
१०) “नवमे विविधान्नानि दशमे....|” दहावा महिना बालकाच्या आगमनाची चाहूल लावणारा असतो. ह्या महिन्यात उपरोक्त आहार तसाच चालू ठेवावा. ह्या महिन्यात आचार्यांनी विविध अन्न सेवन करण्यास सांगितले आहे. ह्यामध्ये दूध, तूप, इ. नी युक्त आहार सेवन करावा.
११) प्रसूतीनंतर बाळंतिणीने किमान २ ते ३ महिने सूतिकाभ्यंग तेलाने दररोज स्नानापूर्वी अभ्यंग करावे. गर्भावस्थेत व प्रसूतीदरम्यान पडलेला ताण व धातूंची झीज ह्या अभ्यंगाने लवकर भरून निघते.
योगासने व गर्भिणी परिचर्या
तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास व प्राणायाम करावा.
१) पहिल्या तिमाहीतील योगासने - वज्रासन, सिद्धासन, सुखासन, कटिचक्राचसन
२) दुसऱ्या तिमाहीतील योगासने - भद्रासन, मार्जारासन, ताडासन, त्राटक
३) तिसऱ्या तिमाहीतील योगासने - पर्वतासन, प्राणायाम – शीतली, सित्कारी, भ्रामरी
आचार विषयक नियम – (काय करू नये)
१) भूक नसताना जेऊ नये. नाहक उपवास करू नये. गर्भाची वाढ मातेच्या अन्नग्रहणातून होत असते हे विसरू नये.
२) पंचकर्म करू नये.
३) रात्रीचे जागरण टाळावे.
४) बॅडमिंटन, धावणे, कब्बडी, खो-खो तसेच घरामध्ये धावपळ करू नये.
५) प्रवास टाळावा.
६) शक्यतो शारीरिक संबध टाळावा.
काय करावे –
१) कोमट पाण्याने नियमित स्नान करावे.
२) अवस्थेस अनुसरून सैल व सूती कपडे घालावेत.
३) झोपण्यास व बसण्यासाठी अधिक उंच नसलेली बैठक किंवा शय्या असावी.
४) मन प्रसन्न ठेवावे. सभोवतालचे वातावरण प्रसन्न राहण्यासाठी घरामध्ये निसर्ग चित्रे व बालकांची चित्रे लावावीत. विनोदी पुस्तके, नाटके पाहण्यास हरकत नाही.
५) कार्यालीन कामे नियोजनपूर्वक करावी. वरिष्ठांशी वाद टाळावा.
६) सकारात्मक जीवनशैली अंगिकारावी.
गर्भवतीसाठी संगीत –
संगीत तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अहिरभैरव, कलावती, दीपक, पुरिया, दरबारी कानडा हे राग ऐकावेत. ह्या रागांवर आधारित गाणी गर्भपोषणासाठी व मनः स्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरतात.
पित्याचा सहभाग
‘पितृत्व’ हे पण स्त्री मुळे मिळालेलं वरदान आहे. त्यामुळे पतीने गरोदरपणात पत्नीची साथ द्यावी. गर्भाची होणारी वाढ, बाळाचे वजन व प्राथमिक ज्ञान पित्याला असावे. बलाचा ७०% विकास गर्भावस्थेत होत असतो म्हणून भावी पित्याने गर्भवतीच्या आहाराकडे लक्ष द्यावे व तिच्या मनाचा विचार करा.
गर्भाधारणेपूर्वी तज्ञांकडून पंचकर्म उपचार करून घ्यावा.
स्त्री व पुरुषाची शरीरशुद्धी करून जनुकातील विकृतीची तीव्रता कमी करता येते. आनुवंशिकता सर्वसाधारणपणे डी.एन.ए. मुळे ठरवली जाते. डी.एन.ए. ची रचना बदलता येत नाही परंतु गर्भवतीचा आहार, मानसिक ताणतणाव, प्रदूषण, पर्यावरण इ. चा जनुकावर ठसा उमटतो आणि त्याची अभिव्यक्ती बदलते. हे जनुकीय बदल पुढच्या अनेक पिढ्यांमध्ये आनुवंशिकतेने धारण केले जातात. वाढणारा गर्भ आपल्या पोषणासाठी सर्वस्वी आईवरच अवलंबून असतो. तिच्याकडून पुरेसे पोषण मिळाले नाही तर अवयवांचे पोषण नीट होत नाही. गर्भास आहार न मिळाल्यामुळे गर्भाच्या वाढीसाठी लागणारी संप्रेरके व त्यांचा स्त्राव कमी होतो हे गरोदर उंदराच्या मादीवर प्रयोग करून सिद्ध झाले आहे. गरोदर उंदराच्या मादीला फॉलिक अॅसिड व व्हिटामिन B12 युक्त आहार दिला. तेव्हा तिला निरोगी पिल्ले झाली. दुसऱ्या मादीला अशाप्रकारचा आहार दिला नाही. तिला पिवळसर बारीक पिल्ले झाली. ह्याचाच अर्थ आहाराचा परिणाम गर्भस्थ बालकावर होतो. १९४४ – ४५ साली हॉलंडमध्ये दुष्काळ होता. तेथील गर्भवती स्त्रियांवर त्याचा परिणाम होऊन त्यांच्या बाळांना मधुमेहाचे प्रमाण दिसून आले, तसेच आहाराचा परिणाम मेंदूतील हायपोथॅलॅमिक ग्रंथीवर होऊन भूक नियंत्रणामध्ये फरक पडला आणि ही मुले तारूण्यामध्ये खुप लठ्ठ झाली. गरोदर मातेने कोकेन किंवा फेनिटॉईन सारखी औषधे घेतल्यास ह्याचा परिणाम गर्भावर होतो व बालपणी ल्युकेमिआ, मेंदूचा कर्करोग होण्याची शक्यता असते. अशा मुलांना पुढे सिझोफ्रेनियासारख्या आजारांना तोंड द्यावे लागते. गोरोदर माता मानसिक तणावाखाली असेल तर अॅड्रिनॅलिन, ऑक्सिटोसिन इ. हॅार्मोन्स तयार होतात. परिणामी बाळाच्या हृदयाचे ठोके वाढतात. भविष्यात अशा बाळांना मानसिक व्याधीला सामोरे जावे लागते. म्हणून पतीने आपल्या गरोदर पत्नीस प्रसन्न ठेवावे.
लेखक – प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति
सहयोगी प्राध्यापक, पोदार वैद्यक महाविद्यालय व रुग्णालय, वरळी, मुंबई
भ्रमणध्वनी - +917738086299/ +919829686299
ईमेल – subhashmarlewar@gmail.com
वैद्य संतोष जळूकर
संचालक – अक्षय फार्मा रेमेडीज (इंडिया) प्रा. लि.
मुंबई
भ्रमणध्वनी - +917208777773
ईमेल – drjalukar@akshaypharma.com

Tuesday, March 15, 2016

#‎घरोघरी_आयुर्वेद‬

“तुम्ही वैद्य लोकं खाण्याची खूप पथ्य सांगता बुवा.....लोक त्यांच्या आवडीचं खातायत हे तुम्हाला बघवतच नाही. म्हणून मी आयुर्वेदापासून चार हात लांब असतो.”
काही कामाच्या निमित्ताने चेन्नईत दौऱ्यावर असताना एका हॉटेलमध्ये जेवायला बसल्यावर आमच्यासह असलेल्या एका मध्यमवयीन व्यक्तींनी हा बॉम्ब टाकला.
“इथे प्रश्न रुग्णाच्या आवडीचा नसून; त्याच्या भल्याचा आहे. जे पदार्थ खाऊन आरोग्याला अपाय होतो असेच पदार्थ आम्ही टाळायला सुचवतो. त्यात आम्हाला आनंद मिळतो असं कोणाला वाटत असल्यास करणार काय?” इति मी.
“कसला काय अपाय होणार आहे? माझाच आहार बघा आता....आणि सांगा काय अपाय होणार आहे.”
असं म्हणून या गृहस्थांनी अट्टाहासापायी चिकन स्वीट कॉर्न सूप, तंदुरी चिकन, तंदुरी रोटी, पनीर बटर मसाला, चिकन बिर्यानी आणि शेवट ‘स्वीट डिश’ म्हणून आईसक्रीम असा त्यांच्या ‘आवडीचा’ आहार घेतला. त्यात भर म्हणजे हे गृहस्थ संपूर्ण जेवणभर पाण्याऐवजी कोल्ड्रिंकच पीत होते. आईसक्रीम मागवण्यापुर्वी वाडगाभर दही खाऊन मग त्यांनी मला विचारलं;
“काय मग...तुम्ही यालाच विरुद्धाहार म्हणता नं? काही नसतं तसं. खायचं बिनधास्त. तुमचा आयुर्वेद काय सांगेल आता माझ्या या आहाराबद्दल?”
मी केवळ हसून उत्तर देण्याचं टाळलं.
“सांगा की वैद्यराज. उत्तर द्यावच लागेल”
“आयुर्वेद हे माणसांसाठीच शास्त्र आहे हो. तुमच्यासारख्यांनी दुर्लक्ष करावं आयुर्वेदाकडे!!” अखेरीस आमचा फटका बसलाच.
चेन्नईचा निसर्ग आपल्या स्वभावाला जागलाच आणि रात्री मुसळधार पाऊस पडला. सकाळी ६ वाजता माझ्या दारावर थाप पडली. दार उघडतो तर काय; या सद्गृहस्थांच्या पत्नी हजर!
“डॉक्टर; ह्यांना पहाटेपासून ताप आहे. तुम्ही तपसायला येता का?”
मी लगेच तपासायला गेलो. नाडी परीक्षण आणि उदर परीक्षण केल्यावर अजीर्ण झाल्याचे निदान करून दिवसभर भूक लागल्यावर पेज अन्यथा लंघन आणि सुंठीचे गरम पाणी घेण्यास सुचवलं आणि माझ्या कामाला लागलो. संध्यकाळपर्यन्त त्यांचा ताप उतरला आणि ठणठणीत झाले.
आपले वैद्य जे पथ्य सांगतात त्यांमागे काही कारणं असतात हे नेहमी लक्षात ठेवा. पथ्य पाळणाऱ्या मनुष्याला औषधांची गरजदेखील पडत नाही असं सांगणारं एकमेव शास्त्र म्हणजे आयुर्वेद.
‘पथ्य-बिथ्य काही नसतं. आडवं-तिडवं कसंही खायचं. काही होत नाही.’
असं ज्यांना वाटतं त्यांनी लक्षात नेहमी ठेवा......वेळ सांगून येत नसते. आग लागल्यावर विहीर खोदण्यापेक्षा सुरुवातीपासूनच काळजी घेतलेली काय वाईट?
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

व्यायामबद्दल थोडेसे


व्यायामबद्दल थोडेसे

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. 22 वर्षीय एक तरुण मुलगा आमच्याकडे दवाखान्यात आला. त्याचे नाव अमोल .त्यास विचारले की काय तक्रार आहे तर म्हणाला ,हात पाय खूप दुखतात आणि जेवण पण पचत नाही . वेळेवर शौचास होत नाही दोन तीन वेळा जावे लागते.
त्याचे पूर्ण इतिवृत्त विचारले तेव्हा कळले कि साहेब जिम मध्ये जातात . मग कौतुकाने म्हणाला जिम एअरकंडिशन आहे. मी म्हटले व फारच सुंदर .व्यायाम करायचा का तर घाम गाळण्यासाठी आणि तो पण एअरकंडिशन जिम मध्ये म्हणजे बुडत्याचा पाय खोलात.जेवणाची वेळ कोणती तर दुपारी २ ला आणि व्यायामाची ४ वाजता.मग काय त्या अन्न पचनासाठी आलेल्या पाचक स्रावांचा पण गोंधळ उडाला असेल एवढं नक्की.त्यामुळेच अपचन आणि अनियमित मलप्रवृत्ती आणि एअरकंडिशन मध्ये व्यायाम हे साक्षात सांधेदुखीला आमंत्रणच जणू. 
हे समजावून सांगताच साहेबांच्या डोक्यात प्रकाश पडला.मग म्हणे मला कोणी सांगितलेच नाही हे.मग आता कळले ना मग सुधारणा करा.
डॉक्टर तुम्ही बोलला तसच करणार व्यायाम सकाळी करेन आणि दुपारी १.०० वाजेपर्यंत जेवण करेन असे बोलून आणि सात दिवसांची औषधे घेऊन समाधानाने अमोल घरी गेला.
चुकीच्या पद्धतीने एखादी गोष्ट केली तर त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो याचे साक्षात उदाहरण आणि काय! इतर व्यायामविषयक माहिती पुढील भागात......
वैद्य दत्तप्रसाद प्रभु
090294 74927

श्री विश्वदत्त आयुर्वेद,
योग आणि पंचकर्म सिद्धिविनायक अपार्टमेंट जिजामाता चौक कुडाळ
,सिंधुदुर्ग
राज्य महाराष्ट्र
संपर्क-8411849757
 


090294 74927

Tuesday, March 8, 2016

स्त्री स्वास्थ्यरक्षण विशेष

स्त्री स्वास्थ्यरक्षण विशेष -
स्त्रियांच्या अवयवांमध्ये त्र्यावर्तचा म्हणजे बाह्ययोनि, गर्भाशयमुख, गर्भाशय, आर्तववाहिन्या, बीजांड ह्यांचा समावेश होतो. साधारणपणे मुठीच्या आकाराचा ओटीपोटामध्ये असलेला गर्भाशय हा अवयव असतो. त्याचे तोंड योनीमध्ये उघडते. स्त्रियांचे बहुतांश आजार त्र्यावर्ता योनीशी संबंधित असतात. महर्षी चाराकांनी “योनिव्यापद्” ह्या नावाने चरकसंहितेत ह्याची चर्चा केली आहे.
पाळी अनियमित येणे, पाळीमध्ये रक्तस्राव होणे, पाळी २-२ महिने न येणे, बीजांडामध्ये गाठी होणे, बाळ न होणे, मासिक पाळीमध्ये पोट दुखणे, वारंवार मूत्रप्रवृत्ती होणे, गर्भाशय – योनि खाली सरकणे, रजोनिवृत्ती, श्वेतप्रदर, रक्तप्रदर अशा अनेक प्रकारच्या समस्यांना स्त्रियांना सामोरे जावे लागते. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ह्यावर आपण चर्चा करणार आहोत.
स्त्री स्वास्थ्यासाठी सर्व महिलांना आरोग्यपूर्ण शुभेच्छा.........
1. मासिक पाळीपूर्व तणाव –
अनेक स्त्रियांमध्ये मासिकपाळीपूर्वी पोटात दुखणे, मळमळ, उलटी होणे, डोके दुखणे अशा तक्रारी पहावयास मिळतात. मलबद्धता, स्तन दुखणे ह्या तक्रारींशिवाय चिडचिडेपणा, राग येणे, छोटी गोष्ट मनाला लावून घेऊन रडणे इ प्रकार होतात. वास्तविक गर्भाशयाचे कार्य व मनोव्यापार ह्यांचा परस्पर संबंध आहे. पाळी चालू होण्यापूर्वी ४-५ दिवस अदोदर ह्या तक्रारींना सुरुवात होते. एकदा मासिक रजःप्रवृत्ती झाली की ह्या तक्रारी दूर होतात.
असे का होते?
ह्याचे निश्चित कारण स्पष्ट करता येत नसेल तरी अंतर्स्रावातील बदलामुळे किंवा जीवनसत्वाच्या अभावी असे होत असावे. बीजप्रसावामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन पातळीमध्ये होणाऱ्या बदलामुळे असे होत असावे. पायरीडॉक्सीन आणि इफा (इसेन्शियल फॅटी अॅसिड) कमतरतेमुळे पाळीपूर्वी पोटात दुखते. बदलत्या जीवनशैलीमुळे फास्टफूडचा वापर जास्त प्रमाणात होतो. परिणामी असे होत असावे.
2. अनियमित मासिक पाळी –
मासिक पाळी २१ दिवसांच्या आत व दीड महिन्यापेक्षा उशिरा येत असल्यास बरोबर नाही. बीजविमोचानाची क्रिया होत नसल्यामुळे हे घडत असते. नियमित पाळीमध्ये रजःस्राव ४ ते ५ दिवस असतो. काही स्त्रियांना स्राव २ दिवस तर काहींना ७ दिवसांपर्यंत राहतो. रक्तस्राव ८ अंजली म्हणजे ८० ते १०० मिली असतो.
अनियमितता का होते?
मुलगी वयात येतांना व ऋतुमती झाल्यावर पहिले २ वर्ष पाळी अनियमित असते. अबीजप्रसवी पाळीत सुद्धा अनियमितता आढळते.
रक्त गोठण्याची प्रक्रिया, गर्भाशय अंतःस्तर जाड होणे, जंतुसंसर्ग, गर्भपात, स्राव, गर्भाशय मुखाचा कर्करोग, गर्भाशयात गाठी होणे, कॉपर टी, पांडुरोग ह्यामुळे सुद्धा अनियमित पाळी असते.
3. गर्भाशयात गाठी होणे –
अविवाहित स्त्रिया, वंध्यत्वाने पिडीत स्त्रिया एखादेच मूल असणाऱ्या बायका ह्यांना गर्भाशयात गाठी होऊ शकतात.
अबीजप्रसवी पाळीत इस्ट्रोजेनचा प्रभाव प्रोजेस्टेरॉनपेक्षा जास्त असतो. अशा स्त्रियांमध्ये गाठी तयार होण्याची प्रवृत्ती अधिक असते. शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात असतांना विविध प्रकारचे २० किलो वजनाचे फायब्रॉइड असलेली एकच स्त्री मी पहिली. नांदेड येथे डॉ. सुनील कदम, डॉ. नरेंद्र भंगाळे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया झाल्याचे मला आठवते. सोनोग्राफीमुळे ह्याचे निदान आता सोपे झाले आहे.
अगदी क्वचित प्रसंगी गाठीचे रुपांतर कर्करोगात होते. परंतु बऱ्याच वेळी ह्या गाठी सध्या असतात. त्यांची वाढ होत नसेल तर शस्त्रक्रिया करण्याची गरज नाही. मिलिमीटरमध्ये असणाऱ्या गाठी आयुर्वेदोपचाराने कमी हतात. रजोनिवृत्तीनंतर अशा गाठी आकसून जातात.
4. पॉलिसिस्टिक ओव्हरी –
स्त्रीबीजकोशामध्ये साबुदाण्याच्या आकाराच्या फोलिकल आढळल्यास त्यास PCOS म्हणतात. बदलत्या जीवनशैलीमुळे हे होत असून ह्या संदर्भातील माहिती आपण वाचली असेल. तरीही अनुवंशिकता, गुणसूत्रबदल, चिंता – ताण – तणाव, स्पर्धात्मक युग, प्रदूषण इ बाबींचा विचार ह्यात करता येतो. उपाय न केल्यास मधुमेह, स्थूलता, अतिरक्तदाब, क्वचित वेळा गर्भाशय अंतःस्तराच्या कर्करोगाची शक्यता असते.
5. श्वेतप्रदर
धुपणी, पांढरे जाणे, अंगावर जाणे अशा प्रकारच्या तक्रारी घेऊन स्त्रया येत असतात. ट्रायकोमोनास फंगस आणि बॅक्टेरियामुळे हा त्रास होतो. गुदमार्ग स्वच्छ असावा. मूत्रमार्ग – योनीमार्ग जवळ असल्याने रोगजंतूंचा प्रवेश योनीमार्गात होऊ शकतो. संभोग, अस्वच्छता, मधुमेह ह्यामध्ये हा त्रास होऊ शकतो.
रजोनिवृत्ती नंतर हा त्रास झाल्यास योनिपरीक्षण करून घ्यावे व पॅपस्मियर टेस्ट करून घ्यावी. योनि ओलसर राहण्यासाठी निसर्गतःच योनीमध्ये स्राव असतो. त्यास दुर्गंध नसल्यास व लक्षणे नसल्यास घाबरून जाऊ नये.
6. अंग बाहेर येणे –
काहीतरी बाहेर येणे, थेंबथेंब लघवी होणे, खोकल्यावर लघवी होणे, ओटीपोटात दुखणे, कपडे दुर्गंधित होणे अशा तक्रारी घेऊन जेव्हां स्त्रिया येतात तेव्हां हमखास गर्भाशय, मूत्राशय खाली आला आहे असे समजावे. अशा तक्रारी बायका अनेक वर्ष अंगावर काढतात. हा प्रकार कोणत्याही स्त्रीला होऊ शकतो. गर्भाशयाला आधार देणाऱ्या पेशी अशक्त झाल्यास असे होते. तीन पेक्षा जास्त बाळंतपणे, वारंवार गर्भपात, प्रवाहिका, मलबद्धता ह्यामुळे अंग बाहेर येऊ शकते. ह्यात योनीमार्गे गर्भाशय काढण्याचे शस्त्रकर्म करणे चांगले. सुरुवातीच्या काळात आयुर्वेदिक उपचार, योग, व्यायाम ह्यामुळे फरक पडू शकतो.
7. स्तनाचे विकार –
स्तनाच्या ठिकाणी गाठ असणे, सूज येणे, आकार बदलणे, स्तनाग्रातून स्राव येणे, स्तनाग्र आत ओढल्यासारखी होणे, दोन स्तनांमध्ये फरक जाणवणे, पाळीपूर्वी स्तनात दुखणे ह्या तक्रारींमध्ये मॅमोग्राफी तपासणी करावी. स्वतः तपासण्याची सवय लाऊन घ्यावी (स्वयं-स्तनपरीक्षण), उतीची परीक्षा, जागरुकता, ह्यामुळे पुढील धोके टाळता येतात.
8. हाडांचे विकार – अतिरक्तदाब
अतिरक्तदाब, हाडांचा ठिसूळपणा हा स्त्रियांच्या पाचवीलाच पुजलेला आहे. आहाराकडे दुर्लक्ष, व्यायामाचा अभाव, शरीराची अयोग्य ठेवण, जमिनीवर बसण्याची सवय मोडल्यामुळे कॅल्शियमचा अभाव, बैठ्या जीवनशैलीमुळे हाडे दुखतात. पाठीला बाक येतो, उंची कमी होते, पाठीचा कणा – मनगट ह्यात थोडीशी दुखापत झाली की हाड तुटते. बोन डेन्सिटी तपासल्याने हे निदान होऊ शकते. हा आजार कित्येक दिवस दबा धरून बसत असल्याने त्यास सायलेंट किलर म्हणतात.
रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण, रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा, चिंता, मधुमेह ह्यामुळे अतिरक्तदाब आढळतो.
9. स्थूलता -
स्त्रियांनी नियमित दिनचर्या, व्यायाम करत आपली फिगर मेंटेन करावी. स्त्रियांच्या कमरेचा घेर ८८ सेंटीमीटरपेक्षा कमी असावा. BMI हा १८ ते २४ असावा.
10. कंबरदुखी –
वारंवार होणारे गर्भपात, बाळंतपण, कमकुवत स्नायु, पाठीचे माणके सरकणे, कॅल्शिय कमी होणे, लठ्ठपणा, पोट सुटणे, तळपाय सपाट असणे, पादत्राणाचा अयोग्य उपयोग, कॉम्प्यूटरचा वापर, उंच टाचांच्या चपला वापरणे ह्यामुळे कंबरदुखी होऊ शकते. मुलींना पाळीच्या अगोदर १-२ दिवस कंबरेचा त्रास होतो.
11. स्त्रियांना दाढी फुटणे –
मुलीच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन निर्मितीमुळे ही समस्या उद्भवते. हिरसुटीझम नावाने ही समस्या परिचित आहे. शरीराच्या विविध भागात केस वाढल्यास तपासणी करून निदान करता येते. अन्तःस्रावी ग्रंथींचे तज्ञ (एन्डोक्रायनोलॉजिस्ट) ह्यावर उपचार करतात. लेझर, ब्लीचिंग, फेशियल, व्हॅक्सिंग इ. मुळे ह्या समस्येवर बाह्यरूपाने मात करता येते.
12. रजोनिवृत्ती –
मासिकपाळी कायमची बंद होणे म्हणजे रजोनिवृत्ती. बीजकोष अकार्यक्षम झाल्यामुळे ही अवस्था येते. शुक्रधातु क्षीणता व क्षीणतेमुळे होणारी धातु विकृती, त्यामुळे चिडचिडेपणा, हाडे पोकळ होणे, केस गळणे, अंग रूक्ष होणे, झोप नीट न येणे, आवाज सहन न होणे, मलावरोध, पोट फुगणे, थकवा जाणवणे अशी लक्षणे होतात.
उपयुक्त औषधे –
1) अश्वगंधा, गोखरु, कवचबीज, शतावरी सिद्ध दूध किंवा काढा तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वापरावा.
2) वसंतकुसुमाकर, पुष्पधन्वा, अशोकारिष्ट
3) चंदनबलालाक्षादि तैलाभ्यंग
4) फलमाह वटी, वृष्यवटी, च्यवनप्राश
5) रसधातुपाचक व शुक्रपोषक औषधे – अश्वगंधा, यष्टिमधु, कोहळा, शतावरी
6) औषधी गर्भसंस्कार संचातील औषधे तज्ञांच्या सल्ल्याने घ्यावीत
योनिधावनासाठी – त्रिफळा, हळद, कडुनिंब, चंदन काढा वापरावा. करंज तेल, बला तेल, जात्यादि तेल शतधौतघृत ह्यापैकी प्रकृतीनुसार वापर करावा.
वर्णन केलेल्या आजारांव्यतिरिक्त अनेक समस्या महिलांमध्ये आढळतात. त्यांची करणे शोधून चिकित्सा केल्याने पुढे होणारी गुंतागुंत टाळता येते. स्त्री शरीर म्हणजे निसर्गाने निर्माण केलेला एक चमत्कार आहे. जैविकदृष्ट्या स्त्री सबल असून कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची विलक्षण शक्ती तिच्या अंगी आहे. आधुनिक युगात वावरतांना तिची खूप दमछाक होते. पण ती पेलण्याची क्षमता तिच्यात असतेच असे नाही. तिच्या भावनांना आदर द्यावा. स्त्री ही आदिशक्ती आहे. तिला शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्य लाभो ही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने अपेक्षा.
सर्वे भवन्तु सुखिनः l
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार
आयुर्वेद वाचस्पति,
सहयोगी प्राध्यापक,
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग,
रा. आ. पोदार वैद्यक महाविद्यालय
मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com
वैद्य हर्षदा कुलकर्णी
एम. एस. (स्त्रीरोग) स्कॉलर

Friday, March 4, 2016

डिलिव्हरीनंतर नेमकं काय करायचं आणि काय नाही?

डिलिव्हरीनंतर नेमकं काय करायचं आणि काय नाही?


   सध्याच्या काळात हा एक यक्षप्रश्नच झाला आहे. खरं तर हा काही गहन प्रश्न नाही. पण दुर्दैवाने एखाद्या शास्त्राची काहीही माहिती नसलेले लोक ‘असं काही शास्त्र नसतंच’ अशी अवैज्ञानिक विधानं करून आपली मतं लोकांच्या डोक्यावर थापण्याचे प्रकार करत असतात त्यातलाच हा भाग. काही मुद्दे क्रमाने पाहूया.
- तेलाचे मालिश करावे का?
   पूर्वीपासूनच बाळ-बाळंतीण यांना कोमट तेलाने मालिश करण्याची पद्धत आपल्याकडे होती. प्रसूतीच्या काळात या दोघांवरही शारीरिक ताण पडत असल्याने वात वाढीला लागतो. हा वात आटोक्यात आणण्यासाठी दोघांनाही कोमट बला तेल किंवा अगदी सध्या तीळ तेलाचे मालिश करणे आवश्यक ठरते. त्यामुळे तसे मालिश अवश्य करावे.
- पोट बांधणे 
    बाळंतीणीचा गर्भाशय प्रसूतीनंतर त्याच्या मूळ आकारावर पुन्हा जायला; म्हणजे आक्रसायला सुरुवात होते.
अशा स्थितीत वात वाढू नये. तसेच शरीर बेढब दिसू नये याकरता आयुर्वेदाने सांगितलेला मार्ग म्हणजे उदरपट्टबंधन अथवा पोट बांधणे. यासाठी पंचाचा वापर केला जातो. अर्थात; ही क्रिया नैसर्गिक प्रसूतीनंतर आणि आपल्या वैद्यांच्या सल्ल्यानेच करायची आहे.
- काय खावं?
     बाळासाठी अर्थातच मातेचे दूध हेच सर्वोत्तम अन्न आहे असे थोर आयुर्वेद वैद्य श्रीमद्वाग्भटाचार्य ‘मातुरेव पिबेत् स्तन्यं तत् परं देहवृद्धये|’ इतक्या स्पष्ट शब्दांत सांगून गेले आहेत. बाळंतीणीच्या आहाराबाबत काळजी दुहेरी असते. इथे स्वतःच्या शरीराची झीज भरून काढणे आणि बाळासाठी स्तन्यनिर्मिती नीट व्हावी या दोन्ही बाबी महत्वाच्या असतात. वेगवेगळ्या खीरी, लाडू यांचा आहारात समावेश करावा. आईस्क्रीम वा दह्यासारखे पदार्थ शक्यतो टाळावेत. असे पदार्थ मातेच्या आहारात असल्यास तिच्या दुधामार्फत बाळापर्यंत अतिरिक्त कफ पोहचून त्यास त्रास होवू शकतो.
- बाळगुटी द्यावी का?
    अलबत द्यावी. मात्र याविषयी आपल्या वैद्यांकडून संपूर्ण माहिती करून घ्यावी. (बाळगुटी या विषयावरील विस्तृत लेख लवकरच प्रकाशित होणाऱ्या #घरोघरी_आयुर्वेद या माझ्या पुस्तकात वाचायला मिळेल.) वयाचे एक वर्ष पूर्ण होईपर्यंत बाळगुटीचा उपयोग अवश्य करावा.
     बाळंतपण झाल्यावर वरील गोष्टी करू नका असं सांगण्याची सध्या फॅशन निघाली आहे. या गोष्टी नेमक्या का आणि कशा करतात हेच असे सांगणाऱ्यांना माहित नसते. त्यामुळे; वरीलपैकी कोणत्याही गोष्टी करू नयेत असा सल्ला कोणीही दिल्यास दुर्लक्ष करा. आणि यांपैकी कोणत्याही गोष्टींबद्दल सविस्तर माहिती घेण्यासाठी आपल्या जवळच्या वैद्यांचे चिकित्सालय गाठा. पिढ्यानपिढ्या या देशातले लोक बाळ-बाळंतीणीची व्यवस्थित काळजी घेत आहेत. ते जणू मूर्खच होते असे चित्र रंगवून परदेशी कंपन्यांच्या चकचकीत वेष्टनातली ‘बेबी किट्स’ वा ‘टॉनिक’ गळ्यात मारण्याच्या उद्योगांपासून सावधान!!
© वैद्य परीक्षित स. शेवडे
(आयुर्वेदतज्ज्ञ- लेखक- व्याख्याते)
श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद; डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५

केसांच्या आरोग्यासाठी

आयुर्वेदातुन आरोग्याकडे
केसांच्या आरोग्यासाठी
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात शरीरात कितीही त्रास असतिल तरी तेवढे लक्ष दिले जात नाही. पण लोकांना दिसणारा केंसासारखा शरीराचा भाग बिघडला की लगेच अनेकांची झोप उडते.
केस हा आयुर्वेदानुसार हाडांचा मळ सांगितला आहे. केसांच्या तक्रारी मध्ये केस गळणे, पिकणे, कोंडा होणे या तक्रारींचा समावेश करता येईल.
केस हा पितृज वडीलांकडुन येणारा अवयव आहे त्यामुळे ज्या वयात वडीलांना केसांच्या तक्रारी सुरू त्याच वयात मुलांतही दिसु शकतात. किंबहुना आजच्या प्रदुषण युक्त आधुनिक काळात ह्या तक्रारी वडीलांना ज्या वयात उत्पन्न झाल्या त्यापेक्षा कमी वयात मुलांत दिसतात.
आधुनिक आहार, रासायनिक घटकांचा वाढता वापर खाण्यासाठी व तेल शाम्पु आदी बाह्य रूपाने केसांच्या तक्रारीसाठी कारणीभुत आहे.
पुर्णपणे कारणे टाळणे अशक्य आजच्या काळात पण काही गोष्टी नक्कीच केसांच्या आरोग्यासाठी करता येतील.
१. केसांना खोबरेल तेल नक्की लावावे. तेलाने केसांचे व पर्यायाने शरीराचे पोषण होते.
२. फ्रीजयुक्त पदार्थांचा वापर केस गळणारया लोकांनी पुर्णपणे टाळावा. वापर अधिक केस गळणे थांबवण्याची अपेक्षा करू नये.
३. साध्या मीठाऐवजी शेंदेलोण वापरावे. त्याचे आहारातील प्रमाण आवश्यकतेपेक्षा अधिक नसावे.
४. केसात कोंडा अत्याधिक प्रमाणात असेल तर वैद्याकडुन सल्ला घ्यावा व आहार विहार त्यानुसार करावा.
५. केसांचे व शरीराचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी विरूध्द आहाराचे सेवन टाळावे. यात मिल्कशेक, फ्रुटसलाड, शिकरण, फ्रीजचा अत्याधिक वापर, मुगाची खिचडी+ दुध आदींचा समावेश होतो.
नित्य विरूध्द आहारी लोकांनी केसांच्या गळती थांबवण्यासाठी केलेले प्रयत्न सफल होणे अतिशय कठीण आहे.
केस पिकणे हे पित्तप्रकृती लोकांत, अनुवांषिकतेमुळे, मीठ क्षारांचा वापर आहारात अधिक प्रमाणात असेल तर उत्पन्न होऊ शकते.घडलेल्या कारणांच्या विरूध्द केलेले उपाय प्रयत्न सफल होऊ शकतात. अनुवांषिकतेमुळे उत्पन्न केसांच्या तक्रारी बीजदोषाने असल्याने दुरूस्त होण्यास अत्यंत कठीण असतात.

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र
पावडेवाडी नाका
नांदेड
9028562102, 9130497856

Monday, February 22, 2016

बीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS)


बीजग्रंथीदोष – बीजग्रंथीविकार
Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS)
“मातृत्व” म्हणजे स्त्रीजातीला लाभलेले सर्वात मोठे वरदान !! पण आजकाल बऱ्याच स्त्रिया यापासून वंचित रहात आहेत. ह्याचे कारण ‘वंध्यत्व’, आजकालच्या युगातील भयंकर समस्या, अगदी मृत्यूपेक्षाही भयंकर. . . . !! सामान्य भाषेत वंध्यत्व म्हणजे मूल न होणे.
आयुर्वेदात गर्भधारणेसाठी चार प्रमुख कारणे सांगितली आहेत.
ध्रुवं चतुर्णां सान्निध्याद्गर्भः स्याद्विधिपूर्वकम् | ऋतुक्षेत्राम्बुबीजानां सामग्र्यादङ्कुरो यथा || सु. शा. २/३३
१. ऋतु – गर्भधारणा होण्यासाठी योग्य काळ (रजःस्रावानंतरचे १२ ते १६ दिवस)
२. क्षेत्र – गर्भधारण करण्यासाठी अवयवांची उत्तम स्थिती (गर्भाशय)
३. अम्बु – गर्भपोषणासाठी लागणारा रसधातु
४. बीज – दोषरहित व सर्वगुणसंपन्न पुरुष व स्त्रीबीज
ह्या चार कारणांमध्ये काही बिघाड असणे हीच वंध्यत्वाची कारणे आहेत. ह्यात सर्वात महत्वाचे व मुख्य कारण आहे “बीजदुष्टी”.
बीजदुष्टी विषयावर सविस्तर बोलायचे झाल्यास त्याचा विचार खालीलप्रमाणे करता येईल.
          आयुर्वेदामधील कार्यकारणभाव सिद्धांतानुसार कारणाशिवाय कोणत्याही कार्याची उत्पत्ती होत नाही. गर्भनिर्मितीसाठी लागणारे समवायी कारण म्हणजे बीज होय.
आयुर्वेदामधील बीज ह्या मुद्द्याला आधुनिक विचारांमध्ये मांडायचे झाल्यास :-
१) स्त्रीबीज म्हणजे Ovum, Ovaries विषयीच्या समस्या
२) पुरूषबीज (Sperms)
          आधुनिक शास्त्रानुसार हा व्याधी म्हणजे Polycystic Ovarian Disease / Syndrome (PCOD / PCOS) होय. सुमारे ५० ते ७३ % स्त्रियांमध्ये हाच विकार वंध्यत्वाला कारणीभूत असतो. (PCOD / PCOS) हा एक विविध व्याधी लक्षणसमुच्चय आहे, ज्यामध्ये – आर्तव क्षय / अनार्तव (Oligomenorrhoea / Amenorrhoea), वंध्या / नष्टार्तव (Anovlulation), असृजा योनि (DUB), स्त्रियांना दाढी-मिशा येणे (Hirsutism), मेदवृद्धी (Weight gain), त्वचेवर काळ्या जाडसर वळ्या होणे (Acanthosis nigricans / Hyperpigmentation on neck & face), इन्सुलिन प्रतिकार (Insulin resistance), जननयंत्रणेतील अन्तःस्रावी ग्रंथींच्या स्रावांचा उद्रेक + स्त्रियांना दाढी-मिशा येणे + इन्सुलिन प्रतिकार ह्या व्याधींचा समुच्चय (Hair-AN syndrome) ह्यांचा समावेश होतो.
         सध्याच्या धावपळीच्या जीवनात आहार, विहार आणि आचार ह्यातील असमतोल, अवेळी भोजन - प्रवास, निकृष्ट खाद्यपदार्थ, मलमूत्र वेगांना रोखण्याची सवय, विविध चिंता, मानसिक ताणतणाव, व्यायामाचा अभाव, मोबाईल सदृश विद्युतचुंबकीय लहरींचा उपसर्ग इ. कारणांमुळे मासिक रजःस्राव तसेच स्त्रीबीज निर्माण प्रक्रियेवर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे.
            लाक्षणिक तत्वांवर वेध घेतल्यास आयुर्वेदोक्त आर्तवक्षय, अल्पार्तव इ. अवस्थांमध्ये त्याचे वर्गीकरण करता येते.
“आर्तवक्षये यथोचित काले अदर्शनम् अल्पता योनिवेदना वा l”
आर्तवक्षयात योग्यवेळी मासिक रजोदर्शन न होणे अर्थात (Irregular menses) - आदर्शनं (Amenorrhea), योनिवेदना (dyspareunia) ही लक्षणे दिसून येतात.
आर्तवक्षयाची संप्राप्ती दोन प्रकारे वर्णन करता येते.
क्षयात्मक संप्राप्ती - ह्यात रसादिधातूंमध्ये दुष्टी असते. त्यामुळे रसधातूनंतर निर्माण होणारे उत्तरोत्तर धातु पुष्ट होत नाहीत. परिणामी रसदुष्टीमुळे आर्तवक्षय, रक्तदुष्टीमुळे मुखदूषिका, मांसदुष्टी, मेदोदुष्टी (धात्वाग्निदुष्टीमुळे मेदसंचिती) इ. लक्षणे दिसून येतात.
मार्गावरोधात्मक संप्राप्ती – ह्यामध्ये धात्वाग्निमांद्य किंवा दुष्टी इतक्या प्रमाणात नसते परंतु रजोरूप आर्तवाचा मार्ग अवरुद्ध होतो.
“. . . तत् अधः प्रतिहतः उर्ध्वं आगच्छत् ll”
त्यामुळे रजाला उर्ध्वगति प्राप्त होते व ते उर्ध्वगामि रज उदर (गर्भाशय) व स्तनप्रदेशी संचित होऊन तेथे पोषण करते. ह्यामध्ये वजन वाढणे हे लक्षण दिसून येते.
अशाप्रकारे आयुर्वेदानुसार हा लक्षणसमुच्चय वर्णन करता येतो. PCOD / PCOS मध्ये स्त्रीबीज वेळेवर तयार होत नसल्याने स्त्रियांमध्ये वंध्यत्वाचे हे प्रधान कारण आहे.
PCOD / PCOS Investigations
(1) USG (Pelvis) shows ˃ 12 follicles of 2-9 mm diameter, increased ovarian volume ˃ 10 cm3 (2) LH elevated ˃ 10 mIU/ml; (3) LH : FHS ˃ 3 : 1 (4) Elevated serum Oestradiol, Oestrone (5) Androstenedione (6) ↑ Serum testosterone (7) ↑ Serum Insulin (8) ↑ Prolactin (9) BMI ˃ 25 kg/m2 (10) Waist to hip ratio ˃ 0.85
PCOD / PCOS चिकित्सा
आधुनिक वैद्यक शास्त्रानुसार Weight reduction, Combined O.C. pills, Spironolactone, Metformin, Surgery (Endoscopic cauterization)
आयुर्वेदानुसार चिकित्साक्रम – शोधन - शमन चिकित्सा व संतुलित आहार – विहार
शोधन चिकित्सा: पंचशोधन किंवा पंचकर्म हे आयुर्वेदाचे ठळक वैशिष्ट्य आहे. बीजशुद्धीकरिता शरीरशुद्धी होणे महत्वाचे आहे. ह्यात वमन, विरेचन, बस्ति, नस्य व रक्तमोक्षण क्रियांचा अंतर्भाव होतो.
वमन : विशिष्ट औषधी द्रव्यांच्या सहाय्याने उलटी करविणे म्हणजे वमन. बीजदुष्टीमध्ये जेव्हां कफदोष प्राधान्य असते तेव्हां वमनाचा उपयोग होतो.
विरेचन : तोंडावाटे औषध देऊन मलप्रवृत्तीद्वारे दोष बाहेर काढण्याच्या क्रियेला विरेचन म्हणतात. बीजातील पित्तप्रधान दोषदुष्टीच्या निर्हरणासाठी ह्या क्रियेचा उपयोग होतो.
बस्ति : गुदमार्गाने (किंवा योनिमार्गाने – उत्तरबस्ति) औषधी द्रव्य प्रविष्ट करून दोषनिर्हरण करण्याच्या क्रियेला बस्ति चिकित्सा म्हणतात. गर्भाशय, अंडाशय (Ovaries) इ. अवयव हे अपानवायूच्या कार्यक्षेत्रात येतात व बस्ति ही अपानवायुची प्रधान चिकित्सा आहे.
बस्तिचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.
१) आस्थापन / निरूह बस्ति – ह्यामध्ये औषधी द्रव्यांचा क्वाथ तयार करून त्याला गुदमार्गे प्रविष्ट करतात. ह्याकरिता दशमूळ क्वाथाचा वापर प्राधान्याने केला जातो. दशमूळ क्वाथ हा कफवातशामक, दीपन, आमपाचक व शोथहर आहे. दशमूळ क्वाथातील द्रव्यांमध्ये बीजकोशातील स्थानिक शोथ (cystic follicles) कमी करण्याची गुणवत्ता आहे. ह्यामुळे हायपोथॅलॅमिक पिट्युटरी ओव्हेरियन अॅक्सिस (HPO Axis) चे नियंत्रण होऊन उत्तम बीज परिपक्वतेस मदत होते.
२) अनुवासन बस्ति - ह्यामध्ये औषधी द्रव्यांनी सिद्ध केलेली तेले गुदमार्गे प्रविष्ट केली जातात. तीळ तेल, सहचर तेल सारख्या विविध तेलांचा उपयोग ह्यासाठी प्रसिद्ध आहे. तेल हे सर्वात श्रेष्ठ वातहर द्रव्य आहे. ह्याने वाताचे अनुलोमन होऊन मासिक रजःस्रावाचे चक्र सुरळीत होण्यास मदत होते.
नस्य : नाकाने औषधी द्रव्य प्रविष्ट करण्याच्या क्रियेला नस्य म्हणतात. हे औषध शृङ्गाटक मर्मापर्यंत पोहोचते व आपले कार्य करते. गर्भधारणेसाठी आवश्यक असलेली मस्तिष्कातील यंत्रणा संतुलित करून पुरुषबीज निर्मिती उत्तम रीतीने व्हावी व स्त्रीबीज निर्मितीसाठी आवश्यक होर्मोन्सचे संतुलन व्हावे ह्यासाठी आयुर्वेदात गर्भस्थापक / प्रजास्थापक वनस्पतींचा उल्लेख आहे. पुरुषांत टेस्टोस्टेरॉन व स्त्रियांमध्ये FHS व LH वर ह्यांची क्रिया घडते हे आधुनिक वैद्यक शास्त्रानेही मान्य केले आहे. ‘नासाहि शिरसो द्वारं . . .’ ह्या सूत्रानुसार ह्या वनस्पतींचा प्रयोग नस्यस्वरूपात करावा.
“ऐन्द्रीब्राह्मीशतवीर्यासहस्रवीर्याsमोघाsव्यथाशिवाsरिष्टावाट्यपुष्पीविष्वक्सेनकान्ता इति दाशेमानि प्रजास्थापनानि भवन्ति l” . . . . . . . चरक, सूत्रस्थान ४/१८ (४९)
उपतोक्त संदर्भानुसार प्रजास्थापक वनस्पतींनी सिद्ध केलेल्या घृताची निर्मिती एका नामांकित कंपनीने केली असून त्यावर अधिक संशोधन सुरु आहे. ‘प्रजांकुर’ नावाने उपलब्ध असलेले हे घृत होर्मोन्सचे संतुलन साधित ह्या विकारात नक्कीच उपयुक्त होईल असा विश्वास वाटतो.
रक्तमोक्षण – विशिष्ट मात्रेत शरीरातून रक्त बाहेर काढण्याच्या क्रियेला रक्तमोक्षण म्हणतात. रक्तातील पित्तदोष काढून टाकण्यासाठी ही चिकित्सा आहे. स्त्रीच्या हिमोग्लोबिनची पातळी व इतर लक्षणे पाहून मगच रक्तमोक्षण करण्याबाबत निर्णय घ्यावा. लोखंडी कढया, तवे, पातेल्या, पळ्या ह्यांसारख्या स्वयंपाकातील भांड्यांची जागा टेफलॉन विलेपित भांड्यांनी घेतल्याने हिमोग्लोबिनची पातळी सहसा खालावलेलीच असते. शिवाय स्त्रियांमध्ये मासिक रजःस्रावामुळे रक्तक्षय होतो. त्यामुळे रक्तमोक्षण करण्याची विशेष आवश्यकता भासत नाही.
शोधन चिकित्सेनंतर शमन चिकित्सेमध्ये प्रामुख्याने खालील योग वापरले जातात:-
शतपुष्पा + शतावरी; हरीतकी + शुण्ठी; लताकरंज + यष्टिमधु + यवक्षार; पाठा + त्रिकटु + कुटज; सारिवा + मंजिष्ठा; तिल + गुड + भरङ्गी. त्याचबरोबर कल्पांमध्ये कुमारी आसव; दशमूलारिष्ट; लाताकरंज घन वटी; चंद्रप्रभा वटी; पुष्पधन्वा; रजःप्रवर्तनी वटी; आरोग्यवर्धिनी ह्यांसोबत फलमाह वटीचा वापर उत्तम ठरेल.
उत्तम, सकस व योग्य आहार, व्यायाम, योगासने, सूर्यनमस्कार, सर्वांगासन, पश्चिमोत्तानासन, हलासन, प्राणायाम ह्यांचाही उपयोग होतो असे दिसून येते.
PCOD / PCOS मध्ये आहार
          जगण्यासाठी अन्न ही मानवाची प्राथमिक गरज आहे. परंतु काळाच्या ओघात हेच अन्न विकृत पद्धतीने सेवन करण्याची सवय समाजात जडली व अनेक प्रकारच्या संतर्पणजन्य आजारांचे कारण बनू लागली आहे.
ताजा, सकस, सात्विक, लघु आहार व शिळा, निकृष्ट, तामसी, गुरु अशा दोन प्रकारच्या आहारप्रणाली आहेत. पहिली आरोग्यदायी तर दुसरी रोगकारक आहे.
           ह्यामध्ये मेदसंचिती असल्यास वजन कमी करणे अपरिहार्य आहे. स्थूल असणाऱ्या रुग्णांनी भोजनाच्या वेळा ठरवून सकाळी पोटभर नाश्ता, दुपारी मध्यम भोजन व रात्री अल्प आहार घ्यावा. नाश्त्यामध्ये फळे, फळांचा रस असावा. दुपारी षड्रसात्मक असा मध्यम आहार घ्यावा. ह्यात दूध, खिचडी, केळी, गरम दही, गरम मध, फळे घेण्याचे टाळावे. दुपारचे जेवण भरपेट नसावे. जेवणानंतर दुपारी झोपणे अत्यंत रोगकारक आहे. “भुक्त्वा राजवदासीत यावदन्नक्लमो गतः ततः पादशतं गत्वा . . . ” अर्थात जेवणानंतर राजासारखे बसून विश्रांती घ्यावी व अन्नमद (जडपणा) गेल्यानंतर शतपावली करावी असा शास्त्रादेश आहे.
पथ्य – अर्थात काय खावे?
• पालेभाज्या, बीट, फळे, डाळींचे सूप, टाक, सरबत, भाज्यांचे सूप, गरम पाणी
• भाजलेले पदार्थ, गरम अन्न, व्यवस्थित शिजवलेले अन्न, बदाम, काजू, भाकरी, नाचणी, बाजरी, उडीद, मूग, मसूर, कुळीथ, कांदा, लसूण, तीळ, अंडी, मासे
• उसाचा रस, मध, जव, मका, साजुक तूप
अपथ्य – अर्थात काय खाणे टाळावे?
• आंबा, केळी, दूध व फळे एकत्रितपणे (फ्रूटसालड)
• मलई, लस्सी, फ्रीजचे पाणी / अन्य शीतपेये, दही, सलाड
• बेकरीचे पदार्थ, सामोसा, वडा, पेस्ट्री, केक्स, चॉकलेट्स, मिठाया, खवा, लोणी, डबाबंद पदार्थ
• गरम दही, शिळे अन्न, आंबवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, शेंगदाणे, सॅंडविच
लेखक –
प्रा. वैद्य सुभाष मार्लेवार (आयुर्वेद वाचस्पति)
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग, पोदार वैद्यक महाविद्यालय
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com

Sunday, February 21, 2016

आयुर्वेदातुन आरोग्याकडे

आयुर्वेदातुन आरोग्याकडे
चहा बिस्कीट वा दुध बिस्कीट
लहान मुलांपासुन ते मोठ्यामध्ये आवडीने खाल्ले जाणारे १ combination म्हणजे चहा बिस्कीट वा दुध बिस्कीट.
दुध पौष्टीक पदार्थ बिस्कीटाचा कोरडापणा दुर कमी करण्यासाठी द्रवरूपी दुधाचा व चहाचा उपयोग होतो.
बिस्कीट तयार झाल्यानंतर काही दिवसानी वा काही महिण्यांनी वा १-२ वर्षांनी कंपनीतुन आपल्या घरी पोहचतात.
कुठल्याही पदार्थांवर संस्कार झाल्यानंतर ते लगेच एका अहोरात्रीत खाणे अपेक्षीत असते. रात्र उलटुन गेल्यानंतर ते पर्युषित म्हणजे शिळे अन्न बनते.
नुसते बिस्कीट खाणे म्हणजे शिळे अन्न खाणे होय. नेहमी शिळे अन्न खाल्ल्यानंतरचे होणारे त्रास नेहमी फक्त बिस्कीट खाणारया व्यक्तीस होऊ शकतात.
गरम चहा अथवा गरम दुधासह थंड असलेले बिस्कीट खाणे हे संयोग विरूध्द अन्नाचे उदाहरण ठरते. कारण थंड व गरम यांचा संयोग विरूध्द गुणात्मक होतो.
नमकीन खारे बिस्कीट दुध वा चहासह घेणे हेही विरूध्द अन्नाचा १ प्रकार होतो. कारण मीठ व दुधाचा संयोग विरूध्द ठरतो.
नेहमी विरूध्द पध्दतीतील चहा दुध बिस्कीट खाण्यात येत असतिल तर विरूध्द अन्न सेवन जन्य व्याधी उत्पन्न होऊ शकतात..
🍀विरूध्द पदार्थ सेवनाने होणारे त्रास🍀
विरूध्द पदार्थ सेवनाने शास्रानुसार पुढील आजार होतात.....
नपुंसकता, आंधळेपणा, विसर्प( herpes zoster), जलोदर( पोटात पाणी साचणे),विस्फोट(शरीरावर फोड निर्माण होणे), उन्माद, भंगदर, मुर्च्छा, मद, पोट गच्च होणे, गळ्याचे आजार,पांडुरोग(रक्त कमी होणे) आमविष(पचन न झाल्याने उत्पन्न विष) पांढरा कोड, विविध त्वचाविकार सोरियासिस,ग्रहणीरोग( ibs),सर्वांगास सुज, अम्लपित्त, ताप,सर्दी पडसे, संतानदोष, गर्भात दोष किंवा बाळाचा मृत्यु हे सर्व विकार विरूध्द पदार्थ सेवनाने होतात. फक्त विविध आजार टाळण्यासाठीच नाहीतर उत्तम संतती प्रजानिर्मितीसाठी देखील विरूध्द पदार्थ टाळावेत नाहीतर कालांतराने गंभीर दिसावयास लागतात.विरूध्द सेवन करणारया लोकांनी तो बंद करावा काही त्रास असल्यास आयुर्वेदीय चिकित्सा विषयक सल्ला जरूर घ्यावा......
🔥 विरूध्द अन्न पचविणारे व्यक्ती 💪🏻
व्यायामस्निग्धदीप्ताग्निवयःस्थबलशालिनाम् | विरोध्यपि न पीडायै सात्म्यमल्पं च भोजनम्|| वा.सु. ७/४६
व्यायाम करणारे, स्निग्ध आहार घेणारे, अग्नि भुक चांगली असणारे, तरूणवयात व बलवान अशा लोकांत जरी विरूध्द अन्न सेवन केले तरी फारसे विकार होत नाही. तसेच सवयीमुळे व कमी प्रमाणात विरूध्द अन्न फारसे बाधक ठरत नाही...
बिस्कीट आजच्या काळातील निर्मित पदार्थ आहे तरी तो आयुर्वेदातील असेवनीय पदार्थांपैकी १ मानता येईल. म्हणजे न खाण्याजोगा पदार्थ..
असेवनिय पदार्थ हे इतर काहीही खाण्यास उपलब्ध नसताना भुक भागविण्यासाठी खाता येऊ शकतात.
किंवा बिस्कीटाचा काही विशिष्ट लोकांत औषधी म्हणुन उपयोग होत असेल तर खाता येऊ शकते. पण ही condition rare च असेल.. नित्य बिस्कीट सेवन करणारयांनी गुणधर्मांचा विचार आवश्य करावा...

वैद्य गजानन मॅनमवार
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका 
नांदेड
 9028562102, 9130497856
( if you want daily post on whats up plz send your name & whats up no on --- 9028562102 )

Thursday, February 18, 2016

सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .


सूतिका परिचर्या अर्थात काळजी बाळंतीणीची . . . .
‘मातृत्व’ ही प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यतील एक विशेष व आनंददायी घटना असते. मात्र प्रसूतीनंतर योग्य काळजी घेतली गेली तरच ती खऱ्या अर्थाने आनंददायी ठरते. प्रसूतीच्यावेळी स्त्रीचा एक पाय भूलोकांत तर दुसरा पाय यमलोकात असतो असे काश्यपाचार्यांनी म्हटले आहे. सूतीकावस्था ही प्राकृत स्थिती असली तरीही प्रसववेदनांनी शल्यभूत असा गर्भ बाहेर टाकल्यानंतर तिच्या शरीरात धातुक्षय व बलक्षय निर्माण होतो. हा क्षय भरून शरीर प्राकृत अवस्थेत येईपर्यंत तिला सूतिका परिचर्येचे पालन करणे आवश्यक असते. अन्यथा त्याचे दूरगामी परिणाम होऊन स्थिरत्व, दृढत्व, निरोगीपण राहणे शक्य होत नाही.
सूतायाश्चापि तत्र स्यादपरा चेन्न निर्गता l प्रसूताऽपि न सूता स्त्री भवत्येवं गते सति ll
. . . . . का.स. खिल, सूतिकोपक्रमणीयाध्याय
अपरापतन जेव्हां पूर्ण होते तेव्हांच स्त्रीला ‘सूतिका’ म्हणून संबोधले जाते.
सूतिकावस्था कालावधी –
सार्ध मासान्ते l म्हणजेच स्त्रीची सूतिकावस्था दीड महिन्यापर्यंत असते.
१. प्रथम १० दिवस : क्षत आणि व्रणामुळे ह्या काळातील परिचर्या व्रणरोपणाच्या दृष्टीने करावी. गर्भाशयात ज्या ठिकाणी अपरा विभक्त होते त्याठिकाणी ह्याचा केंद्रबिंदू असतो.
२. प्रथम दीड महिना : ह्या काळातील परिचर्या विशेषतः स्तन, स्तन्य आणि त्र्यावर्ता योनीच्या स्वास्थ्यरक्षणाच्या दृष्टीने आखली आहे. गर्भाशयाची पूर्वस्थिती प्राप्त करणे स्तन्यपुष्टी ह्या काळात अभिप्रेत आहे.
३. पुढील रजोदर्शनापर्यंतची कालमर्यादा : २ ते ६ महिन्यांपर्यंत हा कालावधी असू शकतो. काही सूतिकांमध्ये रजोदर्शन होण्यापूर्वीच पुन्हा गर्भधारणा होऊ शकते त्यांना ‘मिंध्या’ गर्भिणी म्हणतात.
सूतिका परिचर्या आवश्यकता –
प्रसूतीनंतर स्त्रीशरीर व उदाराचा खालचा भाग शिथिल होतो, वाढतो, शरीराला लट्ठपणा आणि बेडौलपणा येतो. शारीरिक दौर्बल्याबरोबरच मानसिक दौर्बल्यही आलेले असते. म्हणून सूतिका परिचर्येचे पालन करणे आवश्यक आहे.
१) सूतिका व्रणी असते
२) तिच्यात रक्तस्रावजन्य व क्लेदजन्य धातुक्षय असतो
३) प्रसवक्रियेतील प्रवाहणामुळे वातप्रकोप झालेला असतो
४) धातुक्षय झाल्यामुळे अग्निमांद्य व धात्वाग्निमांद्य येते
५) ह्या काळात होणारे स्तन्यप्रवर्तन
६) योनिदोष व ग्रहबाधा ह्यांपासून सूतिकेचे संरक्षण करावे लागते
प्रसूतीच्यावेळी जेव्हां अपरा गर्भाशायापासून विलग होते तेव्हां त्याठिकाणी व्रण निर्माण होतो. म्हणून सूतिकेला व्रणी म्हणतात आणि त्यानुसार तिची व्रणरोपण किंवा क्षतरोपण चिकित्सा करावी लागते.
सूतिका कालांतर्गत परिवर्तन -
१) गर्भाशयाचा आकार कमी होणे (Involution of uterus) : अपरापतनानंतर लगेच गर्भाशय संकोच होऊन नाभीच्या खाली जघन संधानकाच्या ५ इंच वर असते. पुढे गर्भाशयाची उंची प्रतिदिन १.२५ सेंटीमीटरने कमी होते. ११-१२ व्या दिवशी गर्भाशय संकोचन श्रोणीमध्ये पूर्णपणे स्थिरावते.
२) गर्भाशयाच्या निम्नखंड व ग्रीवेमध्ये परिवर्तन : प्रसवानंतर गर्भाशयग्रीवेत क्षत होते. ग्रीवामुख हळूहळू संकुचित होते. जसजसे गर्भाशयमुख संकुचित होते, तसतशी ग्रीवा कठीण व जाड होते व ग्रीवागुहा पुनःनिर्मिती होते.
३) योनी व योनिमुख : प्रसवानंतर योनी व योनिमुख संकुचित होतात. परंतु अप्रसवेच्या स्थितीपर्यंत येत नाहीत व योनिशैथिल्य येते. तेथे वात दूषित होतो. योनीच्या अतिशैथिल्यामुळे पती व पत्नी दोघांचेही कामजीवन असमाधानी राहून मानसिक स्वास्थ्य खालावते. ह्याकरिता चिकित्सा अन्यत्र वर्णन केली आहे. (सूतिका परिचर्या तत्व क्र. ८ पाहावे)
सूतिका परिचर्या तत्वे –
१. आश्वासन : अपरापतन व प्रसव काळातील रुग्णेची मानसिक अवस्था लक्षात घेता ‘आश्वासन चिकित्सा’ सामान्य असली तरी आवश्यक आहे.
२. स्नेहन व मर्दन : सूतिकेच्या अधोदर, कटि व पृष्ठभागी दररोज सकाळी व संध्याकाळी बला तेल, तीळतेल, चंदनबला लाक्षादि तेल, सूतिकाभ्यंग तेल पैकी एकाने अभ्यंग करावे. त्यानंतर हळदीचे वस्त्रगाळ चूर्ण अंगात जिरवावे व उष्णोदकाने स्नान घालावे. मर्दनाने प्रकुपित वाताचे व तज्जन्य शूलाचे शमन होते. स्नानानंतर कटिप्रदेशी स्वेदन (शेक) करावे.
३. पट्टबंधन : वेष्टयेत् उदरम् l म्हणजेच पोट बांधणे, पश्चात स्वच्छ व जाड वस्त्राने कुक्षी, पार्श्व, पृष्ठ, उदर हे भाग घट्ट बांधावे. ह्याने गर्भवाढीमुळे शिथिल झालेल्या उदरात वायूचा प्रवेश होत नाही, उदाराचा आकार वाढून शरीर बेडौल होत नाही.
४. स्नेहपान : पट्टबंधनानंतर पचेल इतका स्नेह दीपन – पाचन द्रव्यांसमवेत द्यावा. ह्यात पिंपळी, पिंपळीमूळ, चव्य, चित्रक, सुंठ, ओवा, जिरे, सैंधव, मरीच अशा द्रव्यांचा समावेश होतो. प्रसवामुळे उत्पन्न झालेल्या वातप्रकोपासाठी स्नेहपान चिकित्सा अत्यंत महत्वाची ठरते.
५. गर्भाशयशोधन : प्रसूतीनंतर गर्भाशयशोधनासाठ
ी मास, कृष्णबोळ गुळासोबत द्यावा व दशमूलारिष्ट समभाग पाण्यातून द्यावे. शिवाय लताकरंज आणि पिंपळमूळ चूर्णाचा उपयोग करावा. ह्याने गर्भाशय प्राकृत स्थितीत येण्यास मदत होते.
६. कोष्ठशोधन : कोष्ठशोधनार्थ एरंडतैल सुंठीच्या काढ्यासोबत द्यावे. ह्यामुळे प्रकुपित वायूचे शमन व मलशोधन होते. कोष्ठशोधनाने दोषदुष्टी दूर होऊन आमसंचिती होत नाही.
७. रक्षोघ्न : सूतीकेस उष्णोदकाने योनिप्रक्षालन करावयास सांगून योनिधूपन करावे. ह्यासाठी चंदन, धूप, लसूण साल, ओवा, शेपा, वचा, कोष्ठ, अगरु अशी प्रकृतीनुसार दव्ये वापरावीत.
८. योनिशैथिल्य : प्रसूतीनंतर योनिशैथिल्य आल्यास लोध्र साल, पलाशबीज, उदुंबरफल चूर्ण तेलात मिसळून त्याचे योनिधारण करावे. अम्ल – कषाय सिद्ध तेलाचे पिचुधारण करून मग क्षीरी वृक्षांच्या काढ्याने योनिधावन करावे. सायंकाळी योनिभागी अभ्यंग करून धूपन करावे. ह्याने योनिभाग निर्जंतुक होऊन शोफ, लाली, व्रण भरून येतात. अपत्यपथ व योनि संकुचित होऊन प्राकृत स्वरूपात येतात. ह्याचबरोबर सूतिकेने सर्वांग अभ्यंग करून घ्यावा. प्रसूतीपश्चात मातृ स्वास्थ्यरक्षणासाठी ‘सूतिकाभ्यंग तेल’ वापरावे.
प्रसवामुळे सर्व धातु दुर्बल होऊन त्यांची झीज होते. ही झीज भरून काढण्यासाठी व गर्भाशयाचा प्राकृत संकोच होण्यासाठी विशेष अभ्यंग तेलाचा पाठ अष्टांगहृद्य शारीरस्थान २/४७ मध्ये वर्णन केलेला असून महर्षी वाग्भटांचा ‘गर्भविकास व मातृपोषणाचा’ विचार करतांना हे विसरून कसे चालेल?
आहार व विहार –
सुश्रुताचार्यांनी अभ्यंगानंतर वातघ्न औषधीपान व तद्नंतर परिषेक करण्यास सांगितले आहे. पंचकोल चूर्ण उष्णोदकाबरोबर, विदारिगंधादि सिद्ध स्नेह यवागु / क्षीर यवागु पानार्थ द्यावे. नंतर यव, कोल, कुलत्थ सिद्ध जांगल मांसरस, शालिगोदन बल आणि अग्निनुसार द्यावे.
कच्च्या डिंकाचा लाडू, सुंठ + तूप + साखर सकाळी घ्यावे. ह्यामुळे अधोदराच्या स्नायूंना बल प्राप्त होते व योनिशैथिल्य कमी होते.
लसणीचे तिखट, मुरलेले लिंबाचे लोणचे ह्यामुळे संचित क्लेद, रज, जरायु शेष बाहेर पडण्यास मदत होते. लसूण घालून तांदळाची धिरडी, तिखट मिठाचा सांजा सेवन करावा. लसणामुळे पुनर्नवीभवन, स्नायूंची झीज भरून काढणे व योनिभागाचे विवृतास्यत्व कमी होते.
सुंठ, गूळ, तूप घातलेल्या सुंठीच्या वड्या, खसखस घालून आल्याच्या वड्या, मेथी, सुंठ, आले, लसूण, जुने तांदूळ, ओवा, आवडत असल्यास बाळंतशोपा, बडीशेप यांचा वापर करून पथ्यकर अन्नाचा वापर करावा. ह्याने दर्जेदार व मुबलक दूध बालकाला मिळते.
खारीक पूड ओल्या खोबऱ्याबरोबर व दूध द्यावे, नाचणीची कांजी, कढण असे द्रव पदार्थ भरपूर द्यावे. ह्यामुळे स्त्रीची प्रकृती स्वस्थ राहून बांधा सुदृढ होतो. स्तनभागाला शैथिल्य येऊ नये म्हणून घट्ट बंध बांधावा.
आहारामध्ये खालील खीरींचा समावेश करावा –
• खारीक – बदाम खीर • खसखस – बदाम खीर • आहाळीवाची खीर • कापसाच्या सरकीची खीर • कणीक तुपात भाजून दुधात घालून केलेली खीर
ह्या खीरींमुळे वायूचा उपशम होतो, शरीराची झीज भरून निघते व स्तन्य निर्मिती मुबलक होऊन बालकाला उत्तम दुधाचा पुरवठा होतो.
देश व काळानुसार परिचर्या बदलते –
• मुंबईसारख्या आनूप देशात अभिष्यंद अधिक असल्याने स्नेहपान कमी व स्वेदन अधिक करावे.
• सोलापूर सारख्या कोरड्या म्हणजेच जांगल प्रदेशात स्नेह अधिक प्रमाणात द्यावा. मुलगा झाल्यास तेल व मुलगी झाल्यास तूप द्यावे असे काश्यपमुनी सांगतात.
• साधारण देशात स्नेह व स्वेद दोन्ही करावेत.
• विदेशी लोकांमध्ये मांसरस, रक्त किंवा मांसाचे सूप देतात.
• कंदमुळे, ओट्स, बीट, बटाटे इ. पदार्थांचा वापर आहारात करावा.
• ह्याशिवाय कुलसात्म्याचा विचार करून आहार द्यावा.
औषधी योग –
१. बृहत् पंचमुळांचा काढा सैन्धवासह , २. सौभाग्यशुण्ठी पाक, ३. मिश्री, पुनर्नवा, गोक्षुर, जेष्टमध चूर्ण तुपाबरोबर द्यावे. ४. सुंठ, साखर, तूप द्यावे, ५. विदारीकंद क्वाथ सैन्धवासह द्यावा. तूप, पिठीसाखर, केशर खाण्यास द्यावे ६. अनुलोमनासाठी भारङ्गी, काकडशिङ्गी, धामसा ह्यांचा क्वाथ द्यावा ७. गुडुची – आमलकी सिद्ध क्षीर द्यावे. ८. सूतिका कषाय –
सूतिका काळामध्ये त्र्यावर्ता योनि स्वस्थितीत येण्यासाठी भावप्रकाश वर्णित सूतिका कषायाचा वापर म. आ. पोदार रुग्णालयात मी करीत असतो.ह्याचा निश्चित असा लाभ झाल्याचे माझ्या निदर्शनास आले. ह्या पाठामध्ये गुडुची, सुंठ, सहचर, मुस्ता, उशीर, त्वक्, बृहत् पंचमुळे ह्या द्रव्यांचा वापर केलेला आहे. ह्या द्रव्यांची भरड समान मात्रेत घेऊन त्याचा ४० मिली काढा जेवणानंतर २ वेळा पानार्थ वापरावा. सदर काढा संचित दोष बाहेर पाडण्यासाठी असून स्वस्थ सुतीकेने वापरण्यासाठी आहे.
ह्या सूतिका कषायामुळे दीपन, पाचन व वातानुलोमन होऊन सूतिकारोग नियंत्रणात येतात.
Extra daily nutrient allowances for lactation (WHO / FAO – 1974)
Energy: 2600 Kcal, Protein: 44 gm, Vitamin D: 7.5 µg, Vitamin E: 8 mg, Vitamin C: 60 mg, Vitamin B2: 1.3 mg, Vitamin B3: 14 mg, Vitamin B6: 2 mg, Folate: 400 µg, Vitamin B1: 1.1 mg, Calcium: 800 mg, Iron: 18 mg, Zinc: 15 mg
योगासने –
प्रसूतीपश्चात नियमित योगासनांचा अभ्यास केल्यास वजन कमी होण्यास मदत होते, स्नायूंची कार्यक्षमता सुधारते, तणाव कमी होतो, शारीरिक उर्जा वाढण्यास मदत होते. ह्यात पुढील आसनांचा अवलंब करावा –
मार्जारासन (Pelvic floor exercise), पवनमुक्तासन (Full squats/ Squat hold), उत्तान ताडासन (Toe taps / Bridge), वक्रासन (Kick backs), उत्कटासन (Brisk walking posture), भुजंगासन (Modified cobra posture)
वरील योगासनांचा आभास एकाच वेळेस न करता ती आपल्या शारीरिक बलानुसार, झेपेल तीच योगासने करावीत. क्रमाक्रमाने मार्जारासनापासून सुरुवात करून दरदिवशी एका आसनाचा अभ्यास करावा. त्यामुळे शरीराच्या प्रत्येक अवयवाला लाघव प्राप्त होते, अग्नि प्रदीप्त होतो व सूतिकेला पूर्ववत कर्मसामर्थ्य प्राप्त होते. ह्या संदर्भात भारतीय शास्त्रज्ञ, महर्षी वाग्भट ह्यांनी अष्टांगहृदयात चपखल वर्णन केले आहे. ही आसने करतांना यम, नियमांचा अभ्यास सूतिकेने करावा अशी अपेक्षा आहे. प्राणायामादि प्रकार, नियम पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यावरच करावेत.
ज्याप्रमाणे एखादे जुने वस्त्र खूप मळले असता ते धुवून स्वच्छ करण्याचा प्रयत्न केला तर ते फाटण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे सूतिका अत्यंत थकलेली व म्लान असल्याने जर तिला विकार झाला तर उपचार करणे कठीण असते. म्हणून सूतिका परिचर्येचे पालन करावे. ह्याने स्त्रीची प्रकृती उत्तम राहून वाढलेल्या गर्भाशयाचे आकुंचन योग्य होऊन तो प्राकृत स्थितीत जाणे व योनिभागाला प्राकृत आकार येऊन तेथील स्नायूंचे बल वाढणे, त्याचप्रमाणे श्रमजनित थकवा, जननेंद्रियांची शक्ती पुन्हा भरून येणे व अंतरेंद्रिये म्हणजे ‘फलकोषादिकांचे स्रवण योग्य होणे हे उद्देश साध्य होतात.
लेखक
प्राध्यापक वैद्य सुभाष मार्लेवार, M. D. (Ayurved),
स्त्रीरोग व प्रसूतीतंत्र विभाग, पोदार वैद्यक महाविद्यालय, मुंबई ४०० ०१८
+917738086299
+919819686299
subhashmarlewar@gmail.com
वैद्या पौर्णिमा हिरेमठ
M. S. Gyn (Scholar)

Monday, February 15, 2016

केस शरीरासाठी तैल


केस शरीरासाठी तैल
ऊर्ध्वमूलमधः शाखमृषयः पुरूषं विदुः|
मूलप्रहारिणस्तस्माद् रोगान् शीघ्रतरं जयेत्||
सर्वेन्द्रियाणि येनास्मिन् प्राणा येन च संश्रिताः|
तेन तस्योत्तरमागंस्य रक्षायामादृतो भवेत|| वा.उ.
           शरीराचे मुळ उर्ध्व भागी म्हणजे डोक्याच्या ठिकाणी आहे तर शरीरातील इतर भाग फांद्याप्रमाणे पसरलेले आहेत. सर्व इंद्रिय व प्राण शिरोभागी संश्रित असल्याने शिरोरूपी उत्तम अंगाचे रक्षण करावे.
केस फक्त सुंदर दिसावे याकरिता नसुन शरीरूपी मुळांची शेवटची टोक केस मानता येऊ शकतात. ज्यांच्या साह्यायाने काही प्रमाणात तेलरूपी पोषण शरीरात पोहचवता येते. केसांना लावलेले तेल सर्व शरीरात पोहचते. फक्त केसांसाठी नाहीतर पुर्ण शरीरासाठी डोक्याला तेल लावणे आवश्यक आहे...
काही ब्युटीशिअन तेल लावु नये असे सांगतात. अशा प्रकारे डोक्याला तेल न लावणे म्हणजे शरीराला मिळणारा पोषणाचा १ मार्ग बंद करणे होय..
          नारळाचे व डोक्याचे रचनात्मक साधर्म्य असल्या कारणाने डोक्याला तेल लावण्याकरिता खोबरेल तेल उत्तम असते. प्रकृती अनुशंगाने योग्य सल्ल्याने इतर तेलही केसांना लावन्यासाठी वापरता येतील. केसांना तेल लावणे हे फक्त केसांसाठीच नाही तर सर्व शरीरासाठी उपयोगी असते.
केसांना तेल न लावणारयांनी याचा विचार जरूर करावा...
श्री विश्वसंस्कृती आयुर्वेद चिकित्सालय पंचकर्म केंद्र पावडेवाडी नाका नांदेड.
वैद्य गजानन मॅनमवार
9028562102, 9130497856

Visit Our Page