Marathi Ayush Darpan

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला
सलाम मराठी परंपरेला आणि महाराष्ट्राच्या मराठी मातीला

Sunday, February 19, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*बुद्धीबळ*

बुद्धीबळ किंवा चेस नावाचा खेळ आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे. ह्या खेळात बुद्धीच्या जोरावर समोरच्याला हरविणे अपेक्षित असते. आपल्या बुद्धी चातुर्याने समोरच्या राजाची कोंडी करायची असते आणि सामना जिंकायचा असतो. असा हा रंजक खेळ खेळण सगळ्यांनाच काही जमत नाही. ज्याची बुद्धी तल्लख तोच ह्यात जिंकू शकतो.

आपल्या आजूबाजूच्या समाजात २ प्रकारच्या लोकांचे वर्ग आपल्याला बघायला मिळतात. एक बौद्धिक श्रम करणारे आणि दुसरा वर्ग आहे शारीरिक श्रम करणारा. नोकरदार आणि  व्यापारी वर्ग हा बौद्धिक श्रम करणारा तर मजदूर वर्ग हा शारीरिक श्रम करणारा आहे. एका कडे बुद्धी आहे व एका कडे बळ आहे म्हणून दोगेही एकमेकांवर अवलंबून असतात. परंतु दोघेही परीपूर्ण नाहीत.

श्री. समर्थ रामदास स्वामी मात्र ह्याला अपवाद. समर्थ जेव्हडे बुद्धिवान होते तेव्हडेच बलवानहि होते. समर्थ रामदासस्वामी हे बलोपासक होते. हि बलोपासना स्वतः पुरता मर्यादित न ठेवता रामदासांनी सामान्य लोकांपर्यंत पोचवली. बल-बुद्धीचे प्रतिक म्हणजे भगवान मारुती. त्यांनी मारुतीची मंदिरे संपूर्ण देशभरात विविध प्रांतात उभारली आणि लोकांना बलोपासना शिकविली. सोबतच मन बुद्धी स्थिरतेसाठी मनाचे श्लोक समर्थांनी सामान्यांना दिले. ज्याप्रमाणे समर्थांकडे बल आणि बुद्धीचा मेळ होता तसाच बल-बुद्धीचा मेळ छत्रपती शिवाजी महाराजांकडे सुद्धा होता. युद्धकौशल्या सोबतच गनिमी कावा सुद्धा त्यांच्याकडे होता. त्याच जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली.

काल शिव जयंती झाली आज श्रीरामदास नवमी आहे. काल छत्रपती शिवाजींचा जन्म झाला होता आणि आज समर्थ रामदासांनी सज्जन गडावर देह ठेवला होता. दोघेही जगाचे मार्गदर्शक  आहेत. लोकांच्या हृदयात दोगेही अमर झाले आहेत आणि दोघेही परिपूर्ण आहेत.  म्हणून फक्त बौद्धिक श्रम आणि फक्त शारीरिक श्रम मनुष्याला पूर्णत्व देत नाही त्यासाठी दोघांची सांगड असवी लागते.  जे शारीरक श्रम करीत नाहीत त्यांना स्थौल्य, बिपी, डायबेटीस, मानसिक ताणताणाव असे आजरा होत आहेत. म्हणून डॉक्टर कडे गेल्यावर त्यांना पाहिला सल्ला शारीरक श्रम करण्याचा मिळतो. म्हणून स्वतःचे आणि समजाचे स्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल तर शारीरिक बळ आणि बुद्द्धी दोन्ही मिळवावे लागतील.

चला तर बलबुद्धीचे उपासक होऊया, बुद्धी आणि बळ वाढवूया, समाज घडवूया.

*जय जय रघुवीर समर्थ*

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव* *8379820693/7588010703* *drbhushandeo@gmail.com*

http://wp.me/p7ZRKy-7A

Saturday, February 11, 2017

आयुमित्र

*आयुमित्र*

*लाईक, कमेंट, शेअर आणि आयुर्वेद*

सोशल मिडीयाचा वापर आता आपली जनता खूप प्रमाणात करायला लागली आहे. विशेषतः तरुण मुल-मुली तर भरपूरच. राजकारण, मनोरंजन, मैत्री, आरोग्याच्या टिप्स, अभ्यासाच्या टिप्स, आध्यात्मिक टिप्स आणि प्रेमप्रकरणापासून तर थेट लग्न जुळे पर्यंतच्या घटना सोशल मिडियाच्या माध्यमातून सुरु असतात. सोशल मिडियाचा  अनेक लोक खुबीने फायदा करून घेऊ शकतात. परंतु ज्यांना नाही जमल त्यांना मानसिक पीडेतूनसुद्धा जाव लागत. आपण ह्यातून विविध प्रकारच्या लोकांशी संवाद करू शकतो, त्यांच्या विषयी जाणून घेऊ शकतो. शांती पसरविण्यापासून थेट आतंकवाद पसरविण्यापर्यंत लोक ह्याचा वापर करतांना दिसतात.

माझे फेसबुकवर १००० मित्र, मी whats app वर ३०-४० ग्रुप चा एडमीन, twiter वर ….इतके फॉलोअर्स. माझ्या प्रोफाईल पिक्चरला माहितीये १ तासात किती लाईक मिळाले ते? २०० लाईक मिळाले भाऊ आणि त्यात ३० लव पण मिळाले. तुमच्या सारख नाही फक्त १० -१२ लाईक वर गेम खल्लास. असा तोरा मिरवणारे आपल्याला दिसतातच. तर दुसरी कडे मला २ दिवस झाले पोस्ट टाकून अजून फक्त १०च लाईक एकही कमेंट नाही. झाडावर चढून स्ल्फी काढला आणि प्रोफाईल टाकला तरी फक्त एक लाईक नो कमेंट. त्याला/तिला तर भरपूर लाईक मिळतात मला का नाही मिळत? माझे मित्र मला का लाईक देत नाहीत? त्याचे ५००० मित्र माझे तर फक्त 500च मित्र. माझे मित्र का वाढत नाही? अशे नैराश्याच्या गर्तेत टाकणारे अनेक प्रश्न आजकाल सोशल मिडिया वापरणाऱ्यांना पडत आहेत.

आपल्या वाढदिवसाचे, ट्रीपवर जाऊन केलेल्या मौज-मस्तीचे, बायको सोबत हनीमून चे, लग्नाचे, गर्लफ्रेंड सोबतचे अशे अनेक इव्हेंट्स चे फोटो फेसबुक आणि whats app वर शेयर केले जातात. हे सगळ बघून जेव्हा एखाद्याची बायको नवऱ्याला म्हणते. बघा ते कसे फिरताय, मौज मजा करताय, आपण तर कधी जाताच नाही. नवरा म्हणतो बघ तिने कशी जीन्स घातलीये तुला तर जीन्स होणारच नाही. अश्याप्रकारे ह्यातून एक प्रकारची इर्षा, द्वेष आणि कलह सुद्धा निर्माण होतो. आणि हि सगळी मौज मजा माझ्या आयुष्यात का नाही? मी एव्हडा/एव्हडी सुंदर का नाही?, मला कुणी वाढदिवसाला फेसबुक वर शुभेच्छा का दिल्या नाही? whats app वर दोन्ही रेषा कधीच निळ्या झाल्या मग उत्तर का देत नसेल बर? असे एक न अनेक प्रश्न पडून तरुण नैराश्यात जात आहेत. तसेच द्वेष , इर्षा, काम, क्रोध ,लोभ ह्या भावना मनात निर्माण होत आहेत.

फ्री वाला जिओ, ३G, ४G चे इंटरनेट प्लान, आणि प्रत्येकाकडे असलेला मोबाईल ह्यामुळे ह्याचे प्रमाण आणखीनच वाढले आहे. सोशल मिडीयाचा शारीरिक व मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतो ह्याबद्दलचे अनेक संशोधन सुद्धा जगभरात सुरु आहेत. सोशल मिडिया वापरत असताना त्याचे चांगले व वाईट परिणाम आपल्यला अनुभवास येतात. सोशल मिडीयावर मिळालेले लाईक, कमेंट व शेअर हे म्हणजे आपल्यला लागलेलं चागल्या किंवा वाईट व्यक्तिमत्वाच लेबल नसते. हे लक्षात घेणे गरजेच आहे. ज्याचे फेसबुक वर १००० मित्र असतात. त्यांना आपल्या अपार्टमेंटमध्ये /गल्लीत कुणी ओळखत नाही अशीही परिस्थिती कधी कधी बघयला मिळते, आणि जे फेसबुक वर नाहीत अश्यांना सुद्धा जग ओळखते आणि त्यांचेही अनंत चहाते असतात.

ह्यासाठी आयुर्वेदाने आधीच सांगून ठेवले आहे  कि,  ज्यांना इह लोकी स्वतःचे भले करून घ्यायचे आहे त्यांनी कठोर बोलणे, आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणे, चुगली, लोभ, इर्षा, मात्सरता, राग, द्वेष, ह्यांचे वेग धारण केले पाहिजे. (संदर्भ-अ.हृ. सु.-४/२५) सोशल मिडिया वापरतांना सुद्धा आयुर्वेदाच्या ह्या सूत्राचे भान आपण ठेवायला हवा.  समोरच्याला (मुद्दाम) त्रास देणाऱ्या कमेंटचा वेग धारण केला, फोटो बघून निरर्थक हेवे-दावे, इर्षा, लोभ  मनात येत असतील तर त्यांना थांबविण्याचा आवर्जून प्रयत्न केला तर  नक्क्कीच मानसस्वास्थ्य आपले आणि समोरच्याचे सुद्धा चागले राहील असा विश्वास आहे.

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव* *8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-7a

Saturday, February 4, 2017

आलं लसूण लिंबू आणि व्हिनेगरयुक्त औषध हृदयविकाराकरिता सर्वत्र प्रसिद्ध झालं आहे. त्याविषयी

✨✨

शुभ प्रभात

आलं लसूण लिंबू आणि व्हिनेगरयुक्त औषध हृदयविकाराकरिता सर्वत्र प्रसिद्ध झालं आहे. त्याविषयी :

आलं - लसूण आणि लिंबूरस यांचे गुणकार्य आयुर्वेदात स्पष्टच वर्णित आहेत.

आर्द्रक उर्फ आलं किंवा त्यापासून वाळल्यानंतर बनणारी सुंठ हे तर "विश्वभेषज" या पर्यायी नावाने सन्मानित आहे. (सुंठ आणि आल्यातला एक फरक या निमित्ताने लक्षात घ्या. तो असा की, वाळून तयार झालेले सुंठ हे पित्तशामक कार्य करते. त्यामुळे 'गरम पडणे' असा प्रकार सहसा होत नाही. मात्र ओलं आलं हे गरम पडू शकतं, याची नोंद घ्यावी.) आर्द्रक हे प्रामुख्याने अग्निवर कार्य करीत असल्याने त्याचा अनेक आजारांवर उत्कृष्ट परिणाम होत असतो. अग्निमांद्य हे अनेक आजारांचे मूळ कारण आहे. आलं आणि सुंठही अग्निमांद्य दूर करणारं आहे. ज्याचा अग्नि प्राकृत, तो स्वस्थ असे म्हटले तरी चालेल.

दुसरा घटक लसूण. हीदेखिल स्वास्थ्याकरिता निसर्गाची एक अनमोल देणगी आहे, असे आपण म्हणू शकतो. आवळ्याप्रमाणे लसूण यातही एकूण सहापैकी पाच प्रकारचे रस (किंवा चवी म्हणा हवं तर) असतात. मधुर (गोड), अम्ल (आंबट), लवण (खारट), कटु (तिखट), तिक्त (कडू), कषाय (तुरट) अशा सहा प्रकारच्या चवी किंवा रस आयुर्वेदाने मान्य केले आहेत. त्यांपैकी तब्बल पांच रस आवळा आणि लसूण यात असतात. त्यामुळेच रसायन म्हणजे माणसाला तरुण ठेवणाऱ्या औषधांमध्ये त्यांचे स्थान वरचे आहे. तारुण्य तेव्हाच टिकून राहील, जेव्हा काही आजार न होता सातही धातू उत्कृष्ट स्थितीत असतील. रसायन द्रव्ये हेच कार्य करीत असतात. लसूणही कफ वात शामक असल्याने हृदयास कफावरोधजनित वेदनांपासून दूर ठेवण्यास सक्षम आहे.

लिंबूरस प्राधान्याने अम्लरसात्मक असून उत्कृष्ट पाचक कार्य करणारा आहे.

वरील फॉर्मुल्यात वापरलेले सफरचंदाचे व्हिनेगर हे base म्हणून कदाचित वापरलेले असावे. सफरचंद हे कफकर असले तरी व्हिनेगरचे गुणकार्य थोडे वेगळे असणार आहेत. कुठल्याही पदार्थावर संस्कार किंवा प्रक्रिया केली असता त्याच्या गुणांमध्ये बदल होत असतात. लसूण आल्याच्या रसाने होऊ शकणारा पित्तप्रकोप त्याने टाळला जाऊ शकत असेल कदाचित.

असो. प्रत्येक वस्तूचे शरीरावर ढोबळमानाने होणारे परिणाम लक्षात घेता उपरोक्त फॉर्म्युला उपयुक्त असू शकेल असे मानण्यास हरकत नाही.

मात्र आयुर्वेदात एकच एक उपाय सरसकट सर्वांना सारखाच उपयुक्त ठरेल असे नसते. रुग्णाची प्रकृति, वय, बल, तो करीत असलेला व्यवसाय आणि तो राहत असलेले ठिकाण तसेच ऋतुमान या सर्वांचा विचार औषध ठरविताना करावा लागतो. या अनुषंगाने वरील मिश्रण हे कफ वात प्रकृतीच्या रुग्णांना विशेष उपयुक्त ठरू शकेल. त्याबरोबरच वैद्यांकडून वैयक्तिक पातळीवर उपदेशित पथ्यापथ्य आणि अन्य औषधं ही महत्त्वाची असतील. विषय हृदयाचा असल्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक. वरील उपाय घरीच करीत राहून केवळ त्यावर विसंबून राहून चालणार नाही. सतत सु-शिक्षित वैद्य किंवा डॉक्टरांच्या संपर्कात राहून प्रकृतीत होणारे बदल लक्षात घेत सावधगिरीने असे उपाय करू त्यांचे लाभ मिळविणे श्रेयस्कर असते. आजाराची गंभीरता - साध्यासाध्यता ही तज्ञासच समजू शकते. त्यामुळे संपर्कात राहून प्रयोग करणे हितकर ! कारण हृदय सद्य प्राणहर प्रकारचे मर्म आहे, हे विसरून चालणार नाही !!

आपल्या शंकेचे समाधान झाले असावे, ही अपेक्षा व्यक्त करतो.

धन्यवाद !!

*वैद्य - दीपक शिरूडे*
    जळगांव ४२५००२
      ९४०३५८७८७९

🐢🐢🐢🐢🐢🐢🐢

Tuesday, January 24, 2017

मी आणि माझी प्रकृती- कफेशची गोष्ट

*आयुमित्र*
*मी आणि माझी प्रकृती- कफेशची गोष्ट*

*कफेश वसंत गोडबोले* नावाचे एक व्यक्तिमत्व आमच्या प्रकृती कॉलनीत राहते. कफेशला मी फार जवळून ओळखतो. कफेशचे व्यक्तित्व अतिशय साधे आहे. कोणाच्या जास्त घेण्यादेण्यात नाही. सात्विक वृत्त्तीचा कफेश लोकांना, मोठ्यांना, गुरुजनांना मान सम्मान देणारा आहे आणि कृतज्ञ आहे. घरात आईवडील ह्यांच्याशी सुद्धा आदराने कफेश वागतो. अगदी शांतता प्रिय माणूस आहे हा. थोडा लाजाळू असून जास्त मित्र नाहीत पण आहेत ते एकदम पक्के. कफेश अतिशय गोड/मधुर(पण मिठीछुरी मात्र नाही), नम्रतापूर्वक आणि विचारपूर्वक बोलतो. बोलणे गंभीर, मध्ये थोड थाबुन पण स्पष्ट आणि सत्य बोलणे आहे. कफेश क्षमावान आहे. परंतु एखाद्याशी वैर झाल्यास छुपे आणि पूर्ण शत्रुत्व ठेवतो. असा हा कफेश मनात कशाची लालसा ठेवत नाही. सदा समाधानी असतो.

कफेशचे व्यक्तिमत्व आकर्षक व सुंदर आहे. शरीर दृढ, मजबूतआणि भरदार पण स्थूलता नाही. केस एकदम मजबूत असतात. डोळे प्रसन्न व मोठे आहेत. कपाळ, छाती, मंड्या व बाहू मोठे आणि मजबूत आहेत.  कफेश भूक, तहान, उन, गर्मी सहन करू शकतो. ह्याची सहन शक्ती उत्तम आहे. खाण्यात ह्याला तिखट, तुरट व कडू पदार्थ आवडतात. गरम- गरम आणि कोरडे अन्न खायला ह्याला फार आवडते. शारीरक हालचाली, कमी असतात जास्त खेळायला, फिरायला आवडत नाही. झोपायला मात्र आवडते. एखादा विषय समजायला थोडा उशीर लागला तरी त्याच्या दीर्घकाळ आठवणीत राहतो. कफेशची मती(बुद्धी )स्थिर आहे. असा हा कफेश दूरदर्शी व दानशील सुद्धा आहे.

वरील कथेतील कफेश जसा आहे साधारण अशे व्यक्ती कफ प्रकृतीचे असतात. आपल्यात हि लक्षणे आहेत का? हे बघा. असल्यास तुम्ही कफ प्रकृतीचे आहात असा प्रार्थमिक अंदाज तुम्ही करू शकता. परंतु योग्य परीक्षण आपल्या वैद्यांकडूनच करून घ्या आणि त्यानुसार आहार विहार आणि आचाराच सल्ला घेऊन या.

आजवर आपण वात, पित्त व कफ प्रकृतिची व्यक्ती कशी असते हे जाणून घेतले आहे. ह्या व्यतिरिक्त  वात-पित्त, वात-कफ, पित्त-कफ आणि वात-पित्त-कफ अश्या प्रकृतीचे व्यक्ती सुद्धा असतात. ह्या व्यक्तींमध्ये दोन्ही/तिन्ही  प्रकारची लक्षणे आढळून येतात. आपली नेमकी प्रकृती जाणून घेण्यासाठी आपल्या वैद्यांकडे जाऊन प्रकृती परीक्षण करून घ्यावे.

(संदर्भ- अ. शा. ८/ १२,१३,१४   सु.शा. ४/७१,७२,७३,७४ व ७५ टीप- कथा काल्पनिक आहे.)

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म *चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*
*drbhushandeo@gmail.com*

http://wp.me/p7ZRKy-6A

Sunday, January 22, 2017

दही

🍚 दही 🍚

न नक्तं दधि भुंजीत न चाप्यघृतशर्करम्| नामुद्युगयूषं नाक्षौद्रं नोष्णं नामलकैर्विना| च.सु.७/६१

रात्रीला व गरम करून दही खाऊ नये. तुपसाखरेशिवाय दही खाऊ नये. मुगाच्या कढणाशिवाय दही खाऊ नये. मधाशिवाय दही खाऊ नये. किंवा आवळ्याशिवाय दही खाऊ नये.

☀ उन्हाळ्यातील दहीसेवन ☀

लघु चाम्लं भवेतग्रीष्मे चात्युष्णं रक्तपित्तकृत् |
शोषभ्रमपिपासाकृद्दधि युक्तं न ग्रीष्मके || हारितसंहिता

उन्हाळ्यातील दही हलके, आंबट, अतिउष्ण गुणधर्माचे रक्तपित्तकारक, शोष, चक्कर, तहान वाढविणारे असते. यामुळेच दही उन्हाळ्यात खाण्यासाठी प्रशस्त नसते.

🍀 वसंत ऋतुतील दही 🍀

वातलं मधुरं स्निग्धं किञ्चिदम्लं कफात्मरम् |
बलकृद्वीर्यकृत्प्रोक्तं वसन्ते न प्रशस्यते || हारितसंहिता

वसंत ऋतुतील दही वातकारक, गोड रसाचे, किंचित आंबट, कफवर्धक, बलवीर्यकारक असल्याने घेण्यास उपयोगी नसते.

☔वर्षा (पावसाळ्यातील) ऋतुतील दही☔

वार्षिकं हितकृत्प्रोक्तं दधि शस्तं न दोषलम्|
शोषवातभ्रमान्हन्ति श्रमातिसारनाशनम् || हारितसंहिता

पावसाळ्यातील दही हितकारक असते, दोषकारक नसते.
शोष (atropy), वात, चक्कर, श्रमामुळे होणारे loose motions कमी करण्याचे काम पावसाळ्यातील दह्याने होते.

🍀 शरद ऋतुतील दही 🍀

शारदं दधि गुर्वम्लं रक्तपित्तविवर्धनम्|
शोफतृष्णाज्वरार्तानां करोति विषमज्वरम्|| हारितसंहिता

शरदातील (oct मधील) दही पचावयास जड, आंबट, रक्तपित्त वर्धक, सुज, तहान, तापीने पिडीत लोकांत विषमज्वर (१ वा २ वा ३) दिवसातुन एकदा येणारा ताप निर्माण करणारे असते....

🍚 हिवाळ्यातील दही 🍚

गुरू स्निग्धं सुमधुरं कफकृद्वलवर्धनम् |
वृष्यं मेध्यश्च हैमन्तं पुष्टिदं तुष्टिवृध्दिदम्||
वृष्यं बलकरं पैत्तं श्रमस्यापहरं परम्|
शैशिर सघनं चाम्लं मधुरं पिच्छलं गुरू||  हारितसंहिता

हेमंत ऋतुमधील दही पचावयास जड, स्नेहयुक्त, गोड कफबलवर्धक, बुध्दीवर्धक, तुष्टी पुष्टी, संतोषकारक असते.
शिशिर ऋतुमधील दही बलवर्धक, शुक्रवर्धक, पित्तवर्धक, श्रेष्ठ श्रमहरण करणारे, घन (घट्ट) गुणाचे, आंबट गोड चविचे, गुळगुळीत, पचावयास जड असे असते.

🍀विविध दह्याचे गुण🍀

गोड दही महाभिष्यंदी (शरीरात अत्याधिक प्रमाणात अवरोध निर्माण करणारे),कफ व मेद वाढविणारे असते...
      आंबट दही कफवर्धक असते. अत्याधिक आंबट दही रक्ताला दुषीत करणारे असते.
        नीट तयार न झालेले दही विदाही( शरीराची आग करणारे), मलमुत्र अधिक प्रमाणात उत्पन्न करणारे असते, वात पित्त कफ रक्त यांना बिघडवणारे असते.....

जर वरील नियमाशिवाय दहीसेवन केले तर खालील आजार निर्माण होतात.. 

ज्वरासृकपित्तवीसर्पकुष्ठपाण्ड्वामयभ्रमान|
प्राप्नुयात् कामलां चोग्रां विधिं हित्वा दधिप्रियः| च.सु.७/६२

    🍀दह्याने उत्पन्न आजार🍀
नियमानुसार दहीसेवन केले नाहीतर
ज्वर( ताप), रक्तपित्त( शरीरातील विविध openings मधुन रक्त बाहेर पडणे), विसर्प कुष्ठ ( त्वचाविकार सोरियासिस),पांडु( anemia), भ्रम ( चक्कर), उग्र कावीळ आदी आजार निर्माण होतात....

१.क्रमानुसार प्रथम आहारसापासुन बनणार्या रसधातुत अपाचित दही पोहचतो ज्वर म्हणजेच ताप निर्माण करतो.येथे योग्य उपचार न केल्यास तो पुढील रक्तात पोहचतो..
२. रक्तात पोहचलेला अपाचित भाग रक्तात आंबटपणा वाढवतो व हिरडे सळसळ करणे, हिरड्यातुन रक्त निघणे, मुळव्याधीचा त्रास, अशा प्रकारचे रक्ताचे आजार उत्पन्न करतो.योग्य चिकित्सा न केली गेल्यास पुढील मांसात हा अपाचित भाग पोहचतो.
३. मांसात पोहचल्यावर हा दुषीत आम कुष्ठ विसर्प  (त्वचाविकार सोरियासिस) निर्माण करते.
४.पुढील मेदात हा दुषीत भाग पोहचला की त्वचेतुन स्राव येणे,खाज सुटणे , blockages निर्माण करणे आदी आजार उत्पन्न करतो.
५, मेदानंतर या दुषीत आमाचा परिणाम हांडावर होतो हाडांची झीज होते, दात हालायला लागतात, किंवा पडायला लागतात, केस गळणे वाढते अशी लक्षणे निर्माण होतात.
६. हाडापर्यंत पोहचल्यासही दुषीत आमाची चिकित्सा योग्य चिकित्सा केली नाही तर मज्जेवर परिणाम होतो.नेहमी चक्कर येते जी सहजपणे दुरूस्त होत नाही.
शेवटी सर्व शरीरात योग्यरित्या पचन न झालेले दही पोहचते आणि जिवघेणी कावीळ किंवा crf (kidney faulure) चा त्रास निर्माण होऊ शकतो जो दुरूस्त होण्यास अत्यंत कठीण असतो.
ग्रंथकारांनि सांगितले तसे दहीसेवन केले तर त्रास होत नाही पण त्याशिवाय दहीसेवन केले तर वरील क्रमाने आजार होतात. लवकर योग्य उपचार केले नाही तर आजारांची गंभीरता वाढत जाते.पुर्वी वा आता दहीसेवन केलेले असल्यास वरीलपैकी कुठलाही त्रास नाही ना हे पहावे. त्रास असल्यास योग्य चिकित्सने अटकाव करावा..

वैद्य गजानन मॅनमवार
Mob no - 9130497856, 9028562102

Friday, January 20, 2017

मी आणि माझी प्रकृती- पित्तेशची गोष्ट

*आयुमित्र*

*मी आणि माझी प्रकृती- पित्तेशची गोष्ट*

  *पित्तेश शरद सांतापे* हा प्रकृती कॉलनीत वातेशच्या(वातेशच्या ओळखीसाठी मागील लेखाचा वाचवा) घराजवळ राहतो. पित्तेश अतिशय हुशार मुलगा आहे. नेहमी वर्गात पहिला असतो. शिक्षक नेहमी त्याच कौतुक करीत असतात. एखादा विषय एकदा समजला कि दीर्घकाळ त्याच्या लक्षात राहतो. स्मरणशक्ती एकाग्रःता अतिशय दांडगी आहे ह्याची. आई वडीलहि त्याच्या कामगिरीमुळे नेहमी खुश असतात.

पित्तेश शरीरयष्टी मध्यम असून तो अतिशय गोरापान आहे. ह्याचे ओठ, गाल, हातापायांचे तळवे, नख हे लाल गुलाबी आहेत. केस थोडे कोमल, विरळ आणि भुरकट आहेत. एक दिवशी पित्तेशची आई वातेशच्या घरी आली. वातेशच्या आईन विचारले काहो तुमचा मुलगा एव्हडा हुशार कसा? काय खायला देता त्याला? विशेष अस काहीच देत नाही, सुरवातीपासूनच हुशार आहे तो. पण काय सांगू त्याला नेहमी कडाक्याची भूक लागते भूक सहनच होत नाही अधून मधून काहीतरी खायला लगतच त्याला. तहानही खूप लवकर लागते. त्याला थंड आणि गोड पदार्थ जास्त आवडतात. कडू भाज्यापण आवडीने खाऊन घेतो. बाकी त्याचा जास्त त्रास नाही.

सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेतो. हिम्मतवान आहे सहसा घाबरत नाही कशालाच. क्रिकेट खेळताना विराट कोहली सारखीच आक्रमकता त्याच्यात असते असे त्याचे मित्र सांगतात. लगेच चिडतो, संतापतो पण पूर्ण झुंज देतो. मला सांगत असतो, आई कमी खेळलो तरी घाम खूप येतो आणि थोडा वासही येतो. उन्हाळ्यात तर त्याला खूप त्रास होतो. उन सहन होत नाही. त्यामानाने हिवाळा आणि पावसाळा त्याला जास्त आवडतो. त्याचे अंग इतरांच्या तुलनेत थोडे गरम सुद्धा असते ह्याचे कारण सुद्धा मला जाणून घ्यायचे आहे. मी उद्या त्याला आपल्या वैद्यानकडे घेऊन जाणार आहे आणि त्यांच्या कडून प्रकृती परीक्षण करून घेणार आहे. ते आपल्या आवडी-निवडी, शरीर रचना, नाडी परीक्षण ह्यावरून प्रकृती परीक्षण करतात आणि योग्य तो आहार-विहार सुचवतात. वातेशची आई- हो वातेशला सुद्धा त्यांनी छान मार्गदर्शन केलय तुम्ही जाऊन या नक्की.

वरील कथेतील पित्तेश जसा आहे साधारण अशे व्यक्ती पित्त प्रकृतीचे असतात. आपल्यात हि लक्षणे आहेत का? हे बघा. असल्यास तुम्ही पित्त प्रकृतीचे आहात असा प्रार्थमिक अंदाज तुम्ही करू शकता. परंतु योग्य परीक्षण आपल्या वैद्यांकडूनच करून घ्या आणि त्यानुसार आहार विहार आणि आचाराच सल्ला घेऊन या.

(संदर्भ- अ. शा. ८/ १२,१३,१४  टीप- कथा काल्पनिक आहे.)

*–वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703*

http://wp.me/p7ZRKy-6y

Monday, January 9, 2017

माझी प्रकृति आणि मी

*आयुमित्र*
*माझी प्रकृति आणि मी*

       प्रकृति हा शब्द अनेक संदर्भात वापरण्यात येत असतो. ह्या सृष्टीला/निसर्गाला प्रकृति म्हणून संबोधतात, आज माझी प्रकृति ठीक नाही, वैद्यराज माझी प्रकृति काय? जरा नाडी बघून सांगता का?, माझी वाताची प्रकृति आहे, माझी कफची आहे असे रुग्ण आम्हाला विचारात/सांगत असतात. प्रकृति विषयी माहिती करून घेणे फार महत्वाचे आहे. पित्त प्रकृतीच्या मुलाने/मुलीने आपला जोडीदार कसा निवडावा? कफप्रकृतीच्या माणसाने हिवाळ्यात हनिमूनला राजस्थानला जावे कि काश्मीरला? अभ्यास केलेला माझ्या लक्षात का राहत नाही? मित्राच्या मात्र चटकन लक्षात राहतो. इत्यादी अनेक प्रश्नांची उत्तरे व उपाय हवे असतील तर स्वतःची प्रकृती जाणून घेणे फार महत्वाचे आहे. 

*आपल्या शरीराच्या प्रकृति कुठल्या प्रकारच्या असतात?*

       शुक्र व शोणित संयोगाच्यावेळी दोषांच्या प्रभावानुसार शरीराची प्रकृती ठरत असते. एक दोष प्रभाव, दोन दोष प्रभाव व त्रिदोष प्रभाव ह्यानुसार वातप्रकृति, पित्तप्रकृति, कफप्रकृति, वातपित्तप्रकृति, वातकफप्रकृति, पित्तकफप्रकृति व समप्रकृति असे प्रकृतिचे प्रकार पडतात. हि जी आपली प्रकृति ठरते हिच शेवटपर्यंत आपली प्रकृती असते. प्रकृति शारीरिकच नव्हे तर मानस प्रकृति सुद्धा आहेत. सत्व, रज, तम आदी ७ ह्या मानसप्रकृति आहेत.

   व्यक्तीच्या प्रकृतिनुसार त्याच्या शरीराची बांधणी झालेली असते. उंची, जाडी, त्वचा,डोळे, केस आदी शरीरभाव हे प्रकृतीवर अवलंबून असतात. तसेच स्वभाव, आवडीनिवडी, होणारे आजार, हे सुद्धा प्रकृतिवर अवलंबून असतात. प्रत्येक प्रकृतिच्या व्यक्तींच लक्षणे वेगवेगळी दिसून येतात. प्रत्येक व्यक्तीला आपल्या शरीरप्रकृति विषयी माहिती असणे आवश्यक आहे.
आपल्या प्रकृतिनुसार आपला आहार, विहार आणि आचार ठेवल्यास कायम निरोगी राहता येऊ शकते.  

        जिज्ञासूनी आपल्या वैद्यांकडून प्रकृति परीक्षण जरूर करून घ्या आणि आपली प्रकुती जाणून घ्यावी.

(संदर्भ- अ.शा.अध्याय ८/३ ,  अ.शा.अध्याय ८/२१ )

*-वैद्य भूषण मनोहर देव.*
*ज्योती आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय, जळगाव*
*8379820693/7588010703* *drbhushandeo@gmail.com*
http://wp.me/p7ZRKy-6p

Visit Our Page